अहमदाबाद विमान दुर्घटनेचे दुर्दैवी व्हिडिओ फोटो आणि बातम्या बघून मन सुन्न झालं…
शब्द गोठले… हात पाय शरीर गळून गेले …
आपल्या सारख्यांना टिव्ही समोर बसून किंवा मोबाईल मध्ये बघून होणारा त्रास सहन न करता येणारा आहे तर ज्यांच्या प्रियजनांवर ही वेळ आली त्यांचं काय झालं असेल. ? आपले कोणीतरी त्या विमानात होते ही कल्पनाच किती भयावह असेल ? कुठून हिम्मत येईल या दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांमध्ये..?
मृत्यु हे अंतिम सत्य… अटळ… पण म्हणून असा मृत्यु यावा..? काय वाटल असेल त्या पायलटला जेव्हा त्याला समजले की आपण तर मरणार आहोतच, सोबत इतके लोकही वाचणार नाही आहेत.

विमान जिथं पडले तिथली अवस्था तर अजूनच भीषण… कित्येक स्वप्न… कित्येक कुटुंब, कित्येक इच्छा आकांक्षा असलेले आयुष्य.. एका क्षणात उद्ध्वस्त… आपल्या प्रिय लोकांना एअर पोर्टवर सोडवायला गेलेले लोक बाहेर ही आले नसतील.. त्यांच्या डोळ्यात काही क्षणाच्या, काही दिवसांच्या, काही महिन्यांच्या विरहाचे दुःख असेल त्यांना आज संपूर्ण आयुष्यभर भळभळनारी वेदना सहन करण्याची वेळ आली.. कोणी तात्पुरती सुट्टी घेऊन भारतात भेटायला आले असेल आपल्या आई बाबांना तर कोणाचे आई वडील आपल्या लेक मुलांचं विश्व बघायला निघाले असतील… कोणी नातवंडांच्या ओढीने.. तर कोणी आपल्या प्राणप्रिय जोडीदाराच्या आठवणीत निघाले असेल.. कोणी बिझिनेस संदर्भात गेले असेल.. तर कोणी नोकरी साठी आपली पिल्ल, कुटुंब इथे ठेऊन उडाले असेल… एखादी आई असेल का विमानात जी तिच्या तान्ह्या बाळाला सुरक्षित ठेऊन पोटा पाण्याच्या विवंचनेत निघाली असेल..? लहान मूल असतील नाही..? विमानाचं अप्रुप घेऊन पहिल्यांदाच परदेशवारी साठी निघालेली.. किती मोठे, किती लहान, कोणता क्लास सगळच एका क्षणात होत्याचं नव्हतं.. परमेश्वरा कोणता रे न्याय तुझा हा..? हे कसले रे संकट…. ? चूक कोणाची का असेना झालेले नुकसान भरून कस येईल रे..? का असा मृत्यु लिहला या लोकांच्या भाळी..? कोळसा झाला त्यांचा …! कित्येक स्वप्नांची राख रांगोळी झाली.. धुरामध्ये बेचिराख झालं.. सगळं संपले. तू तर करुणेचा सागर तू तर सर्वांचा तारणहार.. तुझी लीला अगाध. नियतीचा खेळ तुला ही नाहीच चुकला पण एवढा ही निष्ठुर नको होऊ रे आपल्या लेकरांवर … हिम्मत दे त्या कुटुंबांना ज्यांनी आपला माणूस गमावला.. धैर्य दे त्या बचाव कार्यात मदत करणाऱ्या हाताना… त्या डॉक्टर्स, टेक्निकल टीम, पोलिसांना… सर्वच यंत्रणेला हिंमत दे…. त्या नातेवाईकांना यातून सावरायचं धाडस दे.. भावपूर्ण आदरांजली त्या सर्व निरपराध जीवांना .. जे अनेक इच्छा आकांक्षा स्वप्न आणि अर्धवट आयुष्य सोडून गेलेत… उरलेल्या कुटुंबांसाठी…
हे ईश्वरा सावर सर्वानाच…
चुक कोणाचीही असु दे, तु ताकद बन.. हिम्मत हो.. आणि सांभाळ सगळ्यांना…
— लेखन : देवयानी जोशी संभुस. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800