Monday, June 16, 2025
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : ६

नर्मदा परिक्रमा : ६

आज 1 नोव्हेंबर 2022 आज परिक्रमेचा चौथा दिवस. आज पूर्ण रात्र प्रवास करुन आम्ही मध्य प्रदेश – गुजरात च्या सीमेवरील शूलपाणेश्वर (राजपीपला) इथे आलो.

शूलपाणेश्वर हे मंदिर1991 सरदार सरोवर धरणाच्या निर्माणाच्या वेळी पाण्याखाली गेले. 1994 ला गुजरात सरकारने नवीन शूलपाणेश्वर मंदिर बनवले. आज मैय्या च्या पाण्यात स्नान केले आणि आम्ही परतलो. रोज सकाळची मैय्या ची पूजा केली.पंडित अनयजी ने शूलपाणेश्वर जागेचे महत्त्व सांगितले. शूलपाणेश्वर जंगल (झाडी) तीन महाराक्षसांची तपोभूमी असल्याने तिथे नकारात्मक उर्जा आहे. त्या बद्दल सांगत असताना पंडित अनयजी म्हणाले की आज एकमेकांशी प्रेमाने वागा.ह्या जागेवर तुम्हाला राग, क्रोध येऊ शकतो. थोडं सांभाळून रहा. आम्ही थोडे सावधच होतो. रात्री आमची बस इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंप वर थांबली असता पेट्रोल पंप वर भांडण झाले. ह्या भूमी वर असं घडत ही महादेवाची आज्ञा आहे. कशी ? हे ते स्थान आहे जिथे महादेवाला चिंतामुक्त केले होते.

शूलपाणेश्वर मंदिर

शूलपाणी शूल- म्हणजे त्रिशूल आणि पाणी म्हणजे हात. भोलेनाथाच्या हातातील त्रिशूलच चिंतेचे मुख्य कारण आहे. भोलेनाथ हे नावच असं पडलं आहे. हा देव खरोखरच भोळा आहे “भोळा शंकर”.जर महादेवाची आराधना नागाने केली तर आपल्या पुढे नाव जोडतो “नागेश्वर”. इंदूर येथील टेलिफोन एक्सचेंज जवळ आहे तर नाव आहे “दूरसंचारेश्वर”. इलेक्ट्रिक ऑफिस च्या जवळ आहे तर “विद्युतेश्वर”. असा हा आपला भोळा शंकर, सांब सदाशिव.सगळे मानव ब्रम्हाचे मानस पुत्र असल्यामुळे ब्राह्मण आहेत. मानस पुत्र म्हणजे मनाने प्रकट झालेले. अश्या ब्रम्हाचा मानस पुत्र ऋषी कश्यप ज्याने अनेक विवाह केले. त्यांच्या दोन प्रमुख पत्नी होत्या. एक दिती दूसरी अदिती. दिती तामसी वृत्तीची होती म्हणून तिचे पुत्र दैत्य. अदिती सात्विक वृत्तीची होती म्हणून तिचे पुत्र आदित्य. (12 सुर्य कल्पांत झाले तर ते ह्या पृथ्वी चे जल शोषण करतात). दैत्य पुत्राचे नाव होते अंधक. ह्या अंधकाच्या मनात आले राज्य करावे. त्याने एक हजार वर्षे एका पायावर उभे राहुन तपश्चर्या केली. त्याच्या घोर तपश्चर्येने धूर निघत होता. त्यावर शिव शंकर प्रसन्न झाले आणि त्या पर्वतावर आले जिथे अंधक तप करत होता. म्हणाले, “बोल वत्स तुला काय वरदान हवे ?” अंधकासूर म्हणाला, “भोलेनाथ माझ्या समोर कोणी जिंकता कामा नये, “पार्वती माता बोलली द्या त्याला जे मागतो ते”. भोलेनाथ म्हणाले, “मी असा वर देऊ शकत नाही कारण त्याचा उद्देश चूकीचा आहे” पार्वती माता बोलली, “द्या त्याला जे हवे ते” नंतर भोलेनाथ बोलले, “मी तुला सर्व काही देऊ शकत नाही परंतु विष्णू भगवान सोडून तुला कोणी पराजीत करु शकत नाही”.आणि भोलेनाथ अंतर्धान पावले.

अंधकासूर आपल्या नगरात गेला‌. त्याने हाहाकार माजवला. इंद्र देवाचे सिंहासन डळमळू लागले. त्या घमेंडखोर माजलेल्या राक्षसाने शंकराला युद्धासाठी आवाहन केले. भगवान शिव शंकरांना आपणच दिलेल्या वरदानाचा पश्चात्ताप झाला. आणि ते स्वतः युध्द करण्यास गेले. त्या युध्दा नंतर आपले त्रिशूळाने प्रहार करुन शंकराने अंधकासूराला जखमी केले. जमिनीवर पडून अंधकासूर शंकराची प्रार्थना करु लागला, ‘क्षमा करा भोलेनाथ हा त्रिशूळ भयंकर वेदना करत आहे,” त्याला त्या स्थितीतही प्रार्थना करताना पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि आपल्या गणांमध्ये (विशेष भक्त) त्याला समाविष्ट केले. आणि शंकराने त्याचं नाव ठेवले “भृंगीश”. तो म्हणाला, “आता नाव ठेवले तर काम पण सांगा”. मग भोलेनाथाने आज्ञा केली की “माझी कन्या नर्मदा तिथे तु जा आणि त्या वनांचे संरक्षण कर.जे मनुष्य तिची परिक्रमा करण्यासाठी येतात त्यांना कष्ट द्यायचे”. भृंगीशने विचारले त्याचा उद्देश ? तेव्हा शिव‌ शंकर उत्तरले, “परिक्रमा मोक्षप्राप्ती साठी केली जाते जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. त्या साठी मानवाला परिक्षा द्यावी लागेल जो ही परीक्षेतून बाहेर पडेल तो परिक्रमावासी ठरेल”. आज्ञा घेऊन भृंगीश निघून गेला.

परंतु त्रिशूळाला लागलेले भृंगीशाचे रक्त कोणत्याही पाण्याने स्वच्छ झाले नाही. भोलेनाथ विष्णू भगवान कडे गेले. “हे रक्त कसे साफ करु ?” आणि जर त्रिशूळ स्वच्छ निर्मळ झाला नाही तर काहीच कामाचा नाही” भोलेनाथ चिंतेत पडले. भ्रमण करु लागले ह्या पर्वतावर आले आणि जमिनीवर त्रिशूळ आपटला, जोरदार धारा प्रकट झाली आणि त्रिशूळ स्वच्छ झाला. त्यानंतर बाबांचे नाव पडले “शूलपाणी” आणि ते वन भृगुवन म्हणून ओळखले जाऊ लागले आता त्या वनाला शूलपाणेश्वर नाव आहे.

स्वामी नारायण मंदिर पोयचा

दूपारच्या भोजनानंतर आम्ही शूलपाणेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी निघालो. तिथून गेलो स्वामी नारायण मंदिर (पोयचा). ह्या मंदिराचे अद्भुत बांधकाम आहे. राजपीपला तहसील नांदोद इथे 105 एकर जागेवर हे भव्य मंदिर निळकंठधाम आपली भव्यतेची ग्वाही देत उभे आहे. मुख्य आकर्षण शेषनागा सोबत विष्णू, गणपती श्रीकृष्णाच्या आकर्षक मनमोहक मूर्ती आहेत. कला कौशल्याने समृद्ध हे मंदिर भारतीय संस्कृतीला सुंदर प्रदर्शित करते. तिथून पुढे आम्ही गेलो गुमान देव सिध्द हनुमान मंदिराचे दर्शन करण्यासाठी. ह्या मंदिरात निरंतर नापजप चालू असतो. खुपच प्रसन्न वातावरण होते. उद्या आम्हाला समुद्र यात्रा करायची होती. आज आम्ही अंकलेश्वरला थांबलो.

गुमान देव सिध्द हनुमान मंदिर

आज इथे आपली आज्ञा घेते. पुढील भागात समुद्र यात्रेचे अनुभव सांगेन.
काल‌ हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर
क्रमशः….

सुलभा दिवाकर

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?