“स्थलांतर”
आमच्या भविष्यातल्या जीवनाविषयी आम्ही दोघं आता ठरवायला लागलो होतो. विलासला स्वतःचा आर्किटेक्चरचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता. सुरुवातीला त्यांनी अनुभवासाठी अमळनेरस्थित, बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका खाजगी व्यक्तीबरोबर काही उपक्रम केले. मात्र स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास अमळनेर हे काही योग्य ठिकाण वाटेना. इथे व्यवसायाची वाढ होणे; पर्यायाने वैयक्तिक वाढ होणे जरा अशक्य होतं. एक तर अमळनेरच्या गल्ली गल्लीत सारेच परिचयाचे नव्हे अगदी घरातलेच म्हणाना! त्यामुळे अर्थार्जनाच्या दृष्टीने अमळनेर हे लाभदायी असणारच नव्हते. शिवाय भांडारकरांच्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व विलास पासून सुरू झाले होते. बदललेल्या सरकारी कायद्यामुळे कापसाची एकाधिकारशाही सुरू झाली होती त्यामुळे जिनिंग, प्रेसींग मिल्स सध्यातरी बंद होत्या. तेल गिरण्यांची सुद्धा तीच परिस्थिती होती. हे सर्व नव्याने उभं राहू शकत होतं मात्र तोपर्यंत कुटुंबातील भाऊबंदकी जरा जास्तच विकोपाला गेलेली होती या पार्श्वभूमीवर विलासच्या मनात “आपण घेतलेल्या शिक्षणाद्वारेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवूया” असा विचार येणे स्वाभाविकच नव्हे तर अगदी योग्यच होते आणि वाडवडिलांच्या मालमत्तेवर सुखाने आयुष्य जगण्याची कल्पना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नव्हती.
अमळनेर पासून ६०/७० किलोमीटरवर असलेल्या जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी विलासने स्वतंत्र “वास्तुकला” या नावाने व्यवसायाची मुहुर्तमेढ रुजवली. सुरुवातीचे काही महिने तो अमळनेर- जळगाव- अमळनेर असा अत्यंत जिकिरीचा, भुसावळ पॅसेंजर गाडीचा नाहीतर एसटीचा प्रवास करत असे. दुसरा काही पर्यायच नव्हता. तो सकाळी सहा वाजता घरातून निघायचा तो रात्री नऊ वाजताच किंवा ट्रेन लेट झाली तर त्याहूनही उशिरा परतायचा. हा जो काळ होता तो अत्यंत मानसिक अस्वस्थतेचा होता. दोघांसाठी. “सासुरवाशीण” या शब्दाभोवती असलेला कायदेशीर कडवटपणा काढून मीच मला स्वतःला “सासुरवाशीण” पदवी देऊन टाकली होती.
आज जेव्हा मी संपूर्णपणे निवृत्त जीवन जगत असले तरी त्यावेळेची माझी मानसिक स्थिती आठवली की लक्षात येते निवृत्ती आणि रिकामपण या दोन्ही संज्ञांचे अर्थ फार निराळे आहेत. शिवाय ते वयाशी सापेक्ष आहेत.निवृत्तीत “आपण एक परिपूर्ण आयुष्य जगलोय.” हे समाधान असतं आणि रिकामपण, निवांतपणा अथवा क्रियाशीलशून्यता किंवा अजिबातच अरचनात्मक जीवन जगण्यात कमालीचं नैराश्य असतं आणि माझ्यासारख्या आयुष्याबद्दल वेगळ्या कल्पना असणाऱ्या व्यक्तीसाठी तर ते अधिकच कठीण होतं. पण सहजीवनातलं एक चिरंतन मर्म असतं. एकमेकांच्या मनातली वादळं शब्दाविना समजणं.. नुसतच समजणं नव्हे तर त्याबाबतीतली योग्यायोग्यता स्वीकारणे.
एक दिवस विलास ने आबांना (माझ्या सासऱ्यांना) सांगितले, “माझ्या व्यवसायाची घडी आता नीट जमली आहे. व्याप्तीही वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही दोघांनी जळगावलाच राहण्याचा विचार केला आहे .शिवाय अमळनेर मध्ये मला माझे भविष्य घडवता येईल असे वाटत नाही.” हे सर्व सांगताना विलासने अत्यंत विचारपूर्वक, शांत, नम्र, न दुखावणारी भाषा वापरली होती. माझे सासरे ही अत्यंत समंजस वृत्तीचे होते. दुराग्रही अजिबात नव्हते शिवाय त्यांचा “दादा”वर (विलासवर) पूर्ण विश्वास होता. एकत्र परिवारापासून जरी तो दूर राहिला तरी कुटुंबाविषयी त्याची मानसिक आणि नैतिक बांधीलकी तो कधीच डावलणार नाही याची त्यांना खात्री होती. पिता-पुत्रांमधला हा घट्ट बंध कसा आणि का तुटेल ? ते एवढंच म्हणाले,
”बरं. तू जे करशील ते योग्य आणि विचारपूर्वकच करशील. आपल्या कुटुंबात आजपर्यंत मात्र कुणीही न उचललेलं असं हे तुझं धाडसाचं पाऊल आहे. माझे तुम्हा दोघांसाठी आशीर्वादच आहेत.”
त्याचवेळी विलासने आणखी एक मनाशी ठाम ठरवलं होतं. एक दिवस तो मला म्हणाला, ”हे बघ आपण विसरून जायचं की आपण या व्यापक स्थावर, जंगम आदी मालमत्तेचे वारस आहोत. आपण स्वतःच आपलं आयुष्य घडवायचं. कुणाच्याही आर्थिक पाठिंब्या शिवाय. नाहीतर आपल्याला आपल्या क्षमताच कळणार नाहीत.”
या एका रेषेवर आमचं दोघांचंही शतप्रतिशत एकमत झालं आणि याच रेषेवरून आमचा सहजीवनाचा खरा प्रवास सुरू झाला.
जळगावला आम्ही दोघं भाड्याने घेण्यासाठी चांगले घर शोधत होतो. वास्तविक माझ्यासाठी जळगाव आणि अमळनेर ही दोन्ही नगरे अनोळखीच होती. जळगावचे दोन भाग होते. जुनं जळगाव आणि नवं जळगाव. नवीन जळगावचा परिसर स्टेशन पासून, मार्केट पासून आणि विलासच्या ऑफिसपासून सुद्धा दूरच होता पण कलेक्टर ऑफिस, पोलीस चौकी, रिंग रोड चा भाग सुधारित होता. बरीचशी पायपीट करून आम्ही तिथल्याच ब्रुक बाॅन्ड कॉलनी जवळ येऊन ठेपलो. आम्हाला दोघांनाही ती कॉलनी फारच आवडली. थोड्या थोड्या अंतरावर एक मजली बंगले असलेली ही कॉलनी आमच्या मनातच भरली. इथे एखादं घर भाड्याने मिळालं तर किती छान होईल हा विचार दोघांच्याही मनात त्याच क्षणी चमकला. आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. कुणाला भेटायचं, कुठे चौकशी करायची याविषयी आम्हाला काहीच माहीत नव्हते. त्याचवेळी एका मध्यमवयीन बाईंनी आम्हाला पाहिले असावे. त्या ओट्यावरून फाटकापर्यंत आल्या आणि त्यांनी तिथूनच आम्हाला बोलावले. क्षणभर “आमचं काही चुकलं का” असंच आम्हाला वाटलं पण त्यांनी अगदी मृदू आवाजात विचारलं,”कुणाचा पत्ता हवाय का तुम्हाला ? तुम्ही या भागात नवीनच दिसताय्“
तेव्हा मी एकदमच म्हटलं, ”नाही. आम्ही घर शोधतोय आमच्यासाठीच भाड्याने.” त्या प्रौढ महिलेच्या चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटली. “३ ब मध्ये एक वरचा ब्लॉक रिकामा होता पण आत्ताच एका फॅमिलीशी बोलणं झाले आहे. तुम्ही थोडे आधी आला असता तर मी तुम्हालाच तो दिला असता.” म्हणजे त्या या कॉलनीच्या सेक्रेटरी वगैरे असाव्यात. त्यांचे बोलणे ऐकून आम्ही दोघेही मनातून खूपच खट्टू झालो. त्या बाईंच्या मनातही काहीतरी विचार आला असावा. त्या लगेच म्हणाल्या,”तुम्ही जर तीन महिन्याचं आगाऊ भाडं आता दिलंत तर मी देते तुम्हाला हा ब्लॉक. आधीच्याना काय सांगायचं ते मी बघेन.”
भाडं काही फार जास्त नव्हतं पण तितके ही पैसे आमच्या जवळ नव्हते पण विलास म्हणाला,”चालेल मावशी. मला एक तासाचा वेळ द्या मी आणून देतो पैसे पण आम्हाला हे घर द्याच,”आबासाहेब संन्याशीव, सुभाष चौकात त्यांचं कापड दुकान होतं. ते विलास च्या मावस बहिणीचे पती. अतिशय सालस, मराठमोळं, उंच व्यक्तिमत्त्व. संथ, मधुर बोलणं. पांढरंशुभ्र दुटांगी धोतर, तसाच शुभ्र झब्बा आणि डोक्यावर पांढरी खादीची टोपी. त्यांनी पैसे कशासाठी हवेत हे सुद्धा विचारले नाही पण विलासने त्यांना सर्व वृत्तांत ऐकायला लावला. ते म्हणाले, “जा, जा, आधी तुझं काम पूर्ण करून घे. मग निवांतपणे बोलू.”
का कोण जाणे पण या व्यक्तीमध्ये मला माझ्या पप्पांचाच भास झाला.

“तीन ब, ब्रुक बॉन्ड कॉलनी रिंग रोड जळगाव” हे आमचं पहिलं दोघांचं घर. इथूनच आमच्या वैवाहिक आयुष्याच्या जडणघडणीचे पर्व सुरू झाले.
आम्हाला घर मिळवून देणाऱ्या त्या बाई पुढे “पांडे मावशी” म्हणून आमच्या आयुष्याचा एक भक्कम मानसिक आधार बनून राहिल्या. तो एक हळवा कोपरा आजही मी मनात जपून आहे…
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800