पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात
उद्या 11 व परवा 12 जून रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहाव्या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनास साहित्य, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती लाभणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटक विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मधुरा वेलणकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रिय अध्यक्षा नमिता कीर सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे भूषविणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ जून रोजी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली “आजची आत्मनिर्भर स्त्री” हे चर्चासत्र आहे. त्यानंतर “स्त्री साहित्याच्या बदलत्या दिशा, बदलते भान” हा परिसंवाद प्रा. मीना गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. याच दिवशी कोमसाप मधील कवयित्रींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कवयित्री कट्ट्याचे उद्घाटन आमदार मनीषा चौधरी व डॉ. मनीषा कायंदे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ कवयित्री हेमांगी नेरकर या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. निमंत्रित कवयित्रींचे “उमलते शब्द” हे काव्यसंमेल डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आले आहे. याखेरीज पालघर जिल्ह्यातील स्थानिक लेखिकांचे पुस्तक प्रकाशन व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ जून रोजी संमेलन समारोप शुभारंभ महिला बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकुर यांच्या हस्ते आहे. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व सुसंवादक मंगला खाडीलकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर “कवितेची लय… कवितेचा ताल” या महिलांनी लिहिलेल्या प्रसिद्ध कवितांवर आधारित पदन्यास सादर केला जाणार आहे.
या संमेलनाचे आकर्षण असणारा “महिलांचे राजकीय आरक्षण कथा व व्यथा” हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून या परिसंवादाचे अध्यक्षस्थान मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर भूषविणार आहेत. या परिसंवादात आमदार प्रणिती शिंदे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, वसई-विरार महानगरपालिकेच्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर व पालघरच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले सहभागी होणार आहेत.
या संमेलनात विस्मृतीत जाणाऱ्या लोककलांना उजाळा देणारा “लोकरंग” कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री, लेखिका डॉ. निशिगंधा वाड तसेच ज्येष्ठ लेखिका, कवयित्री नीरजा सहभागी होणार आहेत.
महिला साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी रात्री पालघर जिल्ह्यातील महिलांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. साहित्य संमेलनात कला दालन, ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाणार असून या प्रसंगी स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.
प्रवेशद्वार, सभागृह, व्यासपीठ व दालनांना मान्यवरांची नावे महिला साहित्य संमेलन मुख्य प्रवेशद्वाराचे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या संचालिका स्वर्गीय माणकताई पाटील प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले असून साहित्य नगरीला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके साहित्य नगरी असे संबोधित केले जाणार आहे. संमेलनातील सभागृहाला शिक्षणतज्ञ अनुताई वाघ सभागृह असे नामकरण करण्यात आले असून व्यासपीठाला समाजसेविका मालती राऊत व्यासपीठ असे संबोधले जाणार आहे. संमेलनातील ग्रंथ दालनाला लेखिका हायकूकार शिरीष पै ग्रंथदालन, कला दालनाला भारतरत्न लता मंगेशकर कला दालन तर कवयित्री कट्ट्याला स्वर्गीय सुनंदा देशमुख कवयित्री कट्टा असे नामकरण करण्यात आले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
साहित्य संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा.