अनेक व्यक्तींचे आयुष्य नोकरी किंवा व्यवसाय करण्यात भर्रकन निघुन जाते, पण निवृत्ती नंतरचे काय ? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहतो. आर्थिक सुबत्ता असली तरीही वेळ खायला उठतो. निवृत्तीमुळे त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक स्थानाला धक्का बसतो. त्यातून काहीच छंद नसेल तर विचारायलाच नको.
माझे सहकारी श्री. विनय सामंत यांचेही निवृत्ती नंतर असेच काहीसे झाले. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात छायाचित्रकार म्हणुन ३७ वर्षे नोकरी केल्यावर ते सेवानिवृत्त झाले. या खात्याचे काम व त्यातही छायाचित्रकार म्हटले की अक्षरशः ३६५ दिवस काम असते. कोणत्याही वेळी, कशासाठी छायाचित्रणाला धावावे लागेल याचा भरोसा नसतो. त्यात मंत्रालयातील नोकरी म्हणजे माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, विविध प्रकारच्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रमांचे छायाचित्रण, कधी कधी नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती असे एक ना अनेक क्षण आव्हानात्मक असतात. त्यामुळे जीवन अधिकच गतिमान होते. साहजिकच निवृत्त झाल्यावर सामंत यांना वेळ खायला उठला.
पालघर जिल्ह्यातील सफाळे या मुळ गावी सामंत यांची वडिलोपार्जित शेतजमीन होती. पण शेती करणे आता किफायतशीर राहिले नाही. त्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणुन कृषी पर्यटन केंद्राची कल्पना त्यांना सुचली. शासनाने या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे, त्याचीही त्यांना कल्पना होतीच. यातुनच प्रयत्न पूर्वक त्यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारण्यास फेब्रुवारी २०२० पासुन सुरवात केली. पण कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन झाले आणि सर्व कामांना खीळ बसली. तरी पण न डगमगता, सर्व अडचणींवर मात करत २७ सप्टेंबर २०२० या जागतिक पर्यटन दिवशी त्यांनी “ग्रीन फार्म ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट” सुरू केले.
जवळपास दीड एकर जागेवर हे रिसॉर्ट आहे. यात ४ मोठे सूट आहेत. जवळपास ४० लोकांची व्यवस्था एकावेळी होऊ शकते. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या चवदार जेवणाची येथे सुंदर व्यवस्था आहे. पर्यटकांना सोयीचे होतील अशी विविध पॅकेजेस येथे ठेवण्यात आली आहेत. पर्यटकांसाठी येथे जलतरण तलाव आहे. मुलांसाठी स्वतंत्र तलाव आहे. रेन डान्स, कॅरम, बुद्धिबळ असे विविध खेळ येथे आहेत.
सफाळ्याच्या आसपास करवाळे धरण, केळवा बीच, वसई किल्ला, तांदुळवाडी किल्ला, सातवली येथील गरम पाण्याचे कुंड पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रिसॉर्ट मध्ये विविध चित्रीकरणही होत असते.
सफाळे येथे डहाणू लोकलने जाता येते. तेथुन रिक्षाने या रिसॉर्टला पोहचता येते. रस्ता मार्गे वेस्टर्न हायवेने सफाळे- वरई फाट्या वरुन येथे पोहोचता येते. या रिसॉर्टच्या बुकिंग साठी “जस्ट डायल” वर सुविधा उपलब्ध आहे. गुगल आणि फेसबुक वर सुद्धा या रिसॉर्टची माहिती उपलब्ध आहे.
सामंत यांच्या या उपक्रमात, त्यांची पत्नी सौ. स्नेहा, मुलगा निनाद, दुबईचे माहेर असलेली सून सौ. डिंपल यांचे पूर्ण प्रोत्साहन व सहकार्य आहे.
या रिसॉर्टला मी नुकतीच दुसऱ्यांदा भेट दिली, इतके ते मला आवडलं . स्वतः विनय सामंत इथे नियमित उपस्थित राहून अतिशय अगत्याने सर्वांकडे लक्ष देत असतात.त्यांचे सर्व सहकारीही पर्यटकांकडे आपलेपणाने बघत असतात. त्यामुळेच इथे एकदा येऊन गेलेले पर्यटक परत परत येत असतात.
मी छायाचित्रकार झालो नसतो तर गायक झालो असतो, असं म्हणणाऱ्या विनय सामंत यांच्याकडून इथे येणारे अनेक जण गाणी गायचे धडे घेत असतात. ते पुढेही संपर्कात राहून स्वत:ची प्रगती कळवतात. तसेच सामंत यांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात, याचा सामंत यांना खूप आनंद होतो.
इथे येऊन जाणाऱ्यांकडून रिसॉर्टचं गुणगान ऐकणारे स्वतःहुनच इथे येतात. त्यामुळे सामंत यांना वेगळी जाहिरातबाजी करायची गरजच पडत नाही. बऱ्याचदा अनेक महत्वाच्या व्यक्ती इथे येत असतात. त्याही सामंत यांचं भरभरून कौतुक करतात.
अल्पावधितच हे रिसॉर्ट इतके लोकप्रिय का झाले ? याचे रहस्य काय आहे ? हे पाहण्यासाठी अनेक जुनेजाणते रिसॉर्ट मालक, चालक इथे भेट देत असतात.यावरूनच या रिसॉर्टचं यश दिसून येतं.दिवसेदिवस वाढत्या पर्यटकांमुळे आहे ती व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे निवास व्यवस्था वाढविणे, ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलं यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार करणे, क्रिकेटप्रेमींसाठी नेट क्रिकेटची व्यवस्था करणे यासाठी सामंत नियोजन करीत आहेत.
विशेष म्हणजे रिसॉर्टला मिळणारा प्रतिसाद पाहून वसई विरार महानगपालिकेत सिव्हील इंजिनियर असलेल्या त्यांच्या मुलाने, निनाद याने सुरक्षित नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता तोही पूर्णवेळ रिसॉर्टकडेच बघत आहे.
खरोखरच, निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता, आला दिवस कसातरी ढकलत न राहता एक नवा उपक्रम सुरू करण्यासाठी जे धाडस व धडाडी विनय सामंत यांनी दाखवली आहे या बद्दल त्यांचे व सुरक्षित नोकरी सोडून त्यांना साथ देणारे त्यांचे पुत्र निनाद आणि सर्वच सामंत कुटुंबीय यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
(निवृत्त माहिती संचालक). 9869484800
Keep it up vinay bhai
विनय सामंत यांनी हाती घेतलेला प्रकल्प स्तुत्य आहे.
🌹अभिनंदन श्री. विनय सामंत जी 🌹
खूप छान प्रकारे उपक्रम राबविला. आज मुंबई पासून जवा अशा सुविधा उपलब्ध झाली. एक तर मराठी माणूस असं धाडस करीत नाही. त्यामुळे आपल्याला विशेष धन्यवाद. 🌹
माननीय भुजबळ साहेबांनी योग्य प्रकारे माहिती दिली. कारण लवकर अश्या गोष्टी समजून येत नाहीत.
धन्यवाद साहेब.
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ