“लेडी डॉक्टर्स”
आज भारतीय स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात करीअर करीत आहेत. ह्यात जगावेगळे काही वाटत नाही. पण आद्य महिला डॉक्टरांनी कशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही. कुटुंब, जात, आणि समाजाच्या बेड्यांनी त्यांना शतकानुशतकांपासून करकचून बांधून ठेवलं होतं. ही बंधने तोडण्यासाठी त्यांना किती प्रयास आणि खडतर संघर्ष करावे लागले यांच्या कथा लेखिका व पत्रकार कविता राव यांनी सांगितल्या आहेत.
कविता राव यांचे वास्तव्य लंडन येथे आहे. त्यांचे लेख ‘द गार्डियन’, ‘न्युयार्क टाइम्स, ‘मिंट’, द् हिंदू’ आणि अन्य वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहेत. ‘लेडी डॉक्टर्स’ हे त्यांचं तिसरे पुस्तक!याच पुस्तकात कविता राव यांनी १८६० ते १९३० या कालावधीतील सहा स्त्रियांचा अद्भुत, असामान्य जीवन प्रवास उलगडला आहे.
स्त्री मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची बौध्दिक क्षमताच नाही या गृहितकाला आव्हान देणा-या समाजाची, जातीचा नियम तोडून सर्वप्रथम समुद्रापार गेलेली आनंदीबाई जोशी पासून ते बालपणी झालेला विवाह नाकारून, नव-याला घटस्फोट देण्याचे धाडस दाखविणा-या आणि जिद्दीने डॉक्टर झालेल्या रखमाबाई राऊत या पर्यंत, करीयर आणि आठ मुलं लिलया सांभाळणा-या कदंबिनी गांगुली ते कमालीचं दारिद्र्य आणि कष्ट ह्यातून जिद्दीने मार्ग काढणा-या बालविधवा हेमावती सेन ह्या महिला आणि तितक्याच झुंजार बाल आमदार मुथूलक्ष्मी रेड्डी, आणि भारतातील आणि बहुधा जगातील सुध्दा पहिल्या महिला सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुतीतज्ञ व आमदार मेरी पुनेन लुकास ह्या क्रांतिकारी सहा पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टरांच्या चित्तवेधक आणि थक्क करणा-या कथा अत्यंत ओघवत्या शैलीत कविता राव यांनी कथन केल्या आहेत.
जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा प्रथम आवृत्तीचा लाभ मला एका स्त्री डॉक्टर कडूनच अकस्मात मिळाला.
१८६०च्या काळात उच्च वर्णीय स्त्रिया क्वचितच घराबाहेर पडत. अभ्यासासाठी परदेशी जाणं अशक्यच होतं. मुलींना मुळात शिकवण्याची गरज नाही असे समजलं जाई आणि विज्ञानाचं शिक्षण देण्याचा विचारही केला जात नसे.
हिंदुधर्मीयांमध्ये मुलीचं दहाव्या वर्षापर्यंत लग्न झालं नाही तर ते अशुभ मानलं जायचं.बऱ्याचदा दहाव्या वर्षी लग्न आणि बाराव्या वर्षी वैधव्य असं चित्र समाजात दिसायचं. पुढील सारं आयुष्य दारिद्र्यात खस्ता खाण्यात जायचं.
त्यात जगभरातील महिलांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निषिद्ध होता. महिलांना धार्मिक, जातीय आणि पुरुष प्रधान संस्कृती अशा सर्व आघाड्यांवर प्रखर विरोधाचा सामना करावा लागत होता. त्यांच्यावर दगड मारले जात, छळ आणि टिंगलटवाळी केली जाई. अशा काळात या सहा महिलांनी अमेरिकेत डॉक्टर होण्याचं धाडस करावं ही कथांचं चित्तवेधक आणि तितकीच चित्तथरारक आहे.
बहुतेक वेळा महिला डॉक्टर्सचे उथळ नवरे त्यांच्यावर नियंत्रण ठेवत.काही थोडे आपल्या पत्नीच्या पाठीशी उभे राहत.
आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी यांना पत्नीच्या उज्वल यशाचे श्रेय दिले जाते पण ते देखील काहीसे तिरसट व छळवादी होते. ३१मार्च १८६५ साली पुण्यात आनंदीबाईंचा जन्म झाला. नवव्या वर्षी त्यांचा विवाह पोस्टात कारकून असलेल्या सव्वीस वर्षाच्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. ते विधूर होते. आनंदीबाईवर अधिकार गाजवून तिच्या आयुष्याला आकार देण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. आनंदीबाईं भारतात १८८६ साली परतल्या. त्यांना महिलांना डॉक्टर करण्यासाठी मेडिकल कॉलेज काढावयाचे होते. परंतु अवघ्या बाविसाव्या वर्षी, १८८७ मध्ये त्यांचे दुखःद निधन झाले.
आनंदीबाईप्रमाणेच कदंबिनी यांचे पती द्वारकानाथ गांगुली यांनी पत्नीच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घातलं. आठ मुलांच्या आई असलेल्या कदंबिनी यांनी लोकांच्या कुत्सित टीकाना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण केलं. पण बहुसंख्य बाल विधवा हेमावती यांच्या नव-यासारखे बेजबाबदार दारुडे होते.
महाराष्टातील रखमाबाई राऊत यांची कथा तर आगळी वेगळी आहे. शतकानुशतकांपासून अत्याचार सहन करत आलेल्या जातींमध्ये जन्मलेल्या रखमाबाईंनी चक्क नव-याला घटस्फोट देऊन आपली डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा त्या काळात पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी निकराने लढत दिली.
मुथूलक्ष्मी रेड्डी आणि मेरी पुनेन लुकास या १९२०च्या सुमारास दोन्हीही नव-याच्या छायेतून बाहेर पडल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणानंतर त्या भारतात परतल्या आणि पुढे तर त्या आमदार देखील झाल्या.
या सहा डॉक्टर महिलांची यशोगाथा या पुस्तकात कविता राव यांनी आगळ्यावेगळ्या लालित्यपूर्ण शैलीत साकार केली आहेत.
कविता राव यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उल्का राऊत यांनी अतिशय ओघवत्या व वाचनीय शैलीत केला आहे. यापूर्वी उल्का राऊत यांनी जवळपास २० इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे.
नेहमीच्या वाचकांबरोबरच डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे, असे आहे.

– परीक्षण : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
थोर स्त्रियांची चरित्रं लोकांना प्रेरणादायक ठरतील. या दृष्टीकोनातून हा लेख सुंदर संकलन आहे.
सर, परिक्षण वाचले, खुप छान पुस्तकाचं वर्णन केले आहे. जणूकाही पुस्तकाचा सार निचोड करून सादर केला आहे.