करोना महामारीची दुसरी लाट देशात कहर माजवत असताना आपण सगळेच चिंतातूर होतो. आपल्या आसपासच्या, नात्यातल्या, ओळखीतल्या, कोणाला ना कोणाला या महामारीची बाधा झाली होती. टीव्ही, वर्तमानपत्रात सर्वत्र याच बातम्या होत्या. कोणीतरी दगावले असल्याचे कळत होते.
जीवनावश्यक औषधे मार्केट मधून गायब झाली. रक्ताचा पुरवठा खूप कमी होत होता. ऑक्सिजन सिलेंडर आणायला कुठे कुठे लांब गावी देखील जावं लागत होतं. ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी ट्रक आणि खास स्पेशल ट्रेन यांची व्यवस्था करून देखील ते मिळेल आणि आपला रुग्ण वाचेल याची कोणी खात्री देत नव्हतं. एक हतबलता येऊ घातली होती.
अशा बिकट परिस्थितीत आपण काय करू शकतो याची दिशा दाखवली ती मध्य प्रदेश मधल्या खरगोन जिल्ह्याच्या कसरावद येथील दोघा शिक्षकांनी, संजय शर्मा आणि संजय कर्मा यांनी. ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था आपली आपण कायमची करु या, थोडा निधी आपण उभा करू या म्हणून या शिक्षकांनी घरोघर जाऊन देणग्या गोळा करायला सुरुवात केली. त्यांची ही धडपड कसरावद चे तरुण उपजिल्हाधिकारी श्री संघप्रिय यांच्या कानी गेली. नुसता तोंडी पोकळ पाठींबा नाही, केवळ आश्वासन न देता जणू काही नेतृत्वच त्यांनी हाती घेतलं.
ऑक्सिजनच्या दोन – चार लहान सिलेंडर ने काम भागणार नाही हे लक्षात घेऊन स्थानिक शासकीय हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीची आणि कंप्रेसरची यंत्रणा उभी केली. अशा केंद्रात वीजपुरवठा बंद पडून रुग्ण दगावू नये म्हणून इन्व्हर्टर आदी व्यवस्था करणे आवश्यक होते. निधी ची गरज वाढती आहे हे लक्षात येताच लहान मोठे देणगीदार, उदयोग व्यवसाय, शासकीय कर्मचारी आणि नर्मदालय सारख्या सेवाभावी संस्था अशा सर्वानीच जमेल तितकी आर्थिक मदत द्यायला सुरवात केली. आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून आपला वाटा दिला.
सारे वातावरण जणू भारून गेले होते. व्हाट्सअँप वरून मेसेज पाठवले जात होते. असाच एक मेसेज इंदोर च्या वाटेवर आपल्या कार मधून उपचारासाठी जात असणाऱ्या एका करोना रुग्णाच्या मोबाईल वर पोचला. तो वाचताच त्यांनी आपला स्वतःचा वीस लाख रुपयाचा धनादेश पाठवून दिला. कसरावदच्या या रुग्ण साहाय्य समितीने काळजीपूर्वक नियोजन करून व्हेंटिलेटर, सत्तर बेड्स, टी व्ही, पाण्याची व्यवस्था अशा सर्व आवश्यक गोष्टींचा विचार करू आराखडा आखला.
शहराच्या मध्यवर्ती भागात शासनाची एक वापरत नसलेली मोठी इमारत होती. तिचे पुनर्निर्माण करून दोन- मजली सत्तर बेड ची सोय केली आहे. रुग्णांना वाचण्यासाठी पुस्तके वर्तमान पत्र अशा छोट्या-मोठ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सगळ्या सुविधांसाठी शासनाला एक पैसा देखील खर्च आलेला नाही.
कसरावत सिविल हॉस्पिटल चे तीन मेडिकल ऑफिसर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी या काळामध्ये इतकी उत्तम सेवा दिली की शहरातल्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांच्या घरच्या नात्यातल्या पेशंट ने सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट या सेंटरमध्येच घ्यायची आहे असा आग्रह धरला. सुमारे एक कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च आलेली ही सुविधा आता वापरण्याची गरज उरलेली नाही. सध्या ती कुलूप लावून बंद आहे.
अलीकडे डेंग्यूची साथ येईल अशी भीती निर्माण झाली. तेव्हा हा या सवयीचा उपयोग ट्रीटमेंट साठी करता येईल त्याची चर्चा झाली. त्याचीही गरज लागली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची ही सगळी धडपड व्यर्थ ठरली काय असा मुद्दा अधून मधून चर्चेत येतो. पण गाव करी ते राव न करी याचा अनुभव देणारी ही धडपड देशातील इतर ठिकाणच्या गावकऱ्यांना सातत्याने दिशा दाखवत राहील हे नक्की !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर, सन्माननीय प्राध्यापक
सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट
विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सध्या कसरावत सिव्हिल हॉस्पिटलला कुलूप लागले आहे,
हे वाचून आनंद झाला.लेख वाचताना परिस्थिती चे पूर्ण चित्र
लेखकाने डोळ्यासमोर उभे केलेले जाणवले !!