“माहिती”तील आठवणी” या लेखमालेच्या १० व्या भागात आपण ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ फेम प्रा विसुभाऊ बापट यांच्या माहिती खात्याशी संबंधित आठवणींचा पहिला भाग वाचला. आज वाचू या, त्यांच्या आठवणींचा दुसरा भाग..
– संपादक
रत्नम गोठले सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील (आजचा गडचिरोली जिल्हा) एटापल्ली गावात असताना त्यांनी मला बोलावून घेतले. त्यांनी त्यांच्या झलके नावाच्या इंजिनिअर मित्राशी माझा परिचय करून दिला. या दोघांना तेथील आदिवासींच्या गोंडी आणि माडिया या दोन्हीं भाषा चांगल्या अवगत होत्या. शिवाय एटापल्ली सह आलापल्ली, अहेरी, सिरोंचा, जिमलगट्टा, भामरागड, हेमलकसा, इत्यादी गावातील शासकीय अधिकारी आणि आदिवासी गावकरी यांच्या बरोबर गोठले व झलके याचे मित्रत्वाचे संबंध होते.
माहिती विभागाच्या जीपमधून मी तो परिसर आणि तिथली कांहीं जंगले गोठले साहेबांबरोबर भरपूर फिरलो. तेथील कांहीं शाळांमध्ये माझे शालेय आणि कांहीं शासकीय अधिकाऱ्यांच्या मंडळांमध्ये ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्रीचे प्रयोगही मी सादर केले.
तसे मला मानधन जुजबीच मिळत होते, पण त्या आदिवासी भागात नोकरी करणाऱ्या व तिथेच स्थायिक असलेल्या मराठी रसिकांपर्यंत मी माझे कार्यक्रम पोहोचवू शकलो, ते रत्नम गोठले मुळेच.!
एटापल्लीच्या नवरात्र उत्सवातही माझा एकपात्री कार्यक्रम साहेबांनी आयोजित केला होता. कार्यक्रम एका चौकात उघड्यावर, गावाच्या चारी बाजूला दाट जंगल असल्याने रात्रीच्या कार्यक्रमात मला खूप थंडी वाजत होती. आणि माझा गळा सांभाळण्यासाठी गोठले साहेब स्वतः स्टोव्हवर चहा बनवून मला देत होते…. त्यामुळेच मी चांगला कार्यक्रम सादर करू शकलो, तो प्रयोग मी कधीच विसरू शकत नाही.
दुसऱ्या दिवशी साहेब मला त्यांच्या जीपमधून जवळच्याच जंगलातील एका गुहेजवळ घेऊन गेले. ती अस्वलांची गुहा होती. तिथे मला खूप अस्वले पहायला मिळाली. गाडीची चाहूल लागताच त्यातील काही अस्वले आमच्या दिशेने येताना पाहून आम्ही तिथून पळ काढला. पण माझ्या आयुष्यातील तो एक थरारक अनुभव मला गोठलेंमुळेच अनुभवायला मिळाला.
नंतरच्या काळात मी मुंबईला आलो आणि मुंबईत स्थिर झालो. त्यावेळी गोठले साहेब स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याचे माहिती व जनसंपर्क अधिकारी झाले होते. विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मी असाच रत्नम गोठलेंना भेटायला गेलो होतो आणि आम्ही गडचिरोली परिसरातील जंगलात फिरलो होतो. ती आमची शेवटची भेट ठरली, पण रत्नम गोठलें बरोबरच्या सर्व आठवणी आजही ताज्या आहेत.

– लेखन : प्रा. विसुभाऊ बापट. दादर, मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बापरे! अस्वलांची गुहा! ऐकूनच धस्स झाले! किती थरारक अनुभव असेल तो! तुम्ही एकेक अनुभव इतके मस्त सांगता की आम्हीही तुमच्यासोबत तिथे आहोत असे वाटून जाते!