Tuesday, June 17, 2025
Homeसंस्कृतीसमाज सुसंस्कृत कधी होईल?

समाज सुसंस्कृत कधी होईल?

वृत्तपत्र म्हणजे समाजातील घडामोडींचा स्वच्छ आरसा आहे. समाजातील सत्य घटना निर्भीडपणे आपल्यापर्यंत पोहचवण्याचे अमूल्य काम वृत्तपत्र करत असते. आज वृत्तपत्र आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्याशिवाय दिवसाची सुरवात होत नाही. वर्षातून कधीतरीच सुट्टी घेणारे वृत्तपत्र नसले तर त्या दिवशी करमत नाही त्याची एवढी सवय झाली आहे. पहिला चहा व वृत्तपत्र असे समीकरणच झाले आहे .

सत्य हे कितीही कटू असले तरीही ते परखडपणे, निष्ठेने व प्रामाणिकपणे सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे लाख मोलाचे काम हे पत्रकार करत असतात. वेळी अवेळी आपला जीव देखील धोक्यात घालून बातमी देणाऱ्या ह्या समस्त पत्रकार बंधू भगिनींना सलाम. मात्र आजकाल वृत्तपत्रातील काही बातम्या वाचून अंगावर शहारे उभे राहतात. समाजात हे काय चाललंय ? पैशांसाठी मनुष्य काहीही करू शकतो त्याला मोजमाप नाही. माणूस एवढा कसा निष्टुर आणि निर्दयी झाला आहे? हे प्रश्न पडतात. ह्यांना माणूस म्हणावे का? माणुसकीच्या नात्याला काळिमा लावणाऱ्या अनेक गोष्टी अगदी रोज घडतात. पैशांसाठी खून होतात, कट कारस्थाने रचली जातात, संपत्तीसाठी घर अथवा जमिनीसाठी सख्खा भाऊ भावाला मारतो. ह्या पैशांमुळे रक्ताची नाती दुरावतात. सख्खे भाऊ पक्के वैरी होतात.

परवा एक बातमी वाचली व माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एका मुलाने ७५ वर्षीय आईला जोरात मुस्काटात मारली व ती माऊली जागच्याजागी मरण पावली. काय म्हणावे ह्याला? फार संताप येतो हे सर्व वाचून. तिरस्कार वाटतो अशा माणसंचा. ह्यासाठीच का त्या माउलींने त्याला जन्म दिला? लहानाचे मोठे केले? वृत्तपत्रात रोज बलात्काराची एक तरी बातमी असतेच. हे नराधम एवढ्यावर न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी त्या स्त्री अथवा मुलीला मारून टाकतात. लहान मुली देखील सोडत नाही. काय म्हणावे ह्यांचा पाशवी मानसिकतेला? हे तर मनुष्याच्या रूपातील राक्षस आहेत.

ह्यांना तर जीवंतपणी जाळले पाहिजे. कारण फाशीसारखी शिक्षा देणे म्हणजे त्या बलात्कार पीडितेवर केलेला अन्याय आहे. शिक्षा इतकी कठोर हवी की या पुढे अशी चुकीची गोष्ट करण्याची कोणीही हिम्मत करणार नाही. आज केवळ पैशांसाठी लहान मोठया मुलींची तस्करी केली जाते. नोकरी अथवा लग्नाचे आमिष दाखवून निष्पाप मुलींना जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे त्यांचे पूर्ण आयुष्य उध्वस्त होते.

आज भ्रष्ट्राचाराच्या देखील अनेक घटना रोज होतात. बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते. रस्ते तर असे असतात की दर वर्षी त्यांना मलमपट्टी करावी लागते. कधीतरी असे वाटते की हे रस्ते सिमेंटचे असतात का नक्की? का शेणाने सारवतात? ह्याचे उत्तर आज पर्यंत कोणालाही मिळाले नाही. ह्या रस्त्यांमुळे, ह्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे अनेकांचे प्राण जातात. याला कोण जबाबदार आहे सांगा?

बँकेत देखील अनेक घोटाळे होतात आणि हे करणारे सामान्य नव्हे तर तथाकथित प्रतिष्ठित मंडळीच जास्त असतात. घोटाळे करून ते निवांत फिरतात. तर दुसरीकडे गरीब, कष्टकरी शेतकरी, सामान्य माणूस ह्यांचे कर्जाचे हप्ते थकले तर लगेच घरावर, दुकानांवर जप्ती येते हा कोणत्या न्याय म्हणावा? गुंडगिरी करणारे ही अनेक आहेत जे अक्षरशः हातगाडी चालवणाऱ्यांकडून हप्ते गोळा करतात. फुकट खातात. चोऱ्यांचीही रोज बातमी असते. घर फोडले, दुकान फोडले, एटीम फोडले आणि कहर म्हणजे देवाचे दागिनेही चोरायला ह्यांना लाज वाटत नाही.

दुर्दैवाने आज चुकीच्या गोष्टीत महिला देखील मागे नाहीत ही अतिशय खंत करण्यासारखी गोष्ट आहे. एक दोन दिवसांच्या बाळाला चोरणारी महिला ही स्वतः स्त्री असून एक आई असून असे कृत्य कसे करू शकते? आज काल हनी ट्रॅपच्या ही घटना घडतात. हे वाचायलासुद्धा लाज वाटते. पैशांसाठी महिला स्वतःचा स्वाभिमान ही विकु शकतात?

अर्थात समाजात सर्व काही वाईटच चालू आहे, असे नाही. अनेक इमानदार, कष्टाळू लोक आहेत. अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या वृद्धाश्रम,अनाथ आश्रम चालवतात. अनेक दानशूर व्यक्ती आहेत जे अन्नदान, ज्ञानदान सारखे मोलाचे काम करतात. आज समाजात केवळ ह्या व्यक्तींमुळे ह्या पृथ्वीचा तोल राखला आहे. असे मूठभर लोक हीच आपल्या समाजाची शान आहे. मनुष्यात माणुसकी आहे ही हे ह्या मंडळींकडे पाहून जाणवते. मात्र त्यांचं प्रमाण वाढत राहणं हिच सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक गोष्ट आहे.

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments