Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

कवी सुधीर मोघे

कवीवर्य सुधीर मोघे हे कवी, गीतकार, संगीतकार होते.
‘ आत्मरंग ‘, ‘ गाण्याची वही ‘, ‘पक्षांचे ठसे ‘, लय ‘,  ‘ शब्द धून ‘, ‘ स्वतंत्रते भगवती ‘ असे काव्य संग्रह ,
‘ अनुबंध ‘, ‘ कविता सखी ‘, गाणारी वाट ‘ , ‘ निरांकुशाची रोजनिशी ‘ असे गद्य लेखन असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे.
याशिवाय सूत्र संचालक, दिग्दर्शक, संहिता निवेदक अश्या अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या.
चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या अनेक रचना अतिशय लोकप्रिय आहेत.

शब्दांची पद्यमय अशी दोन रूपे असतात; कविता आणि गीत. एखाद्याचा व्यक्ती ते कवी हा प्रवास असतो. एखाद्याचा व्यक्ती ते गीतकार असा प्रवास असतो. काहीवेळा कवी ते गीतकार हा प्रवास असतो किंवा क्वचित कधी या उलटा प्रवास असतो. मग त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल, शुद्धतेबद्दल ऊहापोह असतात.
मला, ‘ कविता ‘ ही गजऱ्याप्रमाणे वाटते. स्वतःपुरती, तितक्याच मापाची आणि आवडीच्या फुलांची गुंफलेली. गुंफून झाली की आपलेच रूप सजवण्यासाठी, खुलवण्यासाठी तिला माळून आपण आरश्यात न्याहाळतो. आपली कविता आपल्याला आपले खरे रूप दाखवत राहते. तिचा सुगंधही आपल्यापुरता असतो. गजऱ्याचा सुगंध हवा असेल तर त्याच्या जवळ पोहोचावे लागते. जो कवितेच्या जितक्या जवळ पोचेल तितका त्यास सुगंध प्राप्त होईल.

‘ गीत ‘ हे हाराप्रमाणे असते. हार करतांना प्रत्येक वेळी आपली आवडती फुले निवडता येतातच असे नाही. सुगंधा पेक्षाही रूप म्हणजे रंगसंगती, लांबी-रुंदी याला अधिक महत्त्व दिले जाते. हारा मागे काहीतरी उद्देश असतो. भक्तिपूर्वक तो परमेश्वराला अर्पण करणे असो, गौरवपूर्वक एखादया व्यक्तीला अर्पण करणे असो अथवा नम्रता पूर्वक मृतास श्रध्दांजली असो. प्रत्येक हार आपापले नशीब घेऊन येतो.
मात्र ह्यात श्रेष्ठता किंवा शुद्धता ह्याचा वाद अगदीच अयोग्य आहे.

शब्द म्हणजे फुले. त्याचा वापर कोणत्याही कारणासाठी होत असेल तरीही त्यांची कोमलता तितकीच सच्ची असते. मुळात कविता रूपी गजरा असो अथवा गीत रूपी हार असो, ह्या दोन्हीस एकसंध ठेवणारा धागा म्हणजे त्यातले शुद्ध संवेदनशील मन ! हा धागा जोवर एकसंध आहे तोवर ह्या दोन्हीस मानाचे स्थान आहे. कवी आणि गीतकार ह्यातली कोणतीही ओळख तितकीच उच्च आहे.
आजचे आपले कवीराज म्हणजे ” कवी-गीतकार किंवा गीतकार-कवी ह्यातल्या कुठल्या पर्यायाला अग्रक्रम द्यायचा हे ज्याच्या त्याच्या अंतस्थ हेतुवर अवलंबुन असतं. स्वतः कवीला मात्र दोन्ही पर्याय सारखेच सार्थ आणि स्वागतार्ह वाटतात.” असे मानणारे  कवी सुधीर मोघे. ८ फेब्रुवारी १९३९ या दिवशी कवितेचे स्वप्न घेवून एका भावविभोर मनाने जन्म घेतला…तो देखील हे गुणगुणत…

‘ मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण पुसट..कोवळे
नाव कोरुनी गेलो ‘

कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांना फार उंची वस्त्रालंकारांची आवड नाही. असल्या आभूषणांना इथे अर्थ मानले जात नाही. इथे अर्थ आहे तो अर्थाचा !
साध्या, छोटेखानी, टुमदार घरात साधी वस्त्रे परिधान केलेली माणसे कधी कधी आपल्याला आयुष्यभर पुरेल इतके सुख, समाधान आणि वात्सल्य रुपी धन देऊन जातात; जे कधीकधी महालात राहणाऱ्या, उंची वस्त्रे धारण करणाऱ्यांनाही शक्य होत नाही. असेच या कवितेचे, या शब्दांचे रूप आहे.

‘ एक सांगशील, आपले रस्ते
अवचित कसे कुठे जुळले ?
आपल्याच नादात चालतांना
हे देखणे वळण कसे भेटले ?…’

पुढली कविता वाचण्याआधीच ह्या चार ओळी प्रत्येकाला एखाद्या तरी अश्या वळणावर उभ्या करतात ज्याचे आयुष्यात येणे अनपेक्षित होते परंतु त्याच्या देखणेपणाने मात्र पाऊल आपोआप ओढले गेले.
रस्ते असतात समांतर. एक निश्चित दिशा असणारे परंतु कुणास कधी जोडले न जाणारे, आपापला अहं जपणारे !

वळणाचे तसे नसते. वळण हे मुळातच अहंशून्य. नव्या दिशेची तयारी असणारे. नव्या वाटेत मिसळायला, स्वतःचे अस्तित्व विसरून जायला तयार असणारे.
एका वळणाने दोन रस्त्यांचे अवचित जुळणे ह्या केवळ चार ओळी नाहीत तर दोन संपूर्ण आयुष्ये आहेत.

सफलतेची ही अशी कहाणी तर अगदी अशीच चार ओळीत सांगितलेली विफलतेची कहाणी…

‘ क्षणोक्षणी चुका घडतात
आणि श्रेय हरवून बसतात
आपल्याच रिकाम्या ओंजळी, आपल्याला
फार काही शिकवीत असतात…’

जशी ह्या कवितेला शब्दाच्या श्रृंगाराची गरज नाही तशीच अध्यात्मवाद, समाजवाद अश्या पदव्यांचीही गरज नाही. साधी सोपी, प्रत्येकाला अगदी आपली वाटावी अशी ही कविता आणि अशी कविता साकारणं सगळ्यात अवघड असतं !

आणि मग ह्या वरील दोन कवितांची सुरेख सांगड घालणारे एक गीत

‘ भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर…’

एक असेही वळण जिथे हातून घडून गेलेल्या चुकांचे शल्य आहे, रिकाम्या ओंजळीने दिलेले धडे आहेत मात्र ह्याच वळणाने दिला आहे एक विसावा जिथे सारे विसरून जावून नव्याने पुन्हा त्याचे देखणेपण अनुभवण्याची इच्छा आहे.
कवितेचे केवढे सामर्थ्य असते व्यक्त-अव्यक्त, भाव-अभाव सगळ्या सगळ्याला एकत्र गुंफता येतं…

कवी सुधीर मोघे यांच्या माझ्या काही अत्यंत लाडक्या ओळी…

.’ ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
‘ कळण्याचा ‘ चाले ‘ कळण्याशी ‘ संवाद…’

‘ लय एक हुंगिली खोल खोल श्वासांत
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात
लहडला वेल.. तो पहा निघाला गगनी
देठांना फुटल्या कविता पानोपानी…’

ह्या कवितेला सूर, लय, ताल असे ‘ धुमारे ‘ फुटतात आणि तिचे गीत होते. कवी सुधीर मोघे यांच्या कवितेला गीताचे पंख फुटले आणि जन्माला आली काही अजरामर गीते…
‘ सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ‘,   ‘दिस जातील, दिस येतील ‘, ‘ आला आला वारा ‘, ‘ एक झोका ‘, ‘ गोमू संगतीनं माझ्या तू ‘, ‘ फिटे अंधाराचे जाळे ‘, ‘ विसरू नको श्रीरामा ‘, ‘ सांज ये गोकुळी ‘, ‘ झुलतो बाई रास-झुला ‘, ‘ रात्रीस खेळ चाले ‘, ‘ एकाच ह्या जन्मी जणू ‘… ही यादी खूप मोठी आहे.

‘दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागून कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही…’

प्रेम ही भावना अशी सर्वथा उमगल्याचे ग्वाही देणारे काव्य कधी कधी जे मन मुळात प्रेमात पडतं त्याबद्दल मात्र…

‘ मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा…

धनी अस्तित्वाचा तरीही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणी कसा भरवसा द्यावा ‘

अशी मनाची गुंतागुंतीची अवस्था दाखवते.

आपले मन म्हणजे आपल्या अस्तित्वाचा धनी…किती सुरेख कल्पना आहे… हाडामासांचा देह प्रत्येकाला सारखाच लाभलेलाआहे. मग आपले वेगळे अस्तित्व ठरवते ते आपले मन. आपली ओळख म्हणजे आपले मन! आकर्षण कदाचित केवळ दुसऱ्या देहाचे असेल पण आकर्षण आणि प्रेम हे दोन्ही जिथे जडतं ते मात्र दुसऱ्या मनावरच !

‘जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का ?’ किंवा ‘ नाही गुंतून जायचे ‘ ह्या कविता अश्याच मनाची द्विधा स्थिती दर्शविणाऱ्या.

परंतू अश्याच दिशाविहीन अंधारल्या मनातच कवितेचे मेघ येतात जे घेवून येतात तृप्त करणाऱ्या आणि शांत करणाऱ्या सरी…

‘ मी रित्या आभाळी रिता मेघसा होतो
शून्यात बिंब शून्याचे रेखित होतो
जागले काय? हे कुठले वारे सुटले ?
शब्दांत… मनाचे… थेंब दाटुनी आले…’

अश्या अनेक दिव्य सरी कवीवर्य सुधीर मोघे आपल्यामुळे आम्हाला लाभल्या. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आपण म्हटले आहे…

‘ लपविलेला एक वणवा अंतरात
अन् निखाऱ्यांचीच होती पायवाट
नकळता पण अग्निला त्या फूल आले
विंधलेल्या काळजाचे गीत झाले…’
आपण १५ मार्च २०१४ रोजी आयुष्याचे अखेरचे वळण स्वीकारले मात्र आपण बहाल केलेल्या कवितेने असे एक वळण, एक कविता आणि एक गीत प्रत्येकाच्या मनात रुजवले.
काळजात फुलणाऱ्या निखाऱ्यांच्या कविता होतात. ह्या निखऱ्यांचा निचरा करून शीतलता देण्याचे सामर्थ्य केवळ कवितेत असते. आपण जणू ह्या कवितेची आळवणी करण्यासाठी रचना केलीत…

‘ दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होऊनिया आलीस तू

जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे केलेस तू

मौनांतुनी ये गाणे दिवाणे
त्याचा अनामी स्वरभास तू

जन्मात लाभे क्षण एकदा हा
ते भाग्य माझे झालीस तू…’

अगदी अशीच अंतरी फुललेल्या निखाऱ्याचा ‘ निचरा ‘ करणारी आणि माझे भाग्य असणारी ही कविता आपले चरणी अर्पण…

निचरा

अशांत रात्र चलबिचलाची
उशीस माझ्या नवी नाही,
ठावूक तिलाही आहे आता
शब्दांत उतरते आहे काही.

श्वास अडावा असली तगमग
पापणी मिटण्या उसंत नाही,
कधी पोळती ग्रीष्म दारुण
कधी मोहरती वसंत देही.

निबर दिनाची निद्रित मुद्रा
जाग्या जाणिवांच्या रात्री,
रक्तात उसळलेल्या लाटेला
लाभे किनारा ‘ त्या ‘ गात्री

‘ त्या ‘ गात्राचे नाव ‘ कविता ‘
जी सोसते वादळा उरीच्या
काटे पांघरून स्वतःवरी
सजवी मज वस्त्रांत जरीच्या

थोर मनाने स्वीकारी ती
साऱ्या माझ्या आवेगांना,
झिरपते अशी बेमालूम की,
फुलवते व्याकूळ भेगांना.

‘ माझे ‘ म्हणावे अशी ही एकच
जीवास शांती चार क्षण होते,
करते निचराही उद्रेकाचा
अन् मजला माझे ‘ मी पण ‘ देते.

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments