Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यसाहित्य तारका : ८

साहित्य तारका : ८

संत बहिणाबाई

महाराष्ट्रातील संत कवयित्रींमध्ये संत तुकारामांची एकमेव शिष्या म्हणून वारकरी सांप्रदायिक संतांमध्ये आगळेवेगळे स्थान प्राप्त झालेल्या संत बहिणाबाई ..
प्राचीन संत कवयित्री तारकांमध्ये स्वतःच्या अभंग वाणीने स्वयंप्रकाशी अशी स्वतंत्र आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण जीवन कहाणी असणारी, संत बहिणाबाई स्वयंप्रकाशी “तारका”
त्यांचा अभंगवाणी हाच स्वयंप्रकाश होय.. त्यांच्या अभंग वाणीने ” स्वात्मचरित्रकार” म्हणून नावलौकिक प्राप्त केला.

संत कृपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले
देवालया
नामा तयाचा किंकर तेण
विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला
भागवत
तुका झालासे कळस भजन करा
सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले
ओजा
!!
या प्रसिध्द अभंगाची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई..

संत बहिणाबाईचा वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे इतिहास कथन करणारा अविस्मरणीय अभंग.
संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकाराम यांच्या शिष्या…
स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे..
वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी व कोणी केली यासंदर्भात हा अभंग लिहिलेला आहे. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री बहिणाबाई या संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या होत.. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या अभंगातून आढळतो.. वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगात केले आहे . संतांचा वाटा किती मोलाचा आहे हे दिसून येते आणि या इमारतीची जपवणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेची आहे .संतांची कृपा झाली व त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली फलद्रूप झाली असा आशय या ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. संतांबद्दलचा बहिणाबाईंच्या मनातील परम आदरभाव येथे दृष्टीस पडतो.

या अभंगाची भाषा साधी व सोपी आहे इमारतीचे यथोचित रुपक योजिले आहे .. संत ज्ञानेश्वर हे पाया, संत नामदेव हे भितींचे दगड, संत एकनाथ हे खांब आणि संत तुकाराम महाराज हे मंदिराचा कळस अशी वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केली आहे. सर्व सामान्य माणसाला समजेल उमजेल असा हा अभंग सहजपणे वापरला आहे.. संतकृपेची महती लोकमानसात साध्या-सोप्या भाषेत मनात बिंबवली आहे..
संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयत्रीचे हे अभंग आहेत. तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.

अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून सातशे बत्तीस कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगांतून तुकारामांचे दर्शन घडते… घडत जाते..
बहिणाबाईची काव्यशैली साधी, सरळ परंतु हृदयस्पर्शी अशी आहे..
संत बहिणाबाई आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत. बहिणाबाई म्हणतात..
तुका सद्गुरु सदोहर
भेटतो अपार सुख होव
तुकारामा भेटला धन्य जिने
माझे कृत्यकृत्य झाले सहजाचि

बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. त्यांनी आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि ‘श्री गजानन विजय’ कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात… पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर … त्यांच्या अभंगांंपैकी ..
!! संत कृपा झाली इमारत फळा आली !! हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि… !! घट फुटलियावरी नभ नभाचे अंतरी !!
हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे…

स्त्री संताच्या महत्त्वपूर्ण मांदियाळीमधील बहिणाबाई गाय-वासराशी असलेल्या गूढ नात्यामुळे इतर संतांमध्ये लक्षात राहणारी.. जिच्या नावात बहिण आणि बाई ही नाती स्पष्ट होतात..बहिणीप्रमाणे माया करणारी… प्रेमळपणाचा उच्चांक.. प्रेमाची व्याप्ती विस्तारत जाऊन ब्रह्मांडापर्यंत घेऊन जाणारी.. बाई शब्दातून तिचं समाजातलं स्थान हे मर्यादा सुचवतं परंतु या सगळ्यांच्या पल्याड असणारं अनंत परमार्थाचं अलौकिक सामर्थ्य अंगी मुरवून आत्मानंदात निमग्न असणारी.. सामान्य आणि संतापर्यंतचा अवघड प्रवास कथन करणारा हा जीवन प्रवास.. लौकिक सांभाळून पारलौकिक साधणारी बहिणाबाई संतत्व हे अंर्तमुख करणार व आत्मारामापर्यंत घेऊन जाणारं हे नक्की..! अवघ्या वसुंधरेवर भक्तीचा मळा फुलवत ठेवणारी बहिणाबाई भक्ती, तृप्ती, शांती व परमशांती याचं भरभरुन पीक काढणारी.. भक्तीचा मळा लावणारी, शिंपणारी व फुलवणारी संत बहिणाबाई…!

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments