आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लोकमान्य सेवा संघ, पारले, मुंबई या सामाजिक संस्थेच्या कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राने “हितगुज” परिसंवाद आयोजित केला होता.
या परिसंवादावर आधारित आजचा तिसरा भाग….
– संपादक
प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ् डॉ. दिनेश नारुरकर यांनीही उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रथम त्यांचा परिचय करून घेऊ या.
डॉ. दिनेश नारुरकर यांनी शासकीय आरोग्य सेवेत २७ वर्षे प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली . तीन दशके ते खाजगी प्रॅक्टिस करीत आहेत.
Community Mental Health मध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. ते सध्या अंधेरी येथील जीवन विकास केंद्रात कार्यरत आहेत.
आपल्या संवादात मानसोपचार तज्ञ् डॉ. दिनेश नारुरकर आत्महत्या आणि गैरसमज याविषयी बोलताना म्हणाले, मानसशास्त्र, मानसोपचार, आणि मानसोपचार तज्ञांबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत. मनोविकार असलेल्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचार न करता अघोरी उपाय करण्यात येतात. तसेच जर कोणी काही कारणांनी आत्महत्येची धमकी दिली तर ही व्यक्ती भ्याड आहे, ही काय आत्महत्या करील ? गरजेल तो पडेल काय ? असे वाटून त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले जाते. खरं म्हणजे, एखादी व्यक्ती कळत नकळत ती आत्महत्या करणार असल्याचा संकेत किंवा इशारा देत असते. आपण तो गांभीर्याने घ्यायला हवा. याबाबत त्यांनी दोन घटनाही सांगितल्या.
आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त केल्याच्या घटनेचा एक प्रसंग सांगतांना डॉ. दिनेश नारुरकर म्हणाले, परीक्षेतील अपयशामुळे मेडिकल च्या विद्यार्थ्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक दिसते. जवळ जवळ ३५ वर्षांपूर्वीची घटना. तेंव्हा मोबाइल फोनची सुविधा नव्हती. एका नैराश्यग्रस्त विद्यार्थ्याचा डीन सरांना फोन आला. तो म्हणाला “सर, तुम्ही माझ्यासाठी खूप केलंत, त्याबद्दल खरंच धन्यवाद, मी आता जातो” असं म्हणून त्यानी फोन ठेवला. डीन सरांनी मला व आमच्या विभाग प्रमुखाना तातडीने बोलावले. ते चिंताग्रस्त दिसत होते. त्यांनी आलेल्या फोन बद्दल सांगितले. तेंव्हा त्यांनी टेलिफोन ऑपरेटर कडून डीन सरांना कोणत्या नंबर वरून फोन आला होता ते विचारले, ऑपरेटरनी जो नंबर सांगितला तो कॉलेजच्या हॉस्टेलचा फोन नंबर होता. होस्टेलच्या गेटवर सिक्युरिटी कडून कोणी फोन केला ते समजले. तो अपयशामुळे निराश विद्यार्थी हाजी अली च्या समुद्राच्या दिशेने गेला होता. या सर्वानी त्याच्या मागे जाऊन त्याला पकडले, समजावले, आणि त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नांना प्रतिबंध केला. हे शक्य झाले कारण लक्षणं ओळखून तातडीने आणि वेगाने कृती केली.
पुढे डॉ. नारुरकर म्हणाले, वर्तमानपत्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्या संबंधी बातम्या आता इतक्या रुटीन झाल्या आहेत की वाचून आपण पान उलटतो. आपला देश सुपीकतेत जगात दुसऱ्या नंबरवर असूनही एकूण आत्महत्यांच्या ११% आत्महत्या शेतकऱ्याच्या असतात. याला नैसर्गिक कारणं तर आहेतच परंतु मानवनिर्मित कारणांवर मात करणं आणि या आत्महत्यांना प्रतिबंध करणं आपल्या हातात असते. शेतकरी शेतीसाठी – खतं -बियाणं -अवजारं यांच्या खरेदीसाठी कर्ज काढतो, बँकांमधून कर्ज मिळण्याची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आणि वेळकाढू असते की मजबूर होऊन तो ४० टक्के व्याजावर सावकाराकडून कर्ज घेतो. कर्जाची रक्कम शेतीसाठी नाही तर इतर कारणांसाठी वापरली जाते. शेवटी शेतीचं नुकसान होऊन सावकाराकडून कर्ज वसुलीसाठी घरावर, शेतावर जप्ती येते. शेजारी बेघर व कंगाल होतो. आणि नैराश्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. शेतकऱ्याच्या आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारची तर जबाबदारी आहेच, परंतु समाजात ज्या चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत, अंधश्रद्धा आहेत, दुष्ट प्रथा परंपरा आहेत त्यांचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून समाजाच्या अन्नदात्याच्या आत्महत्या होणार नाहीत.
क्रमशः

– लेखन : आशा कुलकर्णी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800