Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : २१

मी वाचलेलं पुस्तक : २१

नायगावकरी

हास्यसम्राट कवी अशोक नायगावकर यांच्या ललित गद्य आणि हास्य कवितांचे पुस्तक इतर काही दिवसांपासून विविध विषयांवरील पुस्तकांचा शोध घेतांना माझ्या नेमके अनवटपणे हाती आले आणि मला जो आनंद झाला त्याला तोड नाही.

अशोक नायगावकर यांच्या कवितेचे मुंबई, पुणे, नासिक येथे झालेल्या अनेक कार्यक्रमास मी हजेरी लावली असल्याने या त्यांच्या पुस्तकाची उत्सुकता शिगेला पोचली ! त्यांच्या कार्यक्रमास सर्वच रसिकांकडून कायम भरभरून दाद मिळत असल्याने त्यांच्या कविता पुस्तकाचा ब-याच दिवसापासून मी शोध घेत होतोच !

या पुस्तकाचे संपादन कवी डॉ. महेश केळुस्कर आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी अतिशय कुशलतेने केले आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. म्हणजे अगदी अलीकडलेच आहे. त्यांचा “वाटेवरच्या कविता” संग्रह १९९२ साली ‘ग्रंथाली’ तर्फे प्रकाशित झाला पण त्याची प्रत काही हाती लागत नाही ! एकूण अशोकजींच्या कवितेचा आशय, सादरीकरण आणि खास नायगावकरी शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे सुयोग्य, वेधक प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेलं आहे.

या कवीची एक व्यक्ती म्हणून जडण घडण, कवितेबाहेर असणारं व्यक्तित्व आणि जगण्याची शैली संपादकांनी उत्तमप्रकारे चित्रीत केली आहे हे अशोकजींच्या निवडक कविता आणि ललित लेखन यावरुन प्रकर्षाने दिसून येते !

नायगावकरांनी बँक ऑफ बडोदात ३१ वर्षे सेवा केली पण हास्य कवितांचे वाढत जाणारे कार्यक्रम पाहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली ! काही काळानंतर लोकसत्ता समुहाच्या ‘हास्यरंग’ या विशेष टँब्लोईड पुरवणी आणि नंतर मासिक आकाराचे संपादनाचे काम जवळपास ९ वर्षे केले. दर रविवारी प्रसिध्द झालेल्या ललित लेखांचे, कवितांचे हे पुस्तक उत्कृष्ठ संकलन, संपादन आहे !

अशोकजी कविता सादर करताना त्यांची मुळची भेदक नजर भोळी करत, चेह-यावर दादा कोंडके, राजा गोसावी, चार्ली चँप्लीन आणि शरद तळवलकरांचा भोळा भाव आणून वर्तमानाला अक्षरशः ‘सोलत’ रहातात, मात्र बोलण अत्रंग वात्रट, मिस्कील!जाडजूड मिश्यांचे,थोराड अंगपींडाचे,अशोकजी सगळं काही माहित असून आपणाला कांहीच माहित नाही असे भोळेपण भासवून पाचसहा मिनिटात हजारो रसिकांची गर्दी ताब्यात घेतात! पंचाहत्तरी गाठलेले, ठणठणीत, आणि खणखणीतपणे कविता मिश्किलपणे सांगणारे आपल्या फजितीचे किस्से निष्पाप चेह-याने सांगतात ही सादरीकरणाची कला असे अशोकजींचे अफलातून वैशिष्ट्य आहे. आपली लोकप्रियता एन्जॉय करणारे, परंतू डोक्यात हवा न शिरलेले, अगदी साधे भोळेपण, प्रसन्न चित्त असलेले हे व्यक्तीत्व आहे !

अशोकजींच्या हातवा-यांची, मुद्दाम घेतलेल्या भोळेपणाच्या सोंगाची आणि प्रत्येक मिनिटांनी “तुम्हाला सांगतो” आणि “वगैरे वगैरे” इत्यादी अनेक शब्द सवयीची प्रचंड हशा- टाळया घेणारी ‘सवय’ अक्षरशः मानली पाहिजे !

हास्य कवी रामदास फुटाणे यांच्या सोबत नायगावकरांनी महाराष्ट्रातील व देशातील अनेक गावी कार्यक्रम सादर केले आहेतच पण स्वतत्रंंपणे परदेशात लंडन, शिकागो, लाँसएन्जेलीस, न्यू कँसल, फिलाडेल्फिया, सिंगापूर, बँकाँक, इस्त्रायल, दुबई, अबुधाबी, कुवेत, दोहा, कतार इत्यादी अनेक ठिकाणी नायगावकर कार्यक्रम गाजवून आले आहेत!

नायगावकर हास्य, व्यंगकवी तर आहेच तसेच अध्यात्म प्रकृतीचे, प्रवृतीचे, भाष्यकार देखील आहेत आसपासचे वास्तव्य परिस्थिती पाहून हळवे होणारे, समाजातील अनेक विषयावरील चर्चेची गंभीर चिकित्सा करणारे आणि आपल्या लेखात, कवितेत भीडभाड न ठेवता हास्यातून कडवी प्रतिक्रिया, मागेपुढे न पहाता व्यक्त करताना या पुस्तकातून नायगावकर दिसून येतात.

श्रीकांत बोजेवारांनी म्हटल्याप्रमाणे ‘हा माणूस दिसतो तसा नाही बर का !’ तर हा माणूस म्हणजे ‘खोल खोल पाणी’ आहे आणि तो पुस्तकातील लेखातून, कवितेतून सहजपणे दिसून येतो !

या हास्य पुस्तकातून नायगावकरांनी स्वप्नाच्या माध्यमातून आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, चिमणराव गुंड्याभाऊ, दत्तू बांदेकर, जी ए कुलकर्णी यांना राज्यातील सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक, सद्यस्थितीचे दर्शन घडविले. तर दाऊद, चित्तमपल्ली, विंदा करंदीकर, शरद पवार, यांचीही छान फिरकी घेतली आहे. चवीला आबा आर आर पाटील, जयंत पाटील, विलासराव देशमुख, मंगेश पाडगावकर, सुभाष भेंडे, आदींवर जाताजाता चिमट्या घेतल्या आहेत. मराठी साहित्य संमेलनांचा तर खुशखुशीत समाचार घेतला आहे. सामाजिक क्रांती वगैरे गंभीर विषयावर तिरकस बाणांनी घायाळ केलं आहे .

आपण परवा चिंतन करायला बसलो तर एकदम डोळ्यासमोर ‘कुरड्या’आल्या यावर लेख लिहून ‘चकली’ वरही एक हास्य कविता केली आहे.
एका कवितेत ते म्हणतात,
“मी आँफिसमध्ये, जाऊन साहेबांना ‘हँपी दिवाळी’ म्हटले ..तर त्यांनी, “तुमचं काय म्हणणं असेल तर रायटिंग मध्ये द्या” असं सांगितलं !

मी ‘सत्यमेव जयते’ म्हणत रस्त्यातून जात होतो तर, अफवा पसरवल्याच्या आरोपातून मलाच आत टाकले”
राज्यकर्त्यांना फोन केला तर भडकले एकदम-मी झोपलोय, कशाला मला उठवलं ? दिवसा फोन करत जाऊ नका म्हणून !

अशा खुप हास्य कविता, लेख या पुस्तकात आहेत. मी हे ‘नायगावकरी’ आतापर्यंत तीस-यांदा वाचत आहे. रसिक वाचकांना ते निश्चितच आवडेल यात तीळमात्र शंका नाही !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. एका हरहुन्नरी विनोदी साहित्यिकाच्या साहित्याचा सुरेख आढावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?