अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकाची राजधानी असलेल्या बेंगळूरू येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला साहित्यिक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरवात कुसुमाग्रजांच्या कवितेची साद घालत निमंत्रितांच्या कवी संमेलनापासून झाली. या कवी, कवयित्रीनी स्वरचित कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रतिभा टेकाडे यांची शिवरायांच्या तलवारीला मराठीची धार आहे..
तर राकेश शेटे यांची मानव धर्म महान आहे, डॉ. नम्रता कुळकर्णी यांची निळाईवरच्या कवितेने शब्दमाधुर्य जपले. तर शब्द कोसळतात प्रपातासारखे असे अर्चना देसाई यांच्या कवितेतून उमजले. संदीप लिमये म्हणतात, पाऊस असतोच मनामनात साठलेला.. प्रश्न परिस्थितीचा आहे तर डोळ्यातल्या पाण्यासारखा प्रवाहीपणा परवीन कौसर यांनी आपल्या आईबद्दलचा कवितेतून व्यक्त केल्या. लीना पेंढारकर यांची ‘मन’ या कवितेने मनाच्या जवळ नेले. या कवींना एका सूत्रात बांधायचे कार्य ‘लव यु जिंदगी’ चे ब्लॉग रायटर, लेखक व बेंगळूरू विभाग कोषाध्यक्ष तुषार भट ऊर्फ ‘श्वेतुष’ यांनी केले.


प्रसिद्ध अनुवादक डॉ उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत उपस्थितांना नवी साहित्यिक दृष्टी देऊन गेली. यावेळी उपस्थितांच्या आग्रहाखातर सूत्रसंचालक तुषार भट यांनी सादर केलेली अनुवादित कविता रसिकांना भावली.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश देवनपल्ली यांच्या हस्ते निमंत्रित कवींना प्रमाणपत्र व शाल देऊन गौरविण्यात आले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
