भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
– संपादक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांगीण कार्यात त्यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कार्याचा अविस्मरणीय वाटा दिसून येतो. ‘शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार आहे.’ हा मंत्र बाबासाहेबांनी स्विकारला होता. ते स्वत: उच्च विद्याविभूषित होते. एम.ए., पीएच. डी., एल.एल.बी. बार ॲट लॉ, बॅरिस्टर अशा उच्च पदव्या त्यांनी मिळविल्या होत्या.
तत्कालीन समाजव्यवस्था जातीयतेने पोखरलेली होती. शिक्षण ही सवर्ण वर्गाची मक्तेदारी असल्याने बहुजणांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते. त्याही परिस्थिती अस्पृश्यतेचे चटके सहन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. ज्यांचे जगणेच प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले होते, अशा व्यवस्थेच्या गर्तेतून बाहेर यायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे मर्म बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीतूनच त्यांची शिक्षण विषयक भूमिका विकसित झालेली दिसून येते.
बाबासाहेबांनी आपल्या विविध ग्रंथसंपदेतून सातत्याने शैक्षणिक प्रबोधनाचा प्रयत्न चालविलेला होता. विद्यार्थी वर्गासाठी त्यांचे विचार दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हा.’ या लेखात त्यांनी शिक्षणाच्या काळातील क्षण अन् क्षणाचे महत्त्व विशद केले असून विद्यार्थी जीवनात विद्यार्थी आपले कर्तव्य व जबाबदारी कशी पार पाडतात यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून असते यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
विद्यार्थ्यांच्या ज्ञान लालसेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “जगात एवढे ज्ञान आहे की, एखाद्याने आयुष्यभर जरी शिक्षण घ्यायचे ठरविले तरी फार झाले तर ज्ञानसागराच्या पायथ्याशी गुढघाभर पाण्यात आपण पोहोचू शकू.” शिक्षण घेत असताना विद्यार्थी वर्गाने दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. बुध्दीमत्तेत आणि कार्यक्षमतेत आपण कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच व्यक्तिगत सुखापेक्षा आपला समाज स्वतंत्र, स्वावलंबी व सन्माननीय कसा होईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे असे विचार त्यांनी आपल्या शैक्षणिक विचार मंथनातून व्यक्त केले आहेत.
शिक्षण घेवून तरूणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वत: साठी न करता समाजासाठी केला पाहिजे यावर बाबासाहेबांचा भर होता. शिक्षणाने केवळ स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे भागले असा संकुचित विचार न करता आपल्या समाजाचा सर्वांगीण उध्दार व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा पध्दतीची समाजभिमुखतेची जाणीव नव शिक्षितांना करून देण्यास ते विसरत नाहीत.
शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे आहे. ती कशी चालवायची हे ती वापरणाऱ्यावर अवलंबून असते. शिक्षणाने चांगलेही करता येते आणि वाईटही करता येते, हे सांगताना बाबासाहेबानी शिकलेल्या माणसापासूनच समाजाला खरा धोका असल्याची भिती व्यक्त केली होती. कारण, सुशिक्षित लोक इतरांना कसे फसवायचे ते अधिक जाणतात म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुशिक्षित लोकांना आपल्या शिक्षणाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करा आणि समाज विकासाचे स्वप्न साकार करा असे आव्हान केलेले दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व्यवस्थेत चारित्र्य आणि विनय याला फार महत्त्व दिले. चारित्र्यहिन व विनयहिन सुशिक्षित माणूस हा पशुपेक्षा भयंकर असतो. जर सुशिक्षित मनुष्याचे शिक्षण गरीब जनतेच्या हितास बाधा आणत असेल तर तो समाजाला शाप ठरतो. म्हणून शिक्षण शाप की वरदान ? या प्रश्नांचे उत्तर त्या व्यक्तीच्या चारित्र्य आणि विनयात दडलेले असते असे ते म्हणतात.
शिक्षण संस्थेसंदर्भात आपली भूमिका मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्थेला एक पवित्र संस्था मानली आहे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने आहेत. या कारखान्याचा जबाबदार घटक जेवढा शहाणा असेल तितका उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडणार आहे. याची जाणीव ठेवून शिक्षणाचे उदात्त कार्य सुरू ठेवले पाहिजे,अशी त्यांची भूमिका होती.
शिक्षकासंदर्भात विचार मांडताना बाबासाहेब म्हणतात, शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा शिक्षकवर्ग असतो. तो राष्ट्राचा सारथी असतो. म्हणून बुध्दीमान, उदात्त, निपक्ष:पाती थोर मनाचे शिक्षकच राष्ट्राचा स्वाभिमान उंचावत असतात. म्हणून शिक्षकाचे स्थान इतरांपेक्षा उच्च असते. त्याचे भान ठेवल्यास खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उद्देश सार्थक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली दिसून येते.
सुशिक्षित तरूणांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणतात, ‘सुशिक्षित तरूणांनी कोणत्याही कुबड्या न घेता स्वावलंबी जीवन जगावे, स्वत:च्या बुध्दीवर विश्वास तिचा उपयोग करावा, विवेक बुध्दीला शरण जावे. जगात ज्ञानापेक्षा पुज्जनिय असे काहीही नाही. तसेच कोणीही मनुष्य जन्मत:च मंद बुध्दीचा नसतो. तुम्हीच तुमच्या भाग्याचे शिल्पकार आहात.’
आपल्या विविध लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे, ‘ महिलांनो आपल्या मुलांना शिक्षण द्या, त्यांच्यात महत्वकांक्षा निर्माण करा त्यांची लग्ने लवकर करण्याची घाई करू नका, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही.’ या विचाराची कास धरण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयीचे उत्कट प्रेम त्यांची ज्ञान संपादन करण्याची जबरदस्त ज्ञानलालसा आणि त्यासाठी पडतील ते कष्ट सोसण्याची त्यांची तयारी अगदी विद्यार्थीदशेपासूनच होती. पावाच्या एका तुकड्यावर व कॉफीच्या एका कपाच्या आधाराने अठरा-अठरा तास अध्ययन करून लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स या जगप्रसिध्द संस्थेत अथक अभ्यास करून डी. एस्सी सर्वोच्च पदवी मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले पुरूष होते. हे आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले तर फार मोठा आदर्श त्यांच्यापुढे उभा राहिल यात शंका नाही.
आपल्या शैक्षणिक विचाराला मूर्त रूप देण्यासाठी व गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेत प्राचार्य, प्राध्यापकांच्या नेमणुका करताना त्यांनी गुणवतेला विशेष महत्त्व दिले या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात, माझ्या राजकीय पक्षात मी कोणाचीही नियुक्ती करेन पण शिक्षण संस्थात मात्र गुणी, ज्ञानी आणि लायक मंडळीनांच नेमणार त्यावेळी जातीचा, प्रांताचा किंवा धर्माचा विचार करणार नाही.
औरंगाबाद येथे असताना कॉलेजच्या प्रगतीकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे विद्यार्थी, प्राध्यापक काय वाचतात व कसे शिकवितात हे डॉ. बाबासाहेब मुद्दाम पाहत असत असेच एकदा प्राध्यापक कक्षात बसले असताना इतिहासाचे प्राध्यापक गुप्ते यांना त्यांनी प्रश्न केला. “इतिहास म्हणजे काय ? मला इतिहासाची व्याख्या एका शब्दात सांगा प्रा.गुप्ते व प्रा. महाजन यांनीही इतिहासाची व्याख्या सांगितली पण ती एका शब्दात नव्हती शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कथन केले. ”आज मी तुम्हाला एका शब्दात इतिहासाची व्याख्या सांगतो आणि एकच शब्द त्यांना उच्चारला तो म्हणजे ‘बदल’ आणि त्या शब्दाच्या अनुरोधाने चेंज म्हणजे केवळ राजकीय बदल नव्हे तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदल म्हणजे इतिहास असे सुरेख वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक तळमळ ही त्यांच्या चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर दिसून येते. मुंबई विधिमंडळाचे सदस्य असताना प्राथमिक शिक्षण कायद्यावर 1938 साली प्रखर टिका करताना ते म्हणतात. चरखा हा शिक्षणासाठी माध्यम म्हणून मूलोद्योगाचे प्रतीक म्हणून स्विकारल्याने बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होईल त्यांचा शैक्षणिक दर्जा खालावेल अशी भीती व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी त्यातून शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दरी रूंदावेल असे म्हटले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली स्वतंत्र मजूर पक्षाच्यावतीने निवडणूक जाहीरनाम्यात शैक्षणिक प्रश्नाबाबतचे धोरण मांडले होते. पूर्ण आणि सक्तीचे शिक्षण व तांत्रिक शिक्षण यावर त्यांचा विशेष भर होता. शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजात सरकारी मदतीने शिष्यवृत्या देण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक चिंतन केजी – टू – पीजी अशा सर्व शिक्षणप्रक्रियेबाबत होते. शिक्षण हाच मानवाच्या प्रगतीचा मूलगाभा आहे असा ठाम विश्वास वारंवार व्यक्त करतानाच वंचित समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गरजा भागविले ही सरकारची प्राथमिक कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्ट केले होते.
आजच्या शिक्षणपध्दतीतील खाजगीकरण, विनाअनुदान अल्प मानधन, वशिलेबाजी, भ्रष्ठाचार, चारित्र्यहीनता, वेठबिगारी, शिक्षण व शिक्षकांच्या बाबतीत असलेली सरकारची उदासिन धोरणे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार व कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात.
प्रा. डॉ. सोमानाथ कदम
– लेखन: प्रा डॉ. सोमनाथ कदम
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800