संत जनाबाई
प्राचीन मराठी वाङ्ममयात संत कवयित्रींनी मोलाची भर घातली आहे. आद्य कवयित्री महदंबा, संत परंपरेतली जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई यांसारख्या अनेक कवयित्रींनी मराठी वाङ्यात अमिट ठसा उमटविला आहे..
तुकारामांच्या समकालीन वारकरी संप्रदायात स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, बहिणाबाई यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांच्या अभंग रचना या सर्वसामान्य स्त्रीला आपल्याशा वाटणाऱ्या असल्याने, जात्यावरच्या ओव्या दळणकांडण करतांना म्हटल्या जायच्या. दररोजच्या उपयोगातील आणि व्यवहारातील प्रसंगांना अनुसरून केलेल्या या अभंग किंवा ओव्याची रचना जनसामान्यांना जास्त आपलीशी वाटणारी आणि नकळत काहीतरी शिकवण देणारी होती.
यातील संत जनाबाई यांचा काळ म्हणजे इसवी सन १२५८ ते १३५०.
मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत जनाबाई यांची आज ओळख करून घेऊया…
वारकरी संप्रदायाच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संत जनाबाई..
संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री…
संत जनाबाई यांचे गुरु संत नामदेव..
संत कवयित्री म्हणुन महाराष्ट्राच्या हृदयात जनाबाईंच्या अभंगातील ओव्या कोरल्या गेल्या आहेत आजही ग्रामिण भागातील महिला जात्यावर दळण दळतांना जनाबाईंच्या ओव्या गुणगुणतांना आपल्याला दिसून येतात
अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे..
संत जनाबाई यांना नामयाची दासी असं स्वतःला म्हणून घेताना आनंद व्हायचा.. संत नामदेवांच्या घरात वावरतांना जनाबाईंचे विश्व तरी केवढे असणार ? अंगण, तुळशी वृंदावन शेण गौऱ्या वेचायाची जागा, कोठार, माजघर… या शब्दांचा उल्लेख जनाबाईंच्या ओव्यांमधून आपल्याला होताना दिसतो. या रोजच्या गाठ पडणाऱ्या गोष्टीं.. यामध्ये जनाबाईला परमेश्वर दिसतो, भेटतो व यातच जनाबाई भगवंताला शोधते…
प्रत्येक गोष्टीत भगवंत दिसावा एवढे जनाबाईच्या मनाचे चःक्षु विशाल झालेले आपल्याला दिसतात हा निर्वीकार भाव जनाबाईंचे व्यक्तिमत्व कितीतरी उंचीवर नेऊन ठेवतो.
संत नामदेव हे विठ्ठल भक्त..
जनाबाईंनाही विठ्ठलाच्या भक्तिची गोडी निर्माण झाली.. कोणतेही काम करत असतांना त्या सतत परमेश्वराच्या नामात तल्लीन राहात असत.. काम करताना त्या नामात एवढया तल्लीन होऊन जातं असतं की ते कार्य त्यांच्याकरता देवाचं कार्य होऊन जात असे.. प्रत्यक्ष विठ्ठलही त्यांना त्यांच्या कामात सहाय्य करत असत..
“झाडलोट करी जनी। केर भरी
चक्रपाणी !!
पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां
टाकी दुरी !!
ऐसा भक्तिसी भुलला। नीच
कामें करूं लागला !!
जनी म्हणे विठोबाला। काय
उतराई होंऊ तुला !!”
जनाबाई म्हणतात… मी झाडलोट केली तर माझा श्रीहरी केर उचलतो दूरू जाऊन फेकून देतो माझ्या भक्तिला माझा विठ्ठल असा भुलला आहे की माझी सगळी कार्ये तो करू लागला आहे… याची परतफेड मी कशी आणि कोणत्या प्रकारे करणार आहे ? विठ्ठला मी तुला कशी उतराई होऊ ?…
त्यांना संतसंग हा नामदेवांमुळे लाभला. श्री संत ज्ञानदेव… संत विसोबा खेचर… संत नामदेव… संत जनाबाई अशी ही गुरू परंपरा आपल्याला पहावयला मिळते…
जनाबाईंच्या नावावर असलेले जवळजवळ साडेतीनशे अभंग सकल संत गाथा या ग्रंथात समाविष्ट झालेले आहेत. संत एकनाथ महाराज यांचे नातू महाकवी मुक्तेश्वरांना संत जनाबाईंच्या थाळीपाक आणि द्रौपदी स्वयंवर या अभंगांमुळे स्फूर्ति मिळाली होती…
जनाबाईंच्या काव्यामधून त्यागी वृत्ती, सहनशिलता, वात्सल्य, कोमल, ऋजुता, समर्पणाची वृत्ती, स्त्रीच्या भावना उत्कटपणे दिसून येतात.
!! एक ना अवघे सार। वरकड
अवघड ते असार
नाम फुकट चोखट । नाम घेता
न ये वीट !!
संत जनाबाईंच्या अभंगातील भाषा ही सर्वसामान्यांना अगदी सहज समजेल उमजेल अशीच आहे त्यांच्या रचना हृदयाचा ठाव घेतात. नामदेव गाथेत सुध्दा जनाबाईंचे बरेच अभंग आपल्याला आढळतात..
संत जनाबाईंचे गोड अभंग…पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई सुखदु:ख जाणून घेणारी माऊली जनी असा या विठाईच्या नावाचा उल्लेख करते…या विठाईची वाट पाहून जनाबाई व्याकूळ होते… पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणा-या जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो. तेव्हा आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे …
‘”धरिला पंढरीचा चोर”’
या अभंगातून ती सांगते…
“माझे अचडे बचडे छकुडे
गं राधे रुपडे !
सारखे संत जनाबाई यांचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत…
जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं.
! दळीता कांडिता तुज
गाईन अनंता !
हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलंसं वाटतं आहे. जनाबाईंनी दाखवलेला
“लेकुरवाळा विठूराया’” संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे…‘
! नाम विठोबाचे घ्यावे मग
पाऊल टाकावे’ !
हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात…
जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊल खुणांवरून प्रवास करणारी संत जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिल्या..
पंढरपूर या तिर्थक्षेत्री विठ्ठलाच्या महाव्दारी जनाबाई पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या… समाधिस्थ झाल्या..
क्रमशः

– लेखन : संगीता कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800