उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याचं, एक वेगळंच आकर्षण पूर्वीच्या बच्चेकंपनीला असायचे. पण सध्याच्या पिढीला मात्र हे अनुभवयास मिळत नाही. गावच्या सुंदर आठवणी आजच्या बदलत्या युगात हरवत चालल्या आहेत. असो…
वर्षभर शाळा व क्लास करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो. त्याचा कंटाळा जाऊन नवा उत्साह येण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते. उन्हाळ्याची सुट्टी नुसती झोपून आणि मोबाईल बघत बसण्यापेक्षा आणि सूर्याला दोष देण्यापेक्षा आपण नवनवीन कला आणि खेळ विद्यार्थ्यांना शिकवावे असे आम्ही, म्हणजे नूतन ज्ञानमंदिर, कल्याण (पूर्व) येथील पूर्व प्राथमिक विद्यामंदिरच्या सर्व शिक्षकांनी ठरवले.
शाळेत प्रथमच ३ ते ५ वयोगटातील मुलामुलींसाठी दि. ११-०४-२३ ते दि. १५-०४-२३ पर्यंत सकाळी १० ते १२ या वेळेत उन्हाळी शिबीर घेण्यात आले. यामध्ये एकूण ६० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिरामध्ये मनोरंजक खेळ, हस्तकला, चित्रकला, कवायत गाणी – गोष्टी, श्लोक, प्रार्थना, गप्पागोष्टी या विषयांवर मार्गदर्शन केले.
टाकाऊ पासून टिकाऊ मध्ये कागदाची पिशवी तयार करणे, होडी, चष्मा इ. वस्तू बनविण्यास शिकवले. तसेच स्वतः ची कामे स्वतः करणे, घरी आईला घरच्या कामामध्ये कशी मदत करायची हे प्रत्यक्ष दाखवले. उदा. कांदे, बटाटे सोलणे, मटार सोलणे, कपड्यांच्या घड्या घालणे इ. तसेच मुलांना भेळ कशी करायची हे देखील शिकवले.
या मुलांना मनसोक्त खेळता यावे म्हणून त्यांना बालोद्यान मधील खेळ ही खेळायला दिले. मैदानात त्यांनी जे खेळ खेळले नव्हते ते खेळ आम्ही घेतले. शनिवारी या शिबिराचा सांगता समारोप संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वैशाली परदेशी व सौ. आसावरी मुळे या उपस्थित होत्या. आसावरी मुळे मॅडम यांनी मुलांना गाणी व गोष्ट सांगून खूप छान मार्गदर्शन केले.
शिबिरातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. तसेच पाहुण्यांकडून मुलांना भेट वस्तू व खाऊ देण्यात आला. पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.अशा प्रकारची शिबिरे शाळेत वेळोवेळी घेण्यात यावीत, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक समिधा कदम, मंगला वाणी, ज्योती महाजन, सविता बरबडे, शीतल सोनावळे, दिपीका पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

– लेखन : आस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800