Home बातम्या यशस्वी होण्यासाठी वकीलांनी अपडेट रहावे-न्या. जितेंद्र जैन

यशस्वी होण्यासाठी वकीलांनी अपडेट रहावे-न्या. जितेंद्र जैन

0

तुम्ही जेव्हा वकिलीचा क्षेत्रात प्रवेश कराल तेव्हा कोणताही खटला लढताना सर्वप्रथम संबंधित प्रकरणातील तथ्य जाणून घेतली पाहिजेत. एखाद्या घटनेतील तथ्य ही खूप महत्त्वाची असून प्रथम तथ्य विचारात घेतली जातात, त्यानंतर कायदा येतो. न्यायमूर्तींनी तथ्य विषयी एखादा प्रश्न विचारला तर आणि त्याचे योग्य उत्तर तुम्हाला देता आले नाही तर तुमची प्रतिमा न्यायमूर्तीं समोर प्रभावहीन ठरते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी केले.

मुंबईतील वडाळा येथील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये नुकतीच राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आभासी न्यायालय स्पर्धेला मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती जितेंद्र जैन, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आनंदराज आंबेडकर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. संजीव बोधनकर, मा. काकासाहेब खंबालकर डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे, ज्येष्ठ वकील कायमार्स केकी केरावाला आदी उपस्थित होते. या स्पर्धेत 16 विधि महाविद्यालयानी सहभाग नोंदवला.

न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी विधि विद्यार्थ्यांना वकीली पेशाबाबत कानमंत्र दिला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, रोज नवीन कायदे येत आहेत. कायद्यात झपाट्याने बदल होत आहेत. दररोज नवीन केस लॉ येत आहेत. त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रात वकिलांनी नेहमी स्वतः अप़डेट राहिले पाहिजे. वकिलांनी केसवर संशोधन केले पाहिजे, तरच तुम्ही वकीली क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकता.

कायद्याच्या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी विधि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करणे आवश्यक आहे. न्यायालयात युक्तीवाद करताना वकिलांनी न्यायमूर्तींसमोर बघून बोलले पाहिजे, त्यातून वकीलांचा आत्मविश्वास दिसतो. तुम्ही इकडे तिकडे बघत, पेपर चाळत युक्तीवाद करू लागला तर न्यायमूर्तींचे तुमच्यावरील लक्ष विचलित होते. न्यायमूर्तीचे तुमच्यावरील लक्ष विचलित होऊ नये, याकरीता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून युक्तीवाद करायला हवा, असे मत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धेत चेंबुर कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ या विधि महाविद्यालयाने प्रथम तर खारघर येथील गोखले एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेजने दुसरा क्रमांक पटकावला. डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.

— टीम एन एस टी. ☎️9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version