प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी पैशांची गरज असते. पण पैसा सगळं काही नाही. माणसाने स्वार्थ जरुर साधावा मात्र परमार्थ साधण्याचाही प्रयत्न केला तर जीवनात आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, असे विचार, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक व न्युज स्टोरी टुडे या प्रसिद्ध वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले.
नाशिक मुख्यालय असलेल्या इंटरनेट रेडिओ विश्वास वरून नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘आजचे पाहुणे‘ या कार्यक्रमाच्या मुलाखतीमधून त्यांनी आपले विचार प्रकट केले. रेडिओ विश्वास च्या समन्वयक व प्रसिद्ध एकपात्री कलाकार मेघना साने यांनी त्यांची ही मुलाखत घेतली.

यावेळी दहावी नापास ते महाराष्ट्र शासनाच्या, माहिती संचालक पदापर्यंतचा प्रवास खडतर प्रवास कसा झाला, हे मुलाखती दरम्यान उलगडत असतांना ते म्हणाले की, मी जेमतेम दहा वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे अकोला सोडले आणि पुण्याच्या भावाकडे आलो.
पण भावावर पडणारा आर्थिक भार मनाला अस्वस्थ करीत होता. त्यातच मी दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे माझीच मला लाज वाटत होती. कालांतराने अहमदनगर येथे राहणार्या भावाकडे आलो आणि कॉलेजचे पुढचे शिक्षण सुरू झाले. त्याचवेळी नगरमधील एका आईसक्रीम पार्लरमध्ये काम मिळाले. हे करीत असताना तेथीलच एका वृत्तपत्रात पार्ट टाईम पत्रकार म्हणून काम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र अडचणी कितीही आल्या तरी पुढे जाण्याचा मार्ग थांबता कामा नये, हे लक्षात घेऊनच आणि जीवनात पुढे जायचे असेल तर पदवीपर्यंत शिकलेच पाहिजे, असा आईने दिलेला मूलमंत्र ध्यानात ठेवून पुन्हा पुणे गाठले. तेथे रितसर पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
पुण्यातीलच केसरी या वृत्तपत्रात उपसंपादकाची नोकरी मिळाली. नंतर मुंबई दूरदर्शन केंद्रात रुजू झालो. मात्र शिक्षणाचे आकर्षण कमी होत नव्हते म्हणून तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.
आधी दूरदर्शनची नोकरी होतीच. त्यानंतर 6 नोकऱ्यांसाठी निवड झाली असे सांगून महाराष्ट्र शासनाची जिल्ह्य माहिती अधिकाऱ्याची नोकरी आपण स्वीकारली आणि संचालक पदापर्यंत पोहचलो. म्हणजेच इच्छा असली तर मार्ग निघत राहतात. तसेच परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा मिळणारी संधी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आजच्या तरुणांनी करीत राहिल्यास यश पदरात यश निश्चितच पडते हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र यासाठी प्रयत्न, जिद्द आणि मेहनत आवश्यक असल्याचे देवेंद्र भुजबळ यांनी यावेळी मुलाखतीत सांगितले.
माध्यमे आणि सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करताना भुजबळ म्हणाले की, माध्यमे आणि सोशल मीडिया आज महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. मीडिया माझ्या आवडीचे क्षेत्र असल्यामुळे समाजसेवेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी योगदान देता आले तर ते देण्याची माझी मनोमन इच्छा आहे.
माणसाने स्वार्थ जरुर पाहिला पाहिजे. परंतु परमार्थही साधला पाहिजे आणि परमार्थ म्हणजे गोर गरिबांची, अडल्या नडलेल्यांची मदत करणे होय असे आपण मानतो म्हणूनच न्युज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल सुरू करण्याचे आपण ठरवले आणि ते सुरूही केले.
जवळपास एक वर्षाचा कालखंड या पोर्टलला पूर्ण होत असून एका वर्षातच या पोर्टलची लोकप्रियता वाढली आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर या व अन्य देशातून तसेच भारतातून लोक आपल्या पोर्टलला लिहित आहेत, त्यामुळे या वेब पोर्टलची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

– लेखन : शेषराव वानखेडे, जेष्ठ पत्रकार.
श्री देवेंद्र भुजबळ साहेबांची मुलाखत आजच्या तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी. परिस्थितीचा बाऊ न करता, मिळेल ते काम व त्याला कष्टाची जोड देऊन आयुष्यात गगनभरारी घेतली. दहावी नापास ते महाराष्ट्र शासनामध्ये उच्च पदापर्यंत सरकारी नोकरी असा अवर्णनीय जीवन प्रवास. हॅट्स ऑफ.भुजबळ साहेब.
🙏
अतिशय प्रेरणादायी मुलाखत आहे श्री. भुजबळ सरांची. आव्हानांना सामोरे जावून केलेली ध्येयप्राप्ती त्यांच्यातील निर्धार वृत्तीचे दर्शन आहे. यशाने बहुतेक वेळा माणसे जगापासून तुटत जातात परंतु श्री. भुजबळ सरांनी परमार्थाची जी व्याख्या सांगितली आहे त्यावरून त्यांची माणूस म्हणून असलेली थोरवी लक्षात येते.
सुंदर मुलाखत आणि सुंदर शब्दांकन, आपले मनापासून आभार 🙏🏻