चिंता ऐसी डाकिनी, काटि करेजा खाए। वैद्य बिचारा क्या करे, कहाँ तक दवा खवाय। – संत कबीर
गेल्या जवळपास १४ महिन्यापासुन आपण कोरोनाशी लढतो आहोत. कित्येकांना काम नाही, बेरोजगारी आहे. स्वत:च्या भवितव्याची, पैशाची, घरच्यांची चिंता असणे स्वाभाविकच आहे. याच ताणामधुन मग मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार जडतात.
रक्तदाबाविषयी जनजागृती व्हावी म्हणून १७ मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळल्या जातो. जाणुन घेवु याविषयी थोडेसे.
भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण साधारणत: ३० % आहे. म्हणजेच प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय हा उच्च रक्तदाबाचा पेशंट असु शकतो. उच्च रक्तदाब म्हणजे १४०/९० पेक्षा जास्त. पण याचे वेगवेगळे निकष आहेत आणि आपल्या ईतर कोमॉरबीड कंडिशन जसे डायबेटीस, ह्रदयविकार, ईत्यादी यावर उपचार अवलंबुन असतात. यामध्ये तुमचे डॅाक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.
अनियंत्रीत उच्च रक्तदाबचे काही वाईट परिणाम म्हणजे: ह्रदयविकार, किडनी वर दुष्परिणाम, मेंदूमध्ये रक्तस्राव, दृष्टीवर परिणाम होणे .
औषधांसोबत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे भरपूर व्यायाम, योग आणि प्राणायाम.
आपल्या स्ट्रेस प्रमाणे आपल्या शरीरातील स्ट्रेस हॅार्मोन पण वाढतात परिणामी ब्लड प्रेशर पण वाढते.
स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम खुप उपयोगी आहेत. लॅाकडाऊन मध्ये आपण घराबाहेर पडू शकत नाही त्यामुळे घरच्या घरी ४५-६० मिनिटं चालणे हे पण उपयोगी ठरते.
रक्त दाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दुसरा घटक म्हणजे सकस आहार. जेवणात तेल, तूप, तळलेले पदार्थ, जंक फूड टाळणे फार महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मीठाचा वापर कमी करणे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच प्रौढ लोकासांठी फक्त ५ ग्रॅम मीठ प्रतिदिन / प्रतिमाणसी सांगितले आहे. म्हणजेच अतिरिक्त मीठ असलेले पदार्थ जसे लोणची, पापड, मसाले, वेफर्स, कुरकुरे, सोडा, कोल्डड्रिंक्स, यांचा वापर ब्लड प्रेशरच्या व्यक्तींनी वर्ज्य करावा. हल्ली जे डिजिटल बी पी मशीन्स मिळतात त्यापण उपयोगी आहेतच ज्यामुळे आपण घरच्या घरी ब्लड प्रेशर मोजु शकतो.
चिंता ही मानवी मनाची मुलभूत भावना आहे. पण त्याचे जर शरीरावर परिणाम होत असतील तर ती नक्कीच वाईट!
आपण लॅाकडाऊन मध्ये घरी आहोत, बहुतेकांना काम नाही, पुढे काय होणार माहिती नाही. रात्रभर झोप येत नाही किंवा सारखे घाबरल्यासारखे वाटते, रडु येते अशा तक्रारी घेऊन हल्ली अनेक जण माझ्याकडे येत आहेत. लक्षात घ्या हे सर्व होणे नैसर्गिक आहे. काही दिवसांनी सगळं पुर्ववत होईल. पुन्हा आपले नित्यक्रम सुरू होतील, मुले शाळेत जातील. जेव्हा आपण यातुन बाहेर पडू तेव्हा आपल्या मध्ये पु्र्वीपेक्षा दुप्पट एनर्जी, जिद्द आणि आत्मविश्वास असला पाहिजे जो तेव्हा खुप कामी येणार आहे.
म्हणुन जो काही वेळ सध्या आपल्याकडे आहे त्याचा आत्मावलोकन करण्यासाठी वापर करावा. चिंता करणे हे वावगे नाही पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच! नाहीतर डायबेटीस, ब्लडप्रेशर, ह्रदयविकार ही राक्षसं टपुनच बसलेली आहेत.
देवानंद सिनेमात म्हणतो तसं .. हर फिक्र को धुंएं में उडाता चला गया …..
घरी राहा .. कोविडचे नियम पाळा. काळजी घ्या.

– लेखन : डॅा. व्यंकटेश शिवणे.
कन्सल्टंट डायबेटोलॅाजिस्ट आणि मेटाबॅालिक फिजिशियन.
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Really nice information. Helpful for BP patent