Saturday, June 14, 2025
Homeलेखसाने गुरुजी : पुण्य स्मरण

साने गुरुजी : पुण्य स्मरण

अजून आठवते, शाळेत आम्हाला “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना होती. खूप आवडायची मला. तेव्हा सुरवातीला ही प्रार्थना साने गुरुजींनी लिहिली आहे हे माहिती नव्हतं.

पण इतक्या आदर्श देवमाणसाचा शेवट अशा पद्धतीनं व्हावा हे एक न उलगडणारे कोडेच आहे. काही प्रश्नांची उत्तरे ही कदाचित कधीच मिळत नाहीत हेच खरे. हे प्रश्न कायमची रुखरुख लावून आपल्या मनात ठाण मांडून बसतात.

आज ११ जुन. सानेगुरुजीचा स्मृतिदिन. हा दिवस येतानाच मुळी दुहेरी चटका लावून येतो. आपल्या समाजाला नितांत गरज असताना गुरुजींचे आपल्यातून कायमचे जाणे आणि ते मरण ही त्यांनी स्वतःच्या हातांनी, मनानी निवडलेले. त्यांनी कुठल्यातरी कारणाने हा टोकाचा निर्णय घेतला असावा. कारण त्यांचं मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते आणि स्वभाव अतिशय भिडस्त होता.

नंतरनंतर वाचनाची आवड लागली. मग दर्जेदार वाचन म्हणजे नेमके काय ही पण अक्कल आली. ह्या काळात काही पुस्तकं ही पार मेंदूचा कप्पा अडवून, मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन कधी आणि कशी विराजमान झालीत हे ही कळलं नाही. त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे “श्यामची आई”. हे पुस्तक अजिबात आंधळे नसलेलं, नात्यातील प्रेम कसं असतं ह्याची नेमकी जाणीव करुन देते. जबाबदारीने वागणे, त्या त्यागातील समाधान, परस्परांवरील विश्वास आणि आदर्श जीवनशैली कशी जगावी हे नेमके शिकवते.

गुरुजींचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण खरे तर तसे हलाखीच्या परिस्थितीत झाले. १९३० पर्यंत त्यांची विद्यार्थी दशा आटोपली. त्यानंतर त्यांनी सत्याग्रहात भाग घ्यायचं ठरविलं. विनोबा भावे ह्यांचा आदर्श. गुरुजी खादीचा वापर करीत.

साने गुरुजींनी विपुल वाड्यमय लिहिले. लेख, कादंबऱ्या, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, ई. साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांचं लेखन होते. त्यांचं लिखाण साधं, सरळ, सगळ्यांना उमगेल असे होते. साहित्यातील तेजस्वी रत्न म्हणजे “श्यामची आई” हे पुस्तक.

भारताच्या एकत्वाला प्रांतवाद बाधक ठरणार आहे हा अंदाज असल्याने गुरुजींनी “आंतर भारती”ची स्थापना करण्याचे महान कार्य हाती घेतलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन प्रमाणे आपल्या भागातील मुलांसाठी अशी सोय असावी ही त्यांची आंतरिक ईच्छा होती. परंतु “दैवईच्छा बलियसी” ह्यानुसार त्यांचे कार्य अपूर्ण असतानाच त्यांचे देहावसान झाले. त्यांना शतशः प्रणाम.

कल्याणी बापट

— लेखन : कल्याणी बापट. बडनेरा, अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments