कसला रडू ढोल वाजवलास रे…मी एकदम चिडून त्याला म्हटलं. खजील होऊन तो उभा राहिला. एकदम शांत झाला. मी स्वतःला आवरत पुढचे सगळे शब्द म्यान करून टाकले.
आज समूहगीत स्पर्धा होती. गाणे छानच बसले होते. पण वाद्याची साथसंगत कमी पडत होती. जी काही वाद्ये होती ती वादकांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी अशी काही वाजवली की गाणे तसेच गायले असते तरी अधिक चांगले झाले असते असे क्षणभर वाटून गेले. पण काही गोष्टींची साथ महत्वाची असते. ती अशी सहजासहजी सोडता येत नाही.
गायनाला वाद्याची साथ असेल तर गाणे अजून छान होते. पण त्यातील कुणा एकाची चूक झाली किंवा ताल सूर कमी जास्त झाला की पूर्ण गाण्यावर त्याचा प्रभाव पडतो.
आयुष्याचेही असेच असते ना… सगळं कसं छान सुरू असतं. आपापल्या भूमिका प्रत्येक जण पार पाडत असतो. अजून हवे, अजून हवे या नादात आपण स्वतः कडूनच जास्त अपेक्षा करायला लागतो आणि भूमिकेत समरस होणे राहून जाते. ताल सूर चुकायला लागतात. सुंदर बसलेले गाणे बेसुरे वाटायला लागते.
काही कमी काही जास्त होणारच…हे स्वीकारून पुढे चालायला हवे. ताल सूर कमी जास्त झाला तरी समेवर एकत्र येता येते. मात्र त्यासाठी जे सुरात गातात त्यांच्या आवाजात आपला आवाज मिळवता आला पाहिजे. क्षणभर थांबता आले पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या गायन स्पर्धेत वेगळाच रस्ता दिसला… ताल सुरांच्या दूनियेमधला ढोल हळूच हसला.

– लेखन : स्मिता धारूरकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800