झाली वेळ आता
घ्यायचा आहे निरोप
गाऊनी सूर भैरवीचे
करावा मैफल समारोप
मन माझे दाटून येते
वळून मागे पाहताना
कसे होते ओलेते
आठवणी ओघळताना
किती वाटा तुडवल्या
झेलली वारे वादळे
किती खड्डे वाळवंटे
कधी मृगजळ आगळे
कधी रानसुमने ऊगवली
फुले काटे सारे वेचले
मोडले पण नाही वाकले
कडु गोड पार जाहले
कळेना मन का ओलावते
आता चंद्र आभाळीचा
ऊगा भासतो थकलेला
मार्ग मंद होतो ढगांचा
वेध लागले पलीकडचे
सोडून जाता जीवलगांना
पापणीतील थेंबानो
मिटून घ्या सूरांना

– रचना : राधिका भांडारकर, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800