नमस्कार.
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. रेडिओ आणि वंदना विटणकर यांचं अतूट नातं असं आहे कि ज्या नात्याने “अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके … द:ख माझे हे मुके” पासून ते अगदी “अधीर याद तुझी जाळीतसे रे दिलवर” पर्यंत म्हणजे कृष्णा कल्लें पासून ते शोभा गुर्टुंपर्यंत निरनिराळ्या गायक गायिकांच्या आवाजात असंख्य गाणी दिली आहेत. आज आपण पहाणार आहोत ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –
“नयन तुजसाठी आतुरले | प्रेम दिवाणी झाले रे”
असं म्हणतात कि शब्द मुके होतात तिथे बोलायचं काम माणसाचे डोळे करतात. म्हणुनच “डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका” असा लाडिक हट्ट जरी कुणी केला तरीही डोळे आपलं काम करतच असतात. प्रेमाच्या राज्यात तर या डोळ्यांच्या खाणाखुणांची नेत्रपल्लवी नेत्रदिपक कामगिरी करत असते. याच नेत्रपल्लवीच्या खाणाखुणा करण्यात वाकबगार असलेली एक युवती आपल्या प्रियकराला बरेच दिवसांत भेटता न आल्यामुळे बेचैन झाली आहे. एकीकडे डोळे त्याच्या आठवणीने भरून येतायत तर दुसरीकडे तो येताना दिसावा म्हणून तिचे डोळे त्याच्या वाटेकडे टक लावून बघत आहेत. म्हणुनच ती त्याला आपण “प्रेमवेडी राधा” असल्याचं सांगत तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले असल्याचं सांगते आहे. रात्र रात्र या डोळ्यांनी फक्त तुला भेटण्यासाठी आतुरतेने तुझी आठवण काढत वाट पाहिली आहे….. अजूनही तू दिसशील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल या आशेने ते तुझ्या वाटेकडे टक लावून पहात आहेत असंही ती सांगते आहे.
तुझ्या प्रितीच्या अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपून गेले रे
तुला कविता किती समजते ते मला माहित नाही पण “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” असं मंगेश पाडगांवकरांनी म्हंटलंय ना ते अगदी खरं आहे बरं का! तू जर माझ्या नजरेला दिसला नाहीस तर डोळ्यांना वाईट वाटेल पण माझ्या मनाचं मात्र तसं नाहीये. आपल्या भेटीच्या असंख्य आठवणींची रंगीत पीसं या मनानं आपल्या खोल कप्प्यात दडवून ठेवली आहेत. या डोळ्यांप्रमाणे ते काही तुझी वाट बघत बसत नाही तर स्वतःच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणींचा ते छान पिसारा फुलवतं आणि तो आठवणींचा पिसारा लावून माझा मनमयूर आनंदाने नाचतो, डोलतो, अगदी रममाण होतो.
जुळता नाते दोन मनांचे
बंध लोपले युगायुगांचे
मी नच माझी उरले रे
तुला भेटण्याची डोळ्यांना लागलेली आस, मनमयूराने आपल्या कप्यातील आठवणी़ंचा पिसारा लावून त्या मध्ये रममाण होणं हे मनामनांचं नातं जुळल्याचं लक्षण आहे हे आता हळूहळू माझ्याही लक्षात येतं आहे. या मनाला वाटणारं आपल्या भेटीच्या आठवणींचं आकर्षण आणि रात्र रात्र न झोपता या डोळ्यांनी तुझी वाट पहात रहावं, तुला पहाण्यासाठी एवढं आतुर व्हावं हेच दोन मनांचं नातं जुळल्याचं लक्षण आहे. आपल्या प्रेमाचे रेशीम बंध नाजूक असले तरी घट्ट आहेत. कारण प्रेमाच्या या नाजूक रेशीम गाठींनी दोन मनांना असं काही जवळ आणलं आहे कि युगायुगांचे बंध कधी गळून पडले ते दोघांनाही कळलं नाही. मला तर आता असंच वाटू लागलं आहे कि तुझ्याशिवाय मला अस्तित्व नाही इतकी मी तुझ्या प्रेमात विरघळून गेले आहे. ही गोष्ट माझ्या मनाने स्वीकारली आहे आणि माझ्या डोळ्यांनीही ओळखली आहे म्हणून तर ते तुला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत, उत्सुक झाले आहेत.
संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले यांचं संगीत लाभलेलं हे भावगीत गाताना गायिका ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गाण्यातील शब्दांना पुरेपूर न्याय दिला आहे.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अत्यंत छान
सूंदर
धन्यवाद विराग 🙏
छानच
धन्यवाद गौरव 🙏