जीवन ; असे कसे….
अहमदाबाद येथे काल झालेल्या एअर इंडिया च्या भीषण अपघाताच्या बातमीने मन सुन्न विषण्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, भीषण अपघात, त्यात शेकडोची मनुष्य हानी या बातम्या माणसाला तात्पुरत्या बधीर करणाऱ्या असतात. अशा वेळी काही सुचेनासे होते. सगळे तर्क निरर्थक ठरतात. आपले शहाणपण, आपला विवेक आपलीच कीव करायला लागतो. अशा घटनांचे विश्लेषण करणे देखील कठीण असते. वेद पुराण ग्रंथातील तत्वद्न्यान देखील अपुरे पडते अशावेळी.
नवे शोध, नवे तंत्रद्न्यान यामुळे आपले जीवन सुलभ, सुखदायी झाले खरे. पण शेवटी हे सगळे मानव निर्मित. म्हणजे चुकांची शक्यता गृहीत धरणे आलेच. मुळात विद्यान हे अनिश्चिततेच्या पायावर उभे असते. कालचे विद्यान आज खोडून काढले जाते.
हे तंत्रज्ञानाचे झाले. पण आपले स्वतःचे तरी भविष्य कुठे कुणाला माहिती असते ? या प्रवाशांचा, वैमानिक, कर्मचारी यांच्या सह प्रवास सुरू झाला तेव्हा त्यापैकी कुणालाही कल्पना नसेल की आपले आयुष्य आता पाचच मिनिटांचे आहे. पाच मिनिटात सगळे काही संपणार आहे. त्या विमानातील दुर्दैवी प्रकाशाच्या आयुष्यातील त्या शेवटच्या पाच मिनिटांची कल्पना करा.. कोण काय काय विचार करीत असेल ? परदेशी नागरिक उत्सुक असतील काही तासात घरी पोहोचण्यासाठी. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी. काही पर्यटनासाठी, कामासाठी निघाले असतील. काही नव्या उद्योगाच्या, प्रकल्पाच्या कामासाठी प्रवास करीत असतील. कर्मचारी पंधरा मिनिटात बेल्ट काढून प्रवाशांना सेवा देण्याची वाट बघत असतील. काहीना विमानतळावर सोडायला, निरोप द्यायला आलेली मंडळी घरी परतीच्या मार्गावर असतील. त्यांचा प्रवास सुखाचा होवो अशा प्रार्थना करत असतील मनातल्या मनात !
पण कुणाचेच काही खरे ठरले नाही. सगळ्याचे अंदाज चुकले. आपले आयुष्य, भविष्य सगळेच किती अनिश्चित, अकल्पनीय आहे याची कल्पना येते अशा घटनांवरून.
माझ्या प्रमाणे सगळा देश, सगळे जग हळहळले असेल या दुर्दैवी भीषण अपघाताच्या घटनेने. अशा घटना आपल्याला आपल्या आत डोकवायला भाग पाडतात. आपलेच परीक्षण करायला मजबूर करतात. आपल्या पैकी प्रत्येकाला वाटते की माझेच दुःख मोठे. माझ्यावरच देव नेहमी अन्याय करतो.सगळे दुःख माझ्याच नशीबी येते. मीच कमनशिबी ! बाकी सगळे जग सुखी आनंदी. सगळ्यांना सगळे मिळते. प्रत्येकाला देव हवे ते, हवे तितके देतो. आपलीच झोळी फाटकी.. आपल्या पदरात हवे ते हवे तितके कधीच पडत नाही. आपल्याच बाबतीत देव पक्षपात करतो. आपल्यालाच तो सुखापासून वंचित ठेवतो. आपल्यात काही कमी नसताना, आपली क्षमता असताना, आपण परिश्रम करूनही आपल्याला मिळते ते फक्त अपयश.फक्त दुःख !
आपण हेच रडगाणे गात चांगले आयुष्य वाया घालवतो. त्याचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. आपण रागीट होतो. विना कारण आरडाओरड करायला लागतो. आपला संताप होतो. तो राग, संताप आपण घरच्यावर काढतो. मित्रावर काढतो. तो कामाच्या ठिकाणी देखील नकळत उफाळून येतो. आपले काम, करीयर बिघडते त्यामुळे. परिस्थिती सुधारण्या ऐवजी अधिकाधिक बिघडत जाते. आपल्याच हाताबाहेर जाते. या सगळ्याचा मग आपल्या शरीरावर, प्रकृतीवर देखील स्वाभाविक परिणाम होतो.
हे न संपणारे दुष्ट चक्र आहे हेच आपल्याला कळत नाही. कारण आपले आपल्यावर नियंत्रण नसते. अन् दुसऱ्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत देखील आपण नसतो. अशा अचानक घडणाऱ्या घटना मात्र आपल्याला “तुला शिकवीन चांगला धडा” अशी तंबी देणाऱ्या असतात. आता या अपघातात मृत झालेल्यांच्या नशिबाची कल्पना करा. कुणाचा काय दोष होता की त्यांना अशा अनपेक्षित दुर्दैवी पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा मिळावी ? त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रांची, सहकाऱ्यांची कल्पना करा. त्यांनी काय पाप केले की आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या भयंकर अघटीत पद्धतीने घडलेल्या मृत्यूचे दुःख, असहनीय वियोगाचे दुःख त्यांच्या ओंजळीत पडावे ? तेही ध्यानी मनी नसताना ? हा असा विचार केला की मग आपल्याला समजेल. आपण कितीतरी सुखी आनंदी आहोत.. आपण जिवंत आहोत. आयुष्य एन्जॉय करतो आहोत. आपल्या नशिबात ज्याला आपण दुःख, अपयश म्हणतो ते काहीच नाही या भयंकर अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकां च्या दुःखा पुढे ! त्यांना तर त्या गेलेल्या व्यक्तीचे शव देखील दिसणार नाही. अन्त्यदर्शन देखील घेता येणार नाही. त्या व्यक्ती शिवाय जगण्याचे, प्रेमळ, लळ्या जिव्हाळ्याच्या संबंधाला कायमचे मुकण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले ! काय गुन्हा होता त्यांचा ? काय पाप केले होते त्यांनी ? हे अशा वियोगाचे दुःख कल्पनातीत असते. त्यापुढे आपले दुःख, आपले अपयश, आपल्या जीवनातील अभाव काहीच नाही. अगदीच क्षुल्लक.. असा विचार करायला आपण शिकले पाहिजे.
देव संतुलन राखतो नेहमी या जगात, निसर्गात. त्यासाठी नव्या जन्माला, नव्या जीवाला जागा करून देण्यासाठी कुणाला तरी जावे, संपावे लागते. अर्थात हे अशा रीतीने आयुष्य संपणे केव्हाही वेदनादायीच. शेवटी वेदना संवेदना, आनंद दुःख या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. दुःख हे शेवटी दुःखच असते. कुणाचे तोळा भर कुणाचे मणभर असे काही नसते. आयुष्यातील असे अपघात, अशा घटना आपल्याला खूप काही शिकवून जातात. मुख्य म्हणजे आपला माज उतरवतात. आपण चंद्रावर गेलो,आपण हे केले, एवढे शोध लावले, एव्हढी झेप घेतली हा जो भ्रमाचा भोपळा आहे तो अशावेळी चटकन फुटतो. हवेत उडणारा आपल्या अभिमानाचा, गर्वाचा फुगा टचकन फुटून खाली येतो. आपले विमान कोसळून जमिनीवर आदळते.. त्या एअर इंडिया च्या विमानासारखेच !! आपण देव नाही माणूस आहोत ही जाणीव करून द्यायला, आपले डोळे उघडायला या अशा घटना पुरक ठरतात. आयुष्य हा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे हा धडा ही मिळतो यातून.
या सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी होताना, त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण हे सगळे भान ठेवले पाहिजे. जीवन हे असेच असते हे सत्य स्वीकारले पाहिजे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800