मित्रहो, स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थानं आनंदोत्सव असतो. एक पाऊल पुढे टाकत आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. अर्थातच भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होताहेत, ही भारतीय जनमानसाला सुखद दिलासा देणारी गोष्ट आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. पारतंत्र्याचा काळोख नाहिसा होऊन, भारत मातेच्या उदरातून स्वराज्याचा उष:काल उदयास आला.
खरं तर, या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शेकडो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं. त्यांच्या गोड स्मृती आमच्या हृदयात चिरकाल तेवत राहतीलच, हे सूर्य किरणाएवढं शुभ्र सत्य आहे.
दरम्यान महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सर्वधर्मियांना सामावून घेऊन खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, करेंगे या मरेंगे, भारत छोडो आंदोलन आदी तत्सम आंदोलने करण्यात आली. त्यातून पुढे १५ ऑगस्ट हा सुवर्ण दिवस प्रकाशमय झाला. प्रत्येक भारतीय आज स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहे, ही त्या क्रांतिकारकांची पुण्याईच म्हणावी ! आज आपण सर्वजण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत, ते केवळ क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच. ही गोष्ट प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयात कोरून ठेवावी.
वास्तवात स्वातंत्र्य दिन साजरा करणं म्हणजे ज्या शुरवीरांनी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा जो अभिषेक केला, त्यांची आठवण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांचे गोडवे गाण्यासाठी तथा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यत:१५ ऑगस्ट हा दिवस सर्वधर्मीय भारतीय साजरा करतात.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी “हर घर तिरंगा” हा अद्वितीय उपक्रम राबविला आहे, त्याचे आपण सर्वजण स्वागत करू या. अन् आपापल्या घरांवर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत मोठ्या अभिमानाने तिरंगा लावू या.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे देशाप्रती राष्ट्रप्रेम, देशाभिमान तथा सर्वधर्मसमभाव, सार्वभौमत्व, एकात्मता व अखंडता, राष्ट्रीय तिरंगा झेंड्याचे पावित्र्य अन् महत्व हे भारतीयांच्या मनात अधिक दृढ करणे होय.
त्याआधी आपण स्वातंत्र्य संग्रामादरम्यान ज्या दोन वेगवेगळ्या विचारसरणीतून मोहिमा राबविल्या गेल्या, त्यावर लक्षवेध टाकूया.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा गांधी, मादाम कामा, मोतीलाल नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद, विजयालक्ष्मी पंडित, जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, सरोजनी नायडू, साने गुरुजी, वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, अरूणा आसफअली, यशवंतराव चव्हाण,बाबू गेनू , ठाण्याचे दत्ताजी ताम्हणे, नंदुरबारचे बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता, पश्चिम खान्देशचे दादासाहेब रावल, दादुसिंग राजपूत, धनाजी नाना चौधरी, त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई चौधरी आदी असंख्य स्वातंत्र्यसेनानींनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन ब्रिटिशांना “भारत छोडो” हा निर्वाणीचा इशारा दिला अन् अखेर तो फलद्रूप झाला.
तर दुसऱ्या बाजूने गोळीला गोळीने उत्तर देणाऱ्या जहालमतवादी क्रांतीवीर लोकमान्य टिळक, क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बटूकेश्वर दत्त, लाला लजपतराय, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिवीर नाना पाटील, सेनापती बापट, बिरसा मुंडा, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, ठाणे येथील कोळी समाजाचे मारुतीराव ठाणेकर, उमाजी नाईक, अनंत कान्हेरे आदी जहाल क्रांतीकारकांनी फिरंग्यांना जेरीस आणले. सरतेशेवटी इंग्रजांना भारत सोडून जाणे भाग पडले. या लढ्यात काहींना वीरमरण आले, तर काहींनी स्वातंत्र्यासाठी मोलाचं योगदान दिले. अशाप्रकारे सामूहिक प्रयत्नांतून भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. अशा महान क्रांतिकारकांना आम्हा मराठी भूमिपुत्रांकडून त्रिवार मानाचा मुजरा !
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी इंग्रज सरकारला भरकोर्टात, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अन् ते मी मिळविणच” हा सज्जड इशारा दिला. देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.विशेष म्हणजे टिळकांनी आगरकरांच्या मदतीने “केसरी व मराठा” ही दोन वृत्तपत्रे सुरू करून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्वधर्मीय भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करून स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. महत्वाचे म्हणजे रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करून तेथे स्वातंत्र्याची शपथ घेतली.
त्याप्रमाणेच सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यास अधिक चालना देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करून “तुम मुझे खून दो, मै तुम्ही आजादी दुंगा” हे आवाहन केले. याशिवाय “जय हिंद” चा नारा देऊन भारतीयांमध्ये देशप्रेमाची भावना प्रज्वलित केली. अशा महान देशभक्तांना आम्ही दंडवत प्रणाम करतो.
क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम् असे गगनभेदी नारे देत भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हसत हसत फासावर चढून आपल्या प्राणांची आहुती दिली. या युवा क्रांतिकारकांना आम्ही वंदन करतो.
क्रांतिवीर नाना पाटील यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत सक्रिय भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलं. सातारा जिल्ह्यात त्यांनी पत्रीसरकार म्हणजेच प्रतीसरकार स्थापित करून ब्रिटिश राजवटीला खुलं आव्हान केलं. हळू हळू ही
प्रतीसरकारची संकल्पना इतकी प्रभावी ठरली की, ती रोल मॉडेल ठरून त्याअनुषगाने साऱ्या देशात प्रयोग सुरू झाले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही युवकांची सेना तयार करून फिरंग्यांना जशास तसे उत्तर दिलं. दरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांनाही अंदमानच्या कालकोठडीत डांबण्यात आले. ठाणे, येरवडा अशा अनेक कारावासांत सावरकरांनी शिक्षा भोगली. जयो स्तुते श्रीमहामंगले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुंता वंदे ! हे स्वतंत्रतेचे स्तोत्र आजही भारतीयांना प्रेरणादायी ठरत आहे.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देखील गांधीजींच्या चलेजाव चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. यास्तव त्यांना येरवडा तुरुंगात कारावास भोगावा लागला. या महाराष्ट्राच्या थोर क्रांतीवीरांना आमचा त्रिवार मानाचा मुजरा !
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य संग्रामात शालेय मुलांनीदेखील सहभाग घेऊन देशाप्रती आपलं कर्तव्य बजावलं. त्याचेच उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता आणि त्यांच्या चार वर्गमित्रांनी गावात प्रभातफेरी काढून इंग्रज सरकारविरुद्ध बुलंद आवाज उठविला. वंदे मातरम्, इंकलाब जिंदाबाद अशा घोषणा देत या बाल क्रांतिकारकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रज पोलिसांच्या गोळ्या झेलल्या. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन या बाल क्रांतिकारकांनी साऱ्या जगात हिंदुस्थानचे नाव अजरामर केलं. त्यांच्या महान बलिदानाला आम्ही मराठी भूमिपुत्र नतमस्तक होतो.
असंख्य क्रांतिवीरांनी हुतात्म्य पत्करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याची परिणती म्हणजे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. आता स्वराज्य मिळालं, त्याचं सुराज्य करण्यासाठी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कंबर कसली आहे. देशातील सर्वधर्मीय गोरगरीब, निर्धन, निराधार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे आवास, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस योजना राबविल्या जात आहेत.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन, त्यांना कर्ज माफ करणं अन् कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळत आहे. मोदीजींच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, आदर्श सांसद ग्राम योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, जनधन योजना, स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजना, इज ऑफ डूइंग बिझनेस अशा विविध लोकोपयोगी योजना सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून मोदीजींनी आतापर्यंत राबविल्या आहेत.
भारताची अंतराळातील शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने चांद्रयान-२ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आपण यशस्वी करून दाखविली. त्यामुळे अशी व्यापक क्षमता असलेला भारत हा जगातील चौथ्या देश गणला गेला आहे.
शेकडो वर्षांपासून मुस्लिम महिला ह्या तिहेरी तलाक या जाचक कुप्रथेमुळे दुर्लक्षित-उपेक्षित जीवन जगत होत्या.त्यांच्या संरक्षणार्थ तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू केला. जम्मू-काश्मीरसंबंधीचे राज्यघटनेतील ३७० कलम रद्दबातल करून त्याचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याने, आता तेथे भारतातील कुठलीही व्यक्ती वा कंपनी उद्योगधंदा करू शकते. भारत सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा औद्योगिक विकासाला चालना मिळत असून,तेथील बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळू लागलं आहे. त्याची परिणती म्हणजे या राज्याच्या आर्थिक, औद्योगिक व पर्यटन विकासाला गती प्राप्त होऊन राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. याशिवाय ३५ अ कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून नावरूपाला आले आहेत.
मोदीजींच्या प्रभावशाली व पारदर्शक राज्यकारभारामुळे जगातील महासत्तादेखील भारताशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यात उत्सुक होताहेत. त्याची परिणती म्हणजे परकीय गुंतवणुकीत वेगाने वृद्धी होत आहे. अणू चाचण्या, शस्त्र निर्मिती, राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती वाढविणे, रेल्वे सोयी सुविधांचे बळकटीकरण, स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला प्राधान्य, डिजिटल कनेक्टिव्हिटी अन् डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. अर्थातच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग,
दळणवळण, कृषी विकास यावर लक्ष केंद्रित करून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ब्रीदनुसार देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आणत, मोदीजींनी भारताला विकसित देशांच्या पंगतीत आणून बसविलं, ही देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. न भूतो न भविष्यती असा सर्वांगिण विकास करून मोदीजींनी देशाचा कायापालट करून दाखविला. त्यामुळेच त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रप्रमुख म्हणून नावलौकिक मिळाला, ही भारतीयांसाठी गौरवास्पद आहे.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो ! वंदे मातरम्!भारत माता की जय !जय 🇮🇳 हिंद ! जय🚩महाराष्ट्र !

– लेखन : रणवीर राजपूत.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
