मराठवाडा प्रदेश दीर्घकाळ निजामी राजवटीखाली राहिला. त्या काळातील अत्याचारी रझाकार चळवळीलाही निजामाने बळ दिले. परिणामी, निजामाची जुलमी राजवट, जाचक कायदे आणि रझाकारांची क्रूरता, खेड्यापाड्यांतील महिलांवर अनन्वित अत्याचार, जाळपोळ, दंगली वगैरेंना प्रोत्साहन मिळत गेले. मस्तवाल, शिरजोर आणि उन्मत्त राज्यकर्ते आणि फॅसिस्ट वृत्तीची राक्षशी रझाकारी भुतावळ यांच्या कचाट्यात मराठवाड्यातील जनता सापडली. लढ्याच्या अखेरच्या टप्प्यात तर, निजामाच्या आणि रझाकारांच्या विरोधात पेटलेला मराठवाड्यातील सामान्य जनतेचा हा वणवा जगाच्या इतिहासात नोंद व्हावी, असा सशस्त्र लढा ठरला. या धगधगत्या यज्ञात समिधा टाकण्याचे मोलाचे योगदान निजामकालीन वृत्तपत्रांनी केले. निजामकालीन पत्रकारितेचा हा इतिहासच मुळी राजनैतिक प्रेरणेचा, अस्मिता पुनर्जागरणाचा आणि वैचारिक व सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे.
‘ टाइम ‘ मॅगेझिनमधील एक अवतरण आठवते. Journalists tell the public which way the cat is jumping. The public will take care of the cat. या अवतरणाच्या प्रकाशात निजामकालीन पत्रकारितेचा धांडोळा घ्यावा लागेल. त्या पत्रकारितेचा जनमानसावर , राज्यकर्त्यांवर आणि सरकारी अधिकार्यांवर झालेल्या परिणामांचे एक गंमतीदार उदाहरण लक्षणीय ठरेल. हैदराबादमध्ये हुजूर रामचंद्रराव नावाचे एक गृहस्थ राहत होते. निजामाला मराठी वृत्तपत्रे वाचून दाखविण्याच्या कामावर त्यांची नियुक्ती केलेली होती. सरकारी अधिकारी असल्याने ते आपल्या मुलाच्या अंगावर अगदी उंची पोशाख घालत. मुलाच्या जरतारी नक्षीदार कोटाची व लफ्फेबाज टोपीची किंमत त्या काळात दोन हजार रुपये होती. हुजूर रामचंद्ररावांना वृत्तपत्रांतून तत्कालीन स्वदेशी आंदोलनाची व लोकचळवळीची माहिती कळत असे. ती वाचून त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वदेशीची शपथ घेऊन अंगावरचे उंची कपडे टाकून दिले व ‘ दीड रुपयाचा शर्ट आणि चार आण्यांची टोपी ‘ घालायला सुरुवात केली. ही देखील तत्कालीन पत्रकारितेच्या प्रबोधनपरंपरेचीच किमया !

निजामाच्या हैदराबाद संस्थानात पत्र-पत्रिकेच्या प्रकाशनावर निर्बंध होते. हळीखेडच्या वार्षिकोत्सवावेळी हैदराबादच्या सभेने ‘वैदिक आदर्श’ नावाचे साप्ताहिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. पं. नरेंद्रजी (जन्म: 10 एप्रिल 1907) यांची मासिक 20 रुपये पगारावर त्यासाठी नेमणूक करण्यात आली. परंतु सरकारी निर्बंधांमुळे प्रकाशन बराच काळ रखडले. त्या सुमारास
भाई बन्सीलालजी वकील काही कामानिमित्त हैदराबाद येथे गेले असता, त्यांना या विलंबाबद्दल ऐकून खेद झाला. परतण्यापूर्वी त्यांनी ‘वैदिक आदर्श ‘ चा पहिला अंक प्रकाशित केला. संपादक होते मनोहर सिंह आणि प्रकाशनाची जबाबदारी पं. नरेंद्रजींवर सोपविण्यात आली. 7 नोव्हेंबर 1934 रोजी प्रकाशित झालेल्या या पहिल्या अंकात पंडित नरेंद्रजींचा ‘ मुस्लिम पत्रोंकी आहो- पुकार ‘ या विषयावरील लेख होता. नंतरच्या काळातही हिंदू जनजागृतीपर अनेक लेख ‘ वैदिक आदर्श’ ने प्रसिद्ध केले. ‘ वैदिक आदर्श ‘ चे प्रकाशन हा हैदराबाद संस्थानातील आर्य समाजाच्या आंदोलनाचा एक महत्वपूर्ण टप्पा होता. निजामाकडून 13 खुरदाद सन 1344 फसली नुसार 18 एप्रिल 1935 रोजी पंडितजींना निजामाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली. त्यात ‘ तुला मनानूरला का पाठवू नये ? ‘ असे म्हटले होते. (मनानूर त्या काळी निजाम राज्यातील काळ्या पाण्याच्या शिक्षेचे ठिकाण होते.) ‘ वैदिक आदर्श ‘ विरुद्ध मुस्लिम वृत्तपत्रे ‘वक्त ‘ , ‘ रहबरे-दक्कन ‘ , ‘सुबहे- दक्कन ‘ यांनी आणि ‘ अल् आजम ‘ या साप्ताहिकाने त्या काळी जबरदस्त आघाडी उघडली होती. निजाम सरकारला हेच हवे होते. परिणामी, निजाम सरकारच्या सूचना विभागाचे निर्देशक नवाब अलियावर जंग बहादुर यांनी कडक आदेश काढून ‘ वैदिक आदर्श ‘ च्या प्रकाशनावर बंदी घातली.
केवळ आंदोलने व निजामविरोधी लोकजागृती यावरच न थांबता, तत्कालीन पत्रकारितेने सामाजिक व शैक्षणिक विषयही ऐरणीवर घेतलेले आढळून येईल. मुस्लिम समाजात त्या काळी शिक्षणाच्या दृष्टीने बरीच जागृती होत चालली होती. विशेषतः स्त्रीशिक्षणाच्या प्रसाराकडे अनेक मुस्लिम नेत्यांनी लक्ष दिल्याचे आढळते. त्यापैकी मौलाना मोहिब हुसेन हे प्रमुख होते. त्यांना ‘ हैदराबाद येथील पत्रकारितेचे व समाजसुधारणेचे जनक ‘ असे म्हणता येईल. ‘मुअल्लिम- ए-शफीख ‘
‘ मुअल्लिम- ए- नित्स्वा ‘ या त्यांच्या पत्रांतून स्त्रीशिक्षण व सामाजिक सुधारणा या विषयांवरच ते प्रामुख्याने लिहीत. प्रतिगामी विचारसरणीचे ते सातत्याने खंडन करीत, असा उल्लेख डाॅ. देवीसिंग चौहान गौरवग्रंथातील पृष्ठ क्र. 398 वर असलेल्या प्रा. वि. पां. देऊळगावकर यांच्या लेखातही आढळतो.
औरंगाबाद येथून 1882 मध्ये ‘ औरंगाबाद समाचार’ हे वर्तमानपत्र प्रसिद्ध होत असे. त्याचा अर्धा मजकूर मराठीत, तर अर्धा मजकूर उर्दूत होता. नंतरच्या काळात संस्थानात मराठी वृत्तपत्र सुरु करण्याचा मान जातो लक्ष्मणराव फाटक यांच्याकडे. त्यांनी ‘निजाम विजय ‘ हे साप्ताहिक स्वरुपात भागानगरहून प्रकाशित केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फाटक यांनी ‘निजाम विजय ‘ चालविले. या साप्ताहिकाचा शास्त्रीय अभ्यास केल्यास, त्या काळी सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मराठवाडा कसा अंधारात खितपत पडला होता, हे लक्षात येईल. निजामी राजवटीत प्रसंगी दंड भरुन, तोशीस सहन करुनही फाटक यांनी हे पत्र नेटाने चालविले. त्यानंतर मराठवाड्यातील पत्रकारितेचे प्रारब्ध बदलले ते आ.कृ. उर्फ आनंद कृष्णा वाघमारे यांनी. निजामी निर्बंधांमुळे त्यांनी एकानंतर एक 11 नावांनी पत्र चालविले. रणसंग्राम, दुंदुभी, नागरिक स्वातंत्र्य आदी नावे धारण करुन त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय निष्ठेने चालविला. त्यांच्या वृत्तपत्रात निजामाच्या अन्याय-अत्याचारांविरोधात लिखाण प्रसिद्ध झाले की निजाम त्या अंकाच्या प्रकाशनावर बंदी घाले. बंदी आली, की आ.कृ. वाघमारे दुसर्या नावाने तेच वृत्तपत्र काढत. अकरा नावे वापरुन तेच वर्तमानपत्र काढणे, हा एक विक्रमच म्हटला पाहिजे.

वाघमारे यांनी 1934 ते 1967 ह्या कालखंडात वृत्तपत्र व्यवसायात क्रांती घडवून आणली. अन्यायी निजामी राजवटीच्या विरोधात आपल्या लेखणीचे शस्त्र परजणारे आ.कृ. हे केवळ पत्रकारच नव्हे, तर क्रांतीदूत ठरले. त्यांनी आग ओकणारे क्रांतीकारक लिखाण केल्यानंतर अनेक वेळा निजामाने त्यांच्या वृत्तपत्रांवर बंदी घातली. वाघमारे यांनी औरंगाबादमधील तत्कालीन ‘साप्ताहिक मराठवाडा ‘ मधून लिहिलेले ज्वलज्जहाल अग्रलेख क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविणारे ठरले. त्यांच्यानंतर अनंतराव भालेराव आण्णा यांनी मराठवाडा साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर केले. नांदेडचे कै. ग.ना. आंबेकर यांनी निजाम सरकारकडे मराठी साप्ताहिक काढण्याचीपरवानगी मागितली होती. तब्बल तीन -चार वर्षांनी हैदराबाद सचिवालयाकडून त्यांना एक पत्र (बाब-ए- हुकूमत) आले. त्यात म्हटले होते की, ‘ सभी कामोंमें दखल है. लिहाजा, इजाजत नहीं दी जा सकती’ . नंतर नांदेडला ‘ नागरिक ‘ नावाचे साप्ताहिक सुरु करण्यात आले. परंतु निजामाचे निर्बंध असल्याने प्रकाशनासाठी त्याकाळी पुणे किंवा सोलापूरला धाव घ्यावी लागत असे.
1887 मध्ये ‘निजाम वैभव ‘ हे उर्दू वृत्तपत्र चालू होते. 1906 च्या आसपास ‘ भाग्येषु विजय ‘ नामक वृत्तपत्र होते. नंतर वर उल्लेखिलेले ‘ निजाम विजय ‘ हे एकमेव मराठी वृत्तपत्र काही काळ चालले. 5 जुलै 1948 ला निजाम सरकारने खास हुकूम काढून हैदराबाद संरक्षण कायद्यानुसार ‘इमरोज’ या वृत्तपत्रावर सेन्साॅरशिप लादली. ‘इमरोज ‘ चे कार्यकारी संपादक बी.एस.राव यांच्यावर खटला भरला. कारण ‘ इमरोज ‘ हे वृत्तपत्र शोएबउल्ला खान चालवित होते. ते राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र होते. म्हणून निजाम सरकारने त्याची मुस्कटदाबी केली. पुढे शोएबउल्ला खान यांना रझाकारांनी कार्यालयात घुसून तलवारीने त्यांचे ‘लिहिते’ हात कलम केले आणि हाल हाल करुन ठार मारले. हैदराबाद संस्थानात येणारे ‘ केसरी ‘ आणि आ.कृ. वाघमारेंचा ‘मराठवाडा ‘ ही वृत्तपत्रे राजकीय चळवळीला प्रोत्साहित करणारी होती. ‘मराठवाडा ‘ मधून हैदराबाद संस्थानातील राजकीय असंतोष मांडण्याचे काम आ.कृ.वाघमारे यांनी केले. त्यांचा उल्लेख त्यामुळेच ‘हैदराबाद संस्थानातील असंतोषाचे जनक’ ( father of unrest ) असा केला जातो. ‘ केसरी ‘, ‘मराठवाडा ‘ सारख्या अंकांची पारायणे गुप्तपणे हैदराबाद संस्थानात होत असत.
हैदराबाद संस्थानातील अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि जनतेवर होणार्या अन्याय- अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम निजाम विजय, मराठवाडा, केसरी, पुढारी, दीनमित्र, सोलापूर समाचार, तरुण भारत , सा. जागृती, जनता, मातृभूमी, ज्ञानप्रकाशक नवशक्ती,नवा काळ, बहि लोकशक्ती, बहिष्कृत भारत, लोकशक्ती, लोकमान्य आदी मराठी वृत्तपत्रांनी केले. सन 1920 ते 38 या काळात जनजागृती घडविण्यात मराठी वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची होती. निजाम सरकार व रझाकारांची दडपशाही इत्यादींचा विरोध करताना ‘ नागरिक हक्क प्राप्त करुन द्या ‘ , ‘गश्ती निशान रद्द करा’ , ‘ भाषण, मुद्रण, लिखाण इत्यादी स्वातंत्र्य प्रदान करा ‘ असा सतत प्रचार करुन आणि प्रसिद्धी देऊन आंदोलन उभे करताना मराठी पत्रकारितेने त्याकाळात जनतेचा लोकमानस तयार केला. हैदराबाद संस्थानातील वैचारिक जागृतीचा प्रारंभ याच काळात झाला.

जागृतीच्या या कार्यात मुद्रणयंत्रे आणि वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची होती. हैदराबादमधील पहिले उर्दू वर्तमानपत्र आरोग्यासंबंधी ‘ रिसला-ए-तबाबत’ 1857 ( हिजरी 1275 ) ला सुरु झाले. इतिहासकार कासिम अली साजनलाल यांच्या मते ‘ ‘आफताब-ए- दख्खन ‘ हे वृत्तपत्र 1860 ला प्रकाशित झाले. हैदराबाद टेलिग्राफ, दि हैदराबाद रेकाॅर्ड , दि डेक्कन पंच , दि डेक्कन स्टॅन्डर्ड , डेक्कन बजेट, दि डेक्कन मेल, हैदराबाद क्राॅनिकल् , दख्खन टाइम्स, हैदराबाद बुलेटिन, डेक्कन क्राॅनिकल, दि न्यू इरा, हैदराबाद हेराॅल्ड इ. इंग्रजी वृत्तपत्रे ब्रिटिशांच्या पुढाकाराने सुरु झाली होती. दख्खन पुनेश, मुशेरे दख्खन, साहिबा, रहेबार-इ-दख्खन, वक्त, पायम, गॅझेट, सुबहे- दख्खन, मुमालित, उस्मान गॅझेट, नुमाइश, अमन आदी उर्दू वृत्तपत्रे हैदराबादेत होती. उर्दू वर्तमानपत्रे निजामाच्या, तर इंग्रजी वर्तमानपत्रे ब्रिटिशांच्या हातात होती. बॅ. श्रीनिवास शर्मा यांनी 1912 ला प्रथम तेलगू वर्तमानपत्र काढले. तत्कालीन सामाजिक आर्थिक आणि कृषीविषयक समस्यांबाबतचे चित्रण त्यात करण्यात येत असे.
स्वामी व्यंकटराव यांनी 1917 ला आंध्र मठ, 1920 मध्ये राघव रंगराव यांनी तेलगू पत्रिका, त्याच वर्षी एस. नरसिंहराव यांनी निलगिरी ची सुरुवात केली.त्यातून आंध्र भागात राजकीय जागृतीचे कार्य केले. देशबंधू, शैव पंचाक्षरी, भागानगर पत्रिका ही वर्तमानपत्रे 1925 च्या आसपास लोकजागृतीचे कार्य करीत असत. गोवळकोंडा नावाच्या पत्रिकेतून माडपट्टी हणुमंतराव, एस. प्रताप रेड्डी या आंध्रातील राजकीय नेत्यांनी राजकीय चळवळींचा प्रसार केला.
संस्थानात मराठीतील पहिले वर्तमानपत्र ‘औरंगाबाद समाचार ‘ 1882 ला निघाले. 1894 ला हैदराबादमध्ये रामचंद्र वासुदेवराव कुलकर्णी यांनी ‘ भाग्यनगर ‘, 1897 च्या सुमारास ‘ निजाम वैभव’, 1897 मध्येच नरसो मुकुंदरावांनी ‘भाग्येश नगर ‘, गंगालहरी, 1898 ला ‘ चंपावती’, ‘गुलबर्गा समाचार ‘ही पत्रे शिळा प्रेसवर निघत होती. 1908-09 ला औरंगाबाद व बीड मधून मराठी साप्ताहिके शिळा प्रेसवरच निघत होती. ही सर्व मराठी वर्तमानपत्रे अल्पजीवी ठरली.
1918 मध्ये दिगंबरराव बिंदू यांच्या संपादकत्वाखाली ‘ बोध ‘ चा प्रारंभ झाला. ल.ब.फाटक , बिंदू आणि हैदराबादमधील बळवंतराव हुमणाबादकर यांच्या प्रयत्नाने ‘ बोध ‘ वर्तमानपत्र काढण्यात आले. पण ‘ बोध ‘ चे दोनच अंक निघाले. निजामाने हुमणाबादकरांकडे असलेल्या एका माणसाला अटक केल्याने ‘ बोध ‘ बंद पडले. ‘ निजाम विजय ‘ वर 30 जुलै 1929 ते 21 जानेवारी 1930 पर्यंत निजाम सरकारची बंदी होती. ‘निजाम विजय’ कारांना सार्वजनिक कार्य करताना महाराष्ट्र परिषदेची आवश्यकता वाटली. म्हणून त्यांनी ती मांडली. ‘ ‘मराठवाडा ‘ वृत्तपत्राची धारदार लेखणी आणि संस्थानातील राजकीय चळवळींसाठी निर्माण होत असलेले वातावरण यांच्या संगमाचा काळ 1938 हा होता. मराठवाडा प्रदेशात ‘मराठवाडा ‘ वृत्तपत्राने राजकीय लढ्याला पूरक वातावरण निर्मिती घडविली. या लेखात प्रारंभी म्हटल्याप्रमाणे ‘मराठवाडा’ चे आ.कृ.वाघमारे यांनी एकच वर्तमानपत्र 11 नावांनी चालविले. संपादक म्हणून त्यावर भले वेगवेगळी नावे होती. परंतु मुद्रक, मालक, प्रकाशक, स्वतः आ.कृ. च होते.1939 ला आ.कृ.वाघमारे यांच्यावर निजामाने राजद्रोहाचा खटला चालविला. हैदराबाद संस्थानातील देशद्रोहाचा हा पहिलाच खटला होय. या खटल्यात दीड वर्षांनंतर वाघमारे यांना दीड वर्षांची शिक्षा व सिंडोने (औरंगाबाद ) गावाचे त्यांचे वंशपरंपरागत पटवारी वतन जप्त करण्यात आले.
19 मार्च 1948 ते 17 सप्टेंबर 1948 या मराठवाड्याच्या द्वितीयपर्व वाटचालीतही मराठवाड्याने आविष्कार स्वातंत्र्य गमावले नाही. जातीय व धार्मिक चळवळींपेक्षा राजकीय चळवळ हैदराबाद संस्थानात आवश्यक आहे, हा विचार ‘मराठवाडा ‘ चे आ.कृ.वाघमारे व नंतरच्या काळात अनंतराव भालेराव यांनी सातत्याने मांडला. ‘ मराठवाडा ‘ वर्तमानपत्र जनतेला स्वातंत्र्याकडे वळविण्यासाठी , लोकमने चेतवून प्रत्यक्ष कृतीसाठी ती धडाडीने तयार व्हावीत या हेतूने काढले होते. गुलबर्गा येथील आर्य समाजी कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचारांचा वृत्तांत ‘ आर्यभानू ‘ ने आपल्या 24 एप्रिल 1945 च्या अंकात छापल्याने ‘ आर्यभानू ‘ चे अंक जप्त करण्यात आले होते. निजाम सरकार फर्मान काढून वर्तमानपत्रांवर बंदी घालत असे. त्रिकाळ, मराठवाडा, आऊटलुक, आर्य गॅझेट, हिंदूप्रकाश, आर्यवीर, मिलाप, वैदिक संदेश, मसावत, अमरज्योत, झेंडा आदी 14 वर्तमानपत्रांनी सरकारविरोधी तक्रारी छापल्याने या वर्तमानपत्रांना बंदीला सामोरे जावे लागले.
एकीकडे निजामाची जुलमी राजवट आणि दुसरीकडे क्रूर अत्याचारी रझाकारांची खडी जमातवादी फौज, अशा कात्रीत मराठवाडा अडकलेला होता. बहुसंख्यांक रयतेच्या दृष्टीने हा संघर्ष जबाबदार राज्यपद्धतीसाठी, लोकशाही हक्कांसाठी, अन्यायाच्या परिमार्जनासाठी, समतेसाठी आणि स्वतंत्र भारतात विलीनीकरणासाठीचा लढा होता. निजामकालीन वृत्तपत्रांनी या लढ्याचा वसाच घेतला होता. रझाकारांछ्या हिंस्त्र चळवळीआणि सत्ताधार्यांच्या सरंजामशाही वृत्तीविरुद्ध हा लढा होता. हतबल अवस्थेतून समाजाला सावरण्याचे आणि रझाकारी दहशतवादाला तोंड देण्याचे, जनजागरणाचे व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे अलौकिक कार्य तत्कालीन पत्रकारितेने केले. मुक्तीलढ्याचे नेते, सर्वसामान्य जनता आणि वृत्तपत्रांनी अखेरच्या टप्प्यात हा लढा अतिशय तीव्र केला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतातला शेवटचा राजा इतिहासजमा झाला !

- — लेखन : जयप्रकाश दगडे. ज्येष्ठ पत्रकार, लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800