“दूर्गीचे ऋणानुबंध”
दूर्गी आमच्या गावात कधी आली माहिती नाही. म्हणजे आठवत नाही. पण गोरे कुळात ती लग्नानंतर कोकणवासी झाली. त्या आधी ती सांगली कोल्हापूरकडची होती. रूप रंग सद्रृढतेमुळे गोरे यांच्या घरात पडली ती कायमची कोकणी झाली.
दुर्गी सगळ्यात मोठी सुन. तिच्याखाली तीन दिर व एक नणंद होती. सासू पलंगावरच होती. सासरे जाऊन सात वर्ष होऊन गेली होती. लग्न झालं आणि ही त्या घराशी बांधली गेली. सदैव घर घरपण व घरकाम याखेरीज दुसरा विषय नसे. इतकी घरात रमुन गेली. तीच कर्ती असल्याने जरब पण घरावर तिचीच चाले. एरवी सगळ्यांचे शिस्तीत पण मायेने चांगलेच करी. खाणे पिणे औषधपाणी, शिक्षण सारे मनापासुन करे पण आळस जरा चालवून घेत नसे.
अशा या आत्मकेंद्रित, शिस्तप्रिय बाईने अनेक वर्ष इमाने इतबारे घर चालवलं. तसं आंबा सुपारी तांदुळ भाज्यांचे ऊत्पन्न पुष्कळ येई.
निटनिटके घर चालवून ती ते पुरवत असे. घराला फार जपत असे. कोणी वाईट साईट बोलू नये, कोणी घराकडे वाईट नजरेने पाहू नये घर शांत असावे अशीच तिची सारी धडपड चालू असे. बिचारीला मुलबाळ झालेच नाही आणि दूर्दैवाने कावीळीच्या साथीत खुप प्रयत्न करूनही नवरा पण देवाघरी गेला. काही दिवसात आधीच आजारी असलेली सासूही गेली. सारे घर हिलाच सांभाळावे लागे.
नणंदेला शिकवून चांगले घर मुंबईत बघुन दिले. तिचे कैकवर्षे हिने चांगले माहेरपण केले. दोन बाळंतपणे छान केली. एकेक दीर शिकत बाहेर नोकरीला लागला. काही वर्षात लग्न करून शहरात स्थीर झाले. ही एकटीच आता घरात ऊरली. पण घर म्हणजे दुसरा प्राण होता. लग्नानंतर या घराशी जे नाते बांधले गेले ते तिला प्राणाहुन प्रिय होते व ती ते नाते जिवापाड जपत होती.
दिर व्यवस्थित घरी पैसे पाठवत. या आता वयस्कर झालेल्या वहिनीची काळजी घेत. अधुन मधुन जात व काही घराची कामे करून घेत. म्हणजे तसा हिचा हुकूमच असे.
कोलं फुटणे, एखादी भिंत तडे गेलेत, पाण्याचा नळ, रंग यात दुर्गी जराही चालढकल चालुन घेत नसे. ‘आपली वास्तु’ असं ती घराला संबोधीत असे.
येणारा जाणारा तिचे कौतुकच करत असे. बाहेरच्या पडवीत बाहेरच्या आदीवासींसाठी ताकाचा छोटा माठ ठेवण्याची प्रथा तिने अजुनही चालू ठेवली होती. कोणी बाळंतीण, आजारी असेल तर डब्यात लोणचं, मेतकूट, तूप, घरगुती औषध, घरच्या भाज्या तांदुळ अगदी आवर्जुन देत असे. नव्या जोडप्याला आहेर ओटी, बाळंतिणीला बाळंतविडा सगळं कसं ‘घरपण’ म्हणुन सांभाळत असे. घरची नोकर, गडी माणसे हिच्याकडचं खाऊन पिऊन घराशी बांधलेली होती. गांव व घर हिचे आणि ही त्या घराची व गावाची. अगदी जिवापाड जपलेलं नातं होतं. कोणी छान पास झालं आणि हिने कौतुक नाही केलं असं कधी घडलंच नाही.
लग्नकार्यात दुर्गीच्याच घरची भांडी, पिंप, गाद्या ताट पाट वाट्या सगळंच पोचतं होई पण पुन्हा सारे मोजुन घेतले जाई.
घर मोठे त्यामुळे कोणी कामानिमित्त गावात जरा जरी ओळखीचे असले तरी हे ‘घर’ त्यांना आपलेसे करून घेई.
हळुहळू ते घर गोरेंचे घर न म्हणता दूर्गाक्काचे घर असं ओळखू लागले. तिला दुर्गी म्हणणारी पिढी देवाघरी गेली पण दुर्गाक्काही तितकीच जिव्हाळ्याची व घर आणि घराच्या परंपरा जपणारीच राहिली.
आता दुर्गाक्का थकायला लागली. सकाळ दुपार घराभोवती फेरी, बागकाम, भाज्या लावणे पाहुण्यांची ऊठबस होईनाशी होऊ लागली पण सगळ्यावर मात करत दुर्गाक्का घर जपत राहिली. दिर नणंद यांचे संसार व जबाबदार्या वाढल्या व ते येईनासे झाले. पण ही मात्र जरबेने आमराई, शेती व घर गडी नोकरांकडुन सांभाळत राहिली. इतका जीव होता तिचा त्या घरावर व घराचा तिच्यावर कि, अनेक वेळा बोलाऊनही ती घर सोडुन कधीही कूठेही गेलेली नाही.
आताशा दुर्गी एकटीच खाटेवर पडुन राहायची. आता ही वास्तु कशी आणि कोण सांभाळणार ? तिला मन खात असे. ती खंत ती दिरांना बोलुनही दाखवे पण त्यांनाही गावी येऊन राहाणे शक्य नसे.
गावातील माणसे मायेने जोडलेली होती. सारे गांव तिच्या हाकेला खाली पडू देत नसे. ती सांगेल ते निमुटपणे करत असे. तिच्यापुरेसा भात रोज तिच्या वास्तुत शिजलाच पाहिजे, रोज देवघरात नंदादिप तेवलाच पाहिजे हे असे दंडक ती जिवाचा आटापिटा करून पार पाडत असे. दहीभाताचा कावळ्याचा घास आणि वास्तूचा नैवेद्य कधीही चुकवला गेला नाही. घराची स्वच्छता व रूप याला धक्का लागला नाही.
एक दिवस अचानकच छातीत कळ येतेय हे कळेतोपर्यंतच दूर्गाक्काने मान टाकली. या वास्तूने तिला कधीही आजारी पाडले नाही… ऊपाशी ठेवले नाही.. तिचा अपमान होऊ दिला नाही. सदैव ती मालकिण म्हणुनच पण तोरा डामडौल न पाळता राहिली. तिला कधी काही कमी पडलं नाही. घर आणि ती यांचे ऋणानुबंध कायम राहिले. दिर आले नंतर गावकर्यांनी तिचे सारे सोपस्कार दिवसपाणी पार पाडले. घराला कुलूप लागलं व सारे पुन्हा शहरात निघुन गेले.
दुर्गाक्काच्या इच्छे प्रमाणे घरातील वस्तू ज्यांना ऊपयोगाच्या आहेत त्या गरजुंना वाटुन टाकल्या. पगार बंद झाले तरी घरगडी अंगण झाडून जात. ऊगवलेलं गवत काढुन जात.
गावातुन मोठा रस्ता जाणार होता. नेमके दुर्गाक्काचे घर त्यामधे येत होते. आलेल्या नोटीस प्रमाणे दिरांनी मोठ्या जड अंत:करणाने घराची जमिन सरकारला दिली. आमराई शेती विकण्याचे विषय झाले. दोन महिन्यात घर पाडले गेले. गावासाठीचे शेवटचे देणे म्हणजे दुर्गाक्काचे काळिज होते. आता कोणालाच घराची काळजी करायची गरज न्हवती. दुर्गीच्या मागे वास्तुनेही मान टाकली होती.
दिर बघतच राहिला… पहिली पहार पडली आणि लग्नानंतरचा दुर्गी व नवऱ्याचा टांगलेला फोटो खळकन् खाली पडला. काच फुटली फ्रेम तुटली. वास्तू आणि दूर्गीचे असलेले अनोखे नाते कायमचे तुटले. पण गावात आजही दुर्गाक्का व तिचे घर यांची जिव्हाळ्याने चर्चा होते.

— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800