दुर्लक्षित बालपण……
भावी पिढीचा एक महत्वाचा आणि तरीही दुर्लक्षित असा घटक म्हणजे रेड झोन मधील मातांची मुलं. भयाण वातावरणात जन्म घेणारी ही निष्पाप मुलं आपलं बालपण अत्यंत असुरक्षित अशा वस्तीत व्यतीत करत आहेत आणि बालहक्काच्या मूलभूत गोष्टीदेखील या बालकांना उपलब्ध होत नाही. या मुलांच्या मानसिक, सामाजिक व आरोग्य या विषयावर मी आचार्य पदवी प्राप्त केली आहे.
या विषयावर आचार्य पदवी प्राप्त करणारी मी महाराष्ट्रातील पहिली महिला अभ्यासक आहे.
या अभ्यासाच्या आधारावर मी काही संशोधनात्मक सत्य कथा लिहिल्या आहेत. तसेच माझी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत..
या कथा आणि त्यांची त्रासद बाजू, यांची चर्चा करताना काही घटनांचा उल्लेख करता येईल….
एकदा मी रेड झोन मधील एक सहा सात वर्षाच्या मुलीला आणि तिच्या आईला भेटायला गेले होते. शब्बो मला बघून धावत माझ्याकडे आली आणि अचानक तिने माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तिने पहिला प्रश्न टाकला, “दीदी, क्या मै और माँ यहां से दूर जा सकेगे ?” तिचे चमकणारे डोळे मला होकारार्थी उत्तर मागत होते.
“तू रोज स्कुल जाया कर. पढाई करके बडी बन जायेगी तो, माँ को लेकर यहांसे चली जाना.” मी शब्बो च्या डोळ्यात एक स्वप्न पेरलं होतं जणु.
“मैं अगर रोज स्कुल जाऊं तो, मै इस बस्ती से बाहर जा सकुंगी ना दीदी ?” आठ वर्षाच्या चिमुकलीने मला परत प्रश्न विचारला होता. अश्या अनेक शब्बो इथे एका शिक्षण ज्योत च्या प्रतिक्षेत आहेत.
या मुलांना सामान्य जीवन प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे एकच उत्तम माध्यम आहे याची जाणीव झाली आणि या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याचे माझे प्रयत्न सुरू झाले.
वेश्यावस्तीच्या एकूण वातावरणाचा अभ्यास करता, वेश्यावस्ती म्हणजे एक अनौरस ठरवलेल्या व्यवसायाची बाजारपेठ. तिथलं निरागस पिक म्हणजे वेश्या मातांची ही लहान लेकरं. काहीच दोष नसताना इथल्या असुरक्षित वातावरणात बालपण नासत जातं, जळतं राहतं. तारुण्याच्या उंबरठ्यावर येण्याआधीच करपून जातं. पोटभर अन्न, अंग झाकण्या इतपत कपडे आणि सुरक्षित निवारा या मुलभुत गरजा पूर्ण होणे हे देखील स्वप्नच त्यांच्यासाठी.
फुटा फुटावर जुगाराचे अड्डे, सिगारेटचा धुर, दारूचा वास, उघडी गटार, कचऱ्याचे ढीग, फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा काचेचा चुरा सर्वत्र पसरलेला असतो वस्तीत तो, मुलांच्या इवल्याश्या पायांना टोचत राहतो दिवसभर. कचऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या बाटल्या शोधुन काढताना गुलाबी हातावर कितीतरी जखमा होतात. या बाटल्या भंगारवल्याला विकुन त्या पैशाचा जुगार खेळतात. दोन अधिक दोन चार हे गणित शिकण्याआधीच वस्तीने त्यांना दो का चार हा सट्टा शिकवला असतो.
गिर्हाईकांना दारूच्या बाटल्या, सिगारेट अणि लागेल ते आणुन देणे हा त्यांचा पहिल्या कामाचा अनुभव असतो. त्यातुन मिळालेल्या चार दोन पैशानें वस्तीत सुरू असलेले सगळे अनौरस प्रयोग करून करून ते बालपण होरपळत जातं. वेश्यावस्तील आईच्या खोली पासुन शाळेचे दीड किलोमीटर एवढं अंतर गाठायला मुलांना वस्तीतल्या पेटत्या रणांगणातून जावे लागते. कसे पोहोचतील सुरक्षित शाळेपर्यंत ? मीच विचारचक्रात अडकले होते. शब्बोच्या सकारात्मक उत्तर देणं गरजेचं होतं. मी म्हणाले, ”हां तू मन लगाकर पढाई कर. और रोज स्कूल जाया कर”. शब्बोला पावती मिळाल्याचा आनंद झाला.
रेड झोन मधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं खूप मोठं आव्हान होतं आणि आहे. पी एच डी करताना मी या मातांना, शाळेतील शिक्षकांना आणि मुलांना भेटत असे तेंव्हा प्रामुख्याने जाणवत असे की मुलांना त्यांच्या, कधी अपूर्ण कधी वडिलांच्या खोट्या नावाची चीड येत असे. आईचं नाव लावावं लागत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळत असे. यासाठी त्यांची मानसिक तयारी करून देणं खूप महत्त्वाचं होतं. वारंवार त्यांच्याशी बोलून त्यांना शाळेची गोडी लावण्याचा प्रयत्न मी करत होते. लहान मुलांना अंगणवाडीत पाठवण्यासाठी पण मी मातांना तयार करत असे.
या निष्पाप बाळांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सामान्य जीवन जगता यावं आणि त्यांचं होरपळलेलं बालपण सुरक्षित होऊन एक सक्षम नवीन पिढी निर्माण व्हावी अशा सकारात्मक विचारांची पेरणी या उद्देशाने हे प्रयत्न केले आहेत. मी मुलांच्या डोळ्यात वस्ती बाहेरच्या विश्वाचे स्वप्न पेरत गेले. शिक्षण, शाळा हे एकमेव माध्यम आहे जे त्यांना इथून बाहेर काढून एक सुरक्षित जीवन देऊ शकते.
परिस्थिती इतकी भयानक आहे की, त्यांनी स्वतः इथून निघण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे. अनेक संस्था, शासन यांच्या प्रयत्नांना या मुलांनी आपल्या स्वप्नांची जोड देऊनच हे शक्य होणार आहे.
वस्तीच्या आसपास अशी काही कुटुंब होती ज्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अशी कुटुंब या महिलांच्या मुलांना काही काळ आपल्या घरी राहण्याची परवानगी देतील यासाठी प्रयत्न केले. या महिला आणि मुलं प्रेम, नाती, घर या गोष्टीसाठी आसुसलेले होते. त्यामुळे त्या महिला पैसे देऊन काही मदत करून अश्या कुटुंबाशी नाते जोडत होत्या आणि मुलांना पण एक घर मिळत असे..आणि याच गोष्टीचा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकेल याचा विचार करून या कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन जर काही काळ मुलं यांच्याकडे राहून शिक्षण घेऊ शकतील या प्रयत्नात मला काही प्रमाणात यश आलं. काही कुटुंब यासाठी तयार झालीत आणि अगदी थोडी मुलं का होईना काही वेळ या कुटुंबात राहू लागली. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यास जागा आणि वातावरण दोन्ही मिळू लागलं.
असे अनेक प्रयत्न करून काही अगदी थोडी का होईना मुलं शिकू लागली. आज ती मोठी झाली. छान नोकरीला लागली आणि आपल्या आईला देखील तिथून बाहेर घेऊन गेली. आज ही अनेक दृष्टीने अनेक संस्थांच्या माध्यमातून जुळून हे कार्य पुढे जात आहे.
कुठलाही दोष नसताना ही मुलं अत्यंत दुर्लक्षित जीवन जगत आहेत, हे संपूर्ण समाजासाठी घातक आहे. या लाल दिव्याच्या वस्तीतील मुलांना त्याचे बालहक्क मिळायला हवे आहेत. त्यांना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी आहे.या संधी द्वारे ते जीवनाच्या सामान्य प्रवाहात निश्चितच सामील होऊ शकतील.

– लेखन : डॉ.राणी दुष्यंत खेडीकर, बालमानस तज्ञ
मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800