Tuesday, June 3, 2025
Homeबातम्याकारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन : कारगिल योद्ध्यांचा राजभवनावर सन्मान

हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, असे सांगताना देशाचे शूरवीर जवान व अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य’…कारगिल संघर्ष‘ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

पुस्तकाच्या लेखिका, अनुराधा गोरे.

कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यपाल म्हणाले की भारताला शांती हवी असली तरीही शत्रू राष्ट्रांनी देशाला वेढले आहे ही वस्तुस्थिती विसरता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सन १९६२ साली आपण विद्यार्थी दशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले आपण पाहिले आहे. खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहिद झाले होते असे राज्यपालांनी सांगितले.

कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले. ‘अशक्य ते शक्य’ हे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्र विजेते हवालदार दिगेन्द्र सिंह, हवालदार दीप चंद, घातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वे, हवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण, स्क्वाड्रन लीडर राहुल दुबे, कॅप्टन रुपेश कोहली, कॅप्टन विद्या रत्नपारखी, सविता दोंदे, कर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा सत्कार करण्यात आला.

लेखिका अनुराधा गोरे यांनी ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे धनंजय गांगल व सुदेश हिंगलासपुरकर यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, अनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्र संचलन केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

– लेखन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आज कारगील दिनाच्या निमित्ताने भारताच्या कारगील युध्दात शहीद झालेल्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवाराला मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on हेच विसरूनी जाई
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम