Wednesday, June 18, 2025
Homeयशकथाकहाणी एका उद्योजकाची

कहाणी एका उद्योजकाची

महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील अभियंत्याची सुरक्षित नोकरी सोडून काँट्रॅक्टवर प्रोजेक्ट उभारणीची कामे घेण्यास सुरवात करून आज मोठे उद्योजक झालेल्या ठाण्याच्या श्री मिलिंद ठेकेदार यांची प्रेरक कहाणी…

मित्रहो, लॉक डाउनच्या काळात दुकाने बंद होती. मॉल्स, थिएटर्स, पार्लर्स बंद होती. पण आवश्यक सेवा मात्र सुरु होत्या. वीजपुरवठा ही त्यातलीच एक सेवा.

कल्पना करा, वीज पुरवठा करणाऱ्या सेवाही बंद असत्या तर ? सारी गावे, शहरे अंधारात राहिली असती. पाण्याचा पुरवठा देखील टाकीत पाणी न चढल्याने खंडित झाला असता. घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे ही चैन विसरावी लागली असती. आणि आपले जीवन अधिकच कष्टमय झाले असते. पण या लॉक डाऊनमधे वीज मात्र २४ तास सुरु होती. त्यामुळे घरात बसूनही आपल्याला काही प्रमाणात का होईना आनंद लुटता येत होता.

ही वीज निर्मिती केंद्रातून आपल्या घरापर्यंत येण्यासाठी आणि तिचा पुरवठा सातत्याने होण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत असते बरं ? वीज निर्मिती केंद्रात वीज तयार होते. तिथे सबस्टेशनमधे तिला उच्च दाबात रूपांतर करून वीजवाहक तारांद्वारे शेकडो किलोमीटर दूर पाठवले जाते. या तारांना आधार देण्यासाठी मोठमोठे टॉवर्स साधारण दर ३०० मीटरवर उभे केलेले असतात. इच्छित स्थळी पोचल्यावर पुन्हा एकदा सबस्टेशनमधे तिला कमी दाबात रूपांतर करून, मग पुढे लहान लहान रोहित्रांच्या साहाय्याने दाब आणखी कमी करून आणि केबल्सच्या साहाय्याने आपल्या घरापर्यंत आणली जाते.

या संपूर्ण यंत्रणेतील प्रत्येक घटकाची देखभाल करण्यासाठी अनेक निष्णात लोक रात्रंदिवस खपत असतात. यातील सबस्टेशन्स आणि ट्रान्समिशन लाईन्स यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात भारतात अग्रगण्य असलेली जे.बी.एस. इंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ठाण्यातच स्थापन झालेली आहे. भारतातील १८ राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे ती कार्यरत आहे. उच्च दाबाची सुमारे ३३० सबस्टेशन्स आणि ६५०० की.मी.ची ट्रान्समिशन लाईन यांची देखभाल ३००० कामगारांच्या साहाय्याने करत आहेत.

या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. मिलिंद ठेकेदार यांनी ही कंपनी १९८७ मधे स्थापन केली. १९८० साली अलाहाबाद येथील MNNIT मधून इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेले मिलिंद ठेकेदार यांनी पहिली नोकरी
एमएसइबी मधे घेतली. त्या काळी एमएसइबीमधे बहुतेक सर्व कामे एमएसइबीचे कर्मचारीच करायचे. त्यामुळे मिलिंद यांना तेथे ४०० के.व्ही. ची ट्रान्समिशन लाईन डिझाईन करण्यापासून ते उभारण्यापर्यंतचा महत्वाचा अनुभव मिळाला. पण त्यांच्या लक्षात आले की तेथील कामाची पद्धत संथ आणि ढिसाळ होती. त्यांना वाटले की हेच काम जर आपण काँट्रॅक्टवर घेतले तर ते अधिक जलद, स्वस्तात आणि सफाईदार करता येईल. म्हणून एमएसइबीची नोकरी सोडून त्यांनी काँट्रॅक्टवर प्रोजेक्ट उभारणीची कामे घेण्यास सुरवात केली.

ठाण्याच्या कलरकेम कंपनीजवळील सबस्टेशन उभारणीचे एक एमएसइबीचे प्रोजेक्ट त्यांना मिळाले. ठाणे मुंबई भागात कामाच्या अनेक संधी पाहून त्यांनी ठाण्यातच ऑफिस थाटले. प्रोजेक्टची कामे चालू असताना भटकंती खूप होत असे आणि उत्पन्न बेभरवशाचे होते. अशात अचानक त्यांना छत्तीसगड या नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील ८ सबस्टेशनचे संचालन आणि देखभाल (Operation & Maintenance ) करण्याचे काम मिळाले. या कामात नियमित उत्पन्न मिळू लागले. त्या काळात संचालन आणि देखभालीचे काम इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स स्वतःच करत असत. पण मिलिंद यांनी हे काम त्यांना काँट्रॅक्टवर दिल्यास किती स्वस्तात, खात्रीपूर्वक आणि सुरळीत करता येईल हे छत्तीसगडच्या उदाहरणावरून पटवून दिले. त्यामुळे त्यांना दमण आणि दीवचे असेच काम मिळाले. ते आजतागायत सुरु आहे.

तेव्हापासून अविरत कष्ट करून मिलिंद ठेकेदार व त्यांची पत्नी नयन ठेकेदार यांनी या कंपनीची उत्कृष्ट प्रगती घडवून आणली. नयन ही नागपूरच्या मातृसेवा संघातून
मास्टर ऑफ सोशल वर्क झालेली आहे. या अभ्यासक्रमात तिने गडचिरोली येथील आदिवासींमधे मिसळून, त्यांच्या समस्या जाणून घेऊन काम केलेले होते. त्यामुळे जे.बी.एस.मध्ये काम करणाऱ्या तळागाळातून आलेल्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी तिचा सल्ला आजही उपयोगी पडतो.

एकाच ग्राहकाची अनेक राज्यात कामे किंवा अनेक ग्राहकांची एकाच राज्यात कामे अशी वेगवेगळी परिस्थिती असते. तसेच, प्रत्येक ग्राहकाची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे जरी अनेक राज्यात कामाचा व्याप वाढत चालला होता तरी अनेक ठिकाणी शाखा न उघडता, एकाच ठिकाणाहून त्याचे नियंत्रण करणे हे मिलिन्दना अधिक सोयीचे वाटते. शिवाय अशा व्यवस्थेमधे कामात सुसूत्रता, सुसंबद्धता आणणे सोपे जाते. कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकांची एकाधिकारशाही निर्माण होऊ शकत नाही. काम वाढू लागले तसे साईटवरील रोजच्या खर्चाचा हिशोब ठेवणे आव्हानात्मक होऊ लागले. त्यामुळे डिजिटलायझेशन हे अत्यावश्यक झाले.

याची सुरवात साधारण १५ वर्षांपूर्वी केली. स्टेट बँकेकडे खूप पाठपुरावा करून, प्रत्येक कामगाराचे खाते उघडायला लावले. त्यामुळे त्यांचा पगार हा रोखीने न करता थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागला. याचे अनेकविध फायदे झाले. वेगवेगळ्या गावांना रोख पाठवणे, तिचे योग्य वितरण होत आहे कि नाही हे पाहणे, त्याचा हिशोब ठेवणे या सर्व त्रासाच्या गोष्टी नाहीशा झाल्या. शिवाय स्थानिक व्यवस्थापकांना रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचे खर्च करावे लागतात, तेही याच पद्धतीने केले जाऊ लागले.

पण आज घडीला १८ राज्यांमध्ये काम चालू असताना तर तांत्रिक माहिती, रोज होत असलेल्या कामाविषयी माहितीचे संकलन करणे, तिचे पृथक्करण करणे, ग्राहकाला हवे तसे व हवे तेव्हा वेगवेगळे अहवाल देणे या सर्व गोष्टी मोबाईल अँप द्वारा केल्या जातात. हे मोबाईल अँप जे.बी.एस. ने स्वतःच विकसित केले आहे हे विशेष. त्यामुळे बदलत्या गरजांना अनुकूल असा बदल या अँपमधे करण्यासाठी त्यांना कुणावरही अवलंबून राहावे लागत नाही.

ठाण्याच्या अद्ययावत ऑफिसमधील कंट्रोल रूममधे बसून कोणत्या साईटवर काय काम केव्हा झाले किंवा नाही झाले याची खडा न खडा माहिती आता चटकन उपलब्ध होत आहे. शिवाय तीच माहिती ग्राहकाला Real Time मधे उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे संपूर्ण पारदर्शकता आहे आणि म्हणून ग्राहकाचा विश्वासही संपादन झाला आहे.

अशा तऱ्हेने, मॅनेजिंग डायरेक्टर ते ड्रायव्हर असा सुमारे ४५ जणांची टीम ठाण्याच्या ऑफिसमधून कंपनीचा कारभार सांभाळत असते.
यंदाचे, म्हणजे २०२१ चे ‘11th National HR Excellence Awards by CII for strong commitment to HR’ हे त्यांना मिळाले आहे. हे अवॉर्ड भारतातील लहानमोठ्या शेकडो उद्योगांची मानांकित संघटना सी.आय.आय. अर्थात (Confederation of Indian Industry) दरवर्षी देत असते. २०१९ मध्ये जे.बी.एस. ला ‘स्कॉच’ (SKOCH) अवॉर्ड मिळाले होते. तसेच सी.आय.आय. 2019, SME Empowering India 2018 व 2019 ही अवॉर्ड्स देखील मिळाली आहेत.

“लॉक डाऊन मधे अनेक कामगार मोठ्या संख्येने गावी परत जात असल्याची दृश्ये आपण टीव्हीवर पहात होतो. पण आमच्याकडील कामगार मात्र घरी गेले नव्हते. ते साईटवरच राहिले होते. कारण, प्रवास करून घरी गेल्यास त्यांच्या घरच्यांनाच आजाराचा धोका होऊ शकतो हे आम्ही त्यांना पटवून दिले होते.” मिलिंद ठेकेदार सांगत होते, “अशा कठीण काळातही आमच्या साईटवर कामगारांच्या आरोग्याची घेतली जाणारी काळजी, त्यांच्या रहाण्याची व खाण्यापिण्याची सोय याची खबर बाहेरच्या कामगारांना लागल्याने तेही आमच्याकडे कामासाठी येऊ लागले.”

दुर्गम असे पहाडी प्रांत, नद्या, जंगले, वाळवंटे, दलदल, बर्फाचे डोंगर अशा सर्व प्रकारच्या वातावरणात या कामगारांना काम करावे लागते. बिहार, बंगाल, राजस्थान, काश्मीर, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब अशा अनेक राज्यात ही कामे चालतात. या सर्वांसाठी कामाच्या ठिकाणापासून जवळच राहण्याची तसेच जेवणाची सोय कंपनी करते. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन देखील देते. शिवाय, हे उच्च दाबाच्या विजेचे काम असल्याने त्यातील धोके टाळून काम कसे करायचे व सुरक्षित कसे रहायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.

या शारीरिक सुरक्षेबरोबरच त्यांना आर्थिक सुरक्षाही दिलेली आहे. प्रॉव्हिडंट फंड, ESIC आणि त्याचा उपयोग याची सविस्तर माहिती कामगारांना देण्यात येते. त्यासाठी एक खास व्यवस्थापकीय टीम आहे. ESIC चे वैशिष्ट्य म्हणजे कामगार व त्याच्या परिवारातील कुणालाही कोणताही आजार, अपघात आणि अगदी कोरोना झाल्यास सुद्धा त्याचाही खर्च या इन्शुरन्समधून मिळतो.

शिवाय, प्रत्येक कामगारांचे बँक खाते उघडणे अनिवार्य केले आहे जेणेकरून त्यांचा पूर्ण पगार थेट खात्यात जमा होतो व त्यामुळे परिवाराची आर्थिक सुरक्षाही आपोआप होते. या सर्व गोष्टींमुळे कामगारांच्या मनात कंपनीबद्दल विश्वास व आपलेपणा निर्माण होतो व ते बाहेरच्या प्रलोभनांना बळी पडून नोकरी सोडून जात नाहीत.

‘तौक्ते’ आणि ‘यास’ वादळ नुकतेच येऊन गेले. त्याने देशातील अनेक राज्यांमधे हाहाकार झाला. वीजयंत्रणेचे खूप नुकसान झाले. काही टॉवर्स पडले. अशा वेळी जे.बी.एस.च्या मिलिंद ठेकेदार यांना गुजरातमधील यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी तातडीचा फोन आला. ग्राहकाला अशा आणीबाणीच्या वेळी मिलिंद ठेकेदार यांची आठवण त्यांच्या आजवरच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच आली होती.

सामान्य प्रसंगी, आधी सविस्तर बोलणी करून आणि काँट्रॅक्टवर सह्या करून मग काम सुरु केले जाते. पण ही वेळ तशी नव्हती. आणि मिलिंद यांनी जराही वेळ न दवडता ७० कामगारांना विमानाने कोलकाता येथून अहमदाबादला पाठवले. अहमदाबाद विमानतळावर त्यांना घेऊन जायला पुढील व्यवस्थाही केली. इच्छित गावात पोचल्यावर जेव्हा गावकऱ्यांना कळले की हे लोक वीज दुरुस्तीसाठी आलेले आहेत, तेव्हा त्यांनी आपणहून एका दुमजली शाळेत त्यांची रहाण्याची व्यवस्था केली तसेच त्यांना जेवणही दिले. या आतिथ्यामुळे कामगारांचाही काम करण्याचा हुरूप वाढला.

“आम्हाला कोणत्याही राज्यात काम करताना स्थानिकांकडून काही समस्या आल्या नाहीत. काश्मीरबद्दल एवढे बोलले जाते, पण काश्मीरमध्ये देखील काम करण्याची ऑर्डर मिळाली होती त्या वेळी काश्मिरी लोकांनी खूपच सहकार्य केले.” मिलिंद ठेकेदार आपले अनुभव सांगत होते.

आणखी काही नैसर्गिक आपत्तींमुळे वीजयंत्रणेचे नुकसान होते. जवळजवळ दरवर्षी एखादी मोठी नदी आपल्या पात्राची दिशा बदलते. गंगा, गंडक आणि गोमती या नद्यांच्या बाबतीत हे ठरलेलं आहे. अशावेळी आधी पाण्याबाहेर उभे असलेले टॉवर्स पाण्यात येतात आणि त्यांच्या पायाजवळची जमीन वाहून जाते. अशा तऱ्हेने आधार कमकुवत झाल्याने ते पडतात.

पण पडताना ते एकटे पडत नाहीत. तारांमुळे ते आपसात जोडलेले असतात. त्यामुळे या तारांवर खूप ताण येऊन पुढचे मागचे ३-३ टॉवर्स तरी पडतात किंवा वाकडे होतात. अशा वेळी कामगारांना अनेक महिने पाण्यात जाऊन दुरुस्तीचे काम करावे लागते.

कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कंपनीवरच असते.
जे.बी.एस. इंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जे 11th National HR Excellence Award मिळाले आहे त्याची परीक्षा खूपच कठीण होती. पारितोषिक ठरवणारी कमिटी कंपनीतील नुसत्या व्यवस्थापनातील लोकांना प्रश्न विचारीत नाही तर तळातील कामगारांपर्यंत पोचते आणि त्यांना प्रश्न विचारते. एकूण व्यवस्थेबद्दल ती व्यक्ती काय बोलते हे महत्वाचे असते. तसंच वर्षभरातील कामाचा विचार केला जातो. या अवॉर्डसाठी जे.बी.एस. सारख्या लघुउद्योगाबरोबरच Reliance Insurance, HP, SAIL, Vedanta, CLP सारखे मोठमोठे उद्योगसुद्धा प्रयत्न करत होते. टॉप ३० स्पर्धकांपैकी २६-२७ तर उत्पादन क्षेत्रातील होते आणि जे.बी.एस. इंटरप्राइजेस ही सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. या निमित्ताने सेवाक्षेत्रातील कंपन्यांचे देशाच्या उद्योगात असलेले महत्व अधोरेखित झाले आहे.

उद्योजक मिलिंद ठेकेदार हे विदर्भातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री. बजरंग ठेकेदार यांचे नातू होत. अतिशय अल्प काळात माथाडी कामगार ते प्रथितयश ठेकेदार असे यश संपादन केलेल्या श्री. बजरंग यांना महात्मा गांधींच्या विचारांनी भारावून टाकले आणि आपला जोमात असलेला सर्व व्यवसाय भावंडांकडे सोपवून ते गांधीजींच्या कार्यात सहभागी झाले. त्यांच्या नागपूर येथील विशाल वाड्यावर स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांची सतत ये जा असायची. अगदी पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस यांचेही पाय त्यांच्या घराला लागले होते. गांधीजींसमवेत अनेक वर्षे त्यांना राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे गांधीजींची मूल्येही ठेकेदार परिवाराने आत्मसात केली.

मिलिंद ठेकेदार सांगतात की त्यांनी त्यांचा उद्योग सुरु केला आणि इथवर आणला, त्यात त्यांच्या पत्नीचा, नयनचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. उद्योगाच्या सुरवातीच्या काळात अनेक चढउतार असतात. अशा वेळी नयनने स्वतःचे दागिनेसुद्धा विकायला मागेपुढे पाहिले नाही.

सुरवातीला ऑफिससाठी स्वतंत्र जागा नव्हती. मिलिंद यांच्याबरोबर काम करणाऱ्या ८ तरुण इंजिनियर मुलांना ठेकेदार परिवाराने घरातच सामावून घेतले होते. नयन आपल्या सासूला आणि लहान मुलीला सांभाळून ८ इंजिनियर्सना स्वतः स्वैपाक करून वाढत असे. घराला जणू आश्रमाचे स्वरूप आले होते. आज भलेही तीन मजली बंगला उभारलेला असला तरी त्यावेळी छोट्याश्या वन बीएचके घरात ही सर्व कसरत सुरु होती. त्यामुळे या यशाची तीही भागीदार आहेच. अजूनही कामगाराची काळजी घेण्यात तिचा पुढाकार असतो.

ठेकेदार दाम्पत्याची कन्या कल्याणी मोठी झाल्यावर ऑस्ट्रेलिया येथे शिकायला गेली व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स डिग्री तिने संपादन केली आहे. अभिषेक या अत्यंत हुशार तरुण शास्त्रज्ञाशी तिचा विवाह झाला आहे. तिथे दुसरी कोणतीही नोकरी न करता ती ऑन लाईन पद्धतीने जे.बी.एस. एन्टरप्रायजेसला मोलाची मदत करत असते.

अवॉर्डबद्दल अभिनंदन स्वीकारताना मिलिंद ठेकेदार म्हणाले, “शेवटी कामगार हेच आमचे बळ ! जे.बी.एस.चे व्यवस्थापन आणि कामगार हे एकाच परिवाराचे सदस्य आहेत. आम्ही सर्व विश्वासाच्या धाग्याने एकत्र बांधलेले आहोत. म्हणूनच प्रगतीची वाट एकत्र चालू शकतो.”

– लेखन : मेघना साने
– सहलेखन : हेमंत साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. मिलिंद ठेकेदार ह्यांची उद्योजक म्हणून झालेली अत्यंत यशस्वी वाटचाल त्यांच्या मेहनतीचे, सचोटीचे व कर्तृत्वाचे द्योतक आहे.त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

    मेघनाताई, मिलिंद ठेकेदारांची खरी व पूर्ण ओळख आपण व हेमंतजींनी करून दिलीत त्याबद्दल आपले आभार व शुभेच्छा ! 💐💐

  2. तीन हजार लोकांना काम देण्याऱ्या श्री ठेकेदार सरांच्या ,या कामाची, सर्वसामान्य लोकांना काहीच कल्पना नसते, मेघनताई आपण या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा खूप छान शब्दात परिचय करून दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद,आणि मिलिंद ठेकेदार सरांना मनाचा मुजरा

  3. अत्यंत जबाबदारीची कामं निष्ठेने आणि नेटाने पार पाडणारे हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. मिलिंद ठेकेदार सरांच्या कामाकडे पाहताना हे लक्षात येतं की Consumers Protection Act मधील सर्व गोष्टींची योग्य पूर्तता करुन कामगारांचे व ग्राहकांचे हित केंद्रस्थानी ठेवले व उद्यमशीलतेचा आदर्श समोर ठेवला. मेघनाताई व हेमंत साने सरांनी समर्पकरीत्या आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांचे आभार!

  4. खूप छान लेख एक कर्मचारी सुद्धा उद्योजक होऊ शकतो हे तरुणांना स्फूर्ती दायक आहे..

  5. मेघनाताई, मिलिंद ठेकेदार या व्यक्तिमत्वाबद्दल लिहून आपण एका उत्तम उद्योजकबद्दल, उद्योगातील सचोटीबद्दल, आणि कौटुंबिक पाठिंब्याबद्दल वाचकांना माहिती दिलीत. त्यांच्या प्रेरणादायी कार्यास हॅट्स ऑफ आणि पुढील कार्यास शुभेच्छा ! आपणांस अशाच सुरेख लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐💐

  6. मेघना मॅडम, मिलिंद ठेकेदार यांच्यावर तम्ही लिहिलेल्या लेखातून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे कोणतंही काम करताना विशेषतः उद्योग व्यवसाय करत असताना तो नेकीने, सचोटीने आणि पारदर्शकतेने करायचा असतो. हा व्यवसाय करताना घरच्या माणसांचा पाठिंबा आवश्यक असतो ज्यामुळे व्यवसाय आणखी भरभराटीला येतो. ठाण्यातील एका यशस्वी उद्योजकाचा तुम्ही उत्तम परिचय करून दिला आहे ‌‌ धन्यवाद. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?