Homeलेख"श्री गुरुभ्यो नमः"

“श्री गुरुभ्यो नमः”

आज गुरुपौर्णिमा. आजचा दिवस म्हणजे आपल्या जीवनास जीपीएस गायडन्स पॉझिटिव्हिटी आणि सपोर्ट देणाऱ्या गुरूंना नमस्कार करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

जसे गाडी चालवताना योग्य मार्ग दाखवण्याचे काम किंवा रस्ता चुकला तरी मूळ पथावर आणण्याचे काम गुगल मॅप करते त्याप्रमाणेच मानवी जीवनाचे ध्येय मोक्ष आणि मोक्षाप्रत जाण्याची दिशा दाखवण्याचे काम सद्गुरू करतात.

ज्याप्रमाणे गुगल मॅप वर विश्वास ठेवून आपण अनोळख्या प्रदेशात देखील गाडी चालवतो, त्याप्रमाणे श्रद्धेने सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चाललो तर ते आपल्याला योग्य स्थळी निश्चितच नेतील. फक्त ‘श्रद्धावान लभते ज्ञानं’ हे लक्षात ठेवायला हवे.

ध्येयप्राप्तीसाठी श्री गुरूंनी आपल्यासारख्या प्रापंचिकांना दाखवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण! ते सुद्धा प्रपंच सांभाळून.

आपल्याला या संतांनी इतके छान ओळखले आहे ना,की ते वेळोवेळी आपल्याला प्रेमाने तर कधी कानपिचक्या देऊन नामाचे महत्व सांगत राहतात.

कबीर म्हणतात…
‘माला तो करमे फिरेl
जीभ फिरे मुख माही।
मनुवा तो चहु दिश फिरे।
यह तो सुमिरन नाही।’

थोडक्यात याचा अर्थ की, हातात जपमाळ आहे, तोंडामध्ये नाव आहे परंतु मन मात्र चारी दिशांना फिरत आहे याला आपण सुमिरन म्हणजेच नामस्मरण म्हणू शकतो का ?

खरंच आज आपण मंदिरात असू किंवा प्रवचनाला असो, मन कुठे कुठे भरकट असते! कधी गॅस बंद केला का? व्हाट्सअप वर कालच्या मेसेजवर काय रिएक्शन आली ? एफबीवर, इन्स्टावर किती व्ह्यूज आले? एक ना अनेक किती विचार.कबीर इथे हाच विरोधाभास दाखवून देतात.

तुकाराम महाराज देखील हेच सांगतात,
‘मुखी नाम हाती माळा,
अंतरी विषयांचा गोळा ।
तुका म्हणे जैसा भाव,
तैसा देव देतो ठाव।

तर रामदास स्वामी म्हणतात,
‘जपमाळ करी घेतली।
मनी वासना वसली।
तया जपाचे फळ काही। रामदास म्हणे पाही।’

जीभ नुसती तोंडात फिरत राहते, मन काही नामात रमत नाही आणि त्यामुळे अपेक्षित तप घडत नाही किंवा फळही मिळत नाही.

जर नाम घ्यायची आपली इच्छाच नसेल किंवा त्यात लक्षच लागत नसेल तर गुरु तरी काय करणार ?

विज्ञानानुसार जेव्हा आपण एखादा संकल्प करतो, निश्चय करतो तेव्हा मेंदूमध्ये काही प्रक्रिया घडतात.

रायबो न्यूक्लिक ऍसिड हे शरीरातील व पेशींमधील महत्त्वाचे द्रव आहे. मनापासून घेतलेल्या संकल्पाची माहिती मेंदूतील पेशी आरएनएच्या साहाय्याने साठवून ठेवतात. आपण जितका जास्त सराव करू, तितका तो ‘संकल्पाचा आरएनए’ मजबूत होतो.

जेव्हा आपण संकल्पावरून लक्ष हटावतो आणि इतर संसारी किंवा प्रापंचिक गोष्टींकडे वळतो, तेव्हा मेंदू नवीन विचार स्वीकारतो. या नवीन विचारांना किंवा विकल्पांना धरून मेंदूमध्ये नवीन आरएनए तयार होऊ लागतो.जर आपण संकल्पाचा विसर पडू दिला, तर नवीन विकल्पांचा आरएनए वेगाने वाढू लागतो.

वरील नवीन विकल्पाचा आरएनए जुन्या संकल्पाच्या आरएनएपेक्षा पॉवरफुल होतो.यामुळे मेंदूमध्ये जुन्या संकल्पाबद्दल एक आंतरिक खंत किंवा रुखरुख निर्माण होते. आपण आपल्याच मनाशी संघर्ष टाळण्यासाठी मग नवनवीन कारणे किंवा बहाणे शोधू लागतो आणि संकल्पाकडे दुर्लक्ष करतो.

अर्थात विज्ञान सर्वच गोष्टींची उत्तरे देऊ शकत नाही कारण संकल्प विकल्प आणि आर एन ए कोडींग कसे काम करते हे शोधून काढले तरीही ही सर्व यंत्रणा नियंत्रित कोण करते हे गूढ़च राहिले आहे.

प्रत्यक्ष अर्जुनाने ही गीतेमध्ये श्रीकृष्णाला विचारले आहे,
‘चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम।
तस्याहम निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करं ।। ‘

हे कृष्ण मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा ही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.

या प्रश्नावरचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुढील गीतेच्या श्लोकात दिले आहे,
“असंशयंम महाबाहो मनो दुर्निग्रहंम चलम।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।। “

श्रीकृष्ण म्हणतात, चंचल मनाला संयमीत करणे नि:संशय कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीने वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे.

सध्याच्या काळात जपतप कर्मकांड करणे खूपच कठीण आहे परंतु संतांनी सांगितलेल्या नवविधा भक्ती च्या आधाराने प्रपंच आणि परमार्थ यातील संतुलन साधत मनास स्थिर ठेवणे येऊ शकते.

तुकाराम महाराज म्हणतात….
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी। ‘

धन कमवा, व्यवसाय करा पण त्याबरोबरच मनाचे समाधान, शांती देखील सांभाळून ठेवा. कुठे आणि कधी थांबायचे हे कळण्याचा विवेक असला पाहिजे.

समर्थ रामदास स्वामींनी पण सांगितले आहे…
‘आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावा परमार्थ विवेका ।

एकदा एका गृहस्थांनी सद्गुरूंना विचारले मला परमार्थ करायचा आहे मी प्रपंच सोडू का ?
संत म्हणाले प्रपंच सोडू नका पण तो करताना चिंता सोडा. असे चिंता मुक्त होऊन राहण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात….
‘नाम संकीर्तन साधन पै सोपे l
जळतील पापे जन्मांतरीची’l

संतांनी सांगितलेला अध्यात्माचा मार्ग पळून जाण्याचा मार्ग नाही, तर संतुलनाचा मार्ग आहे.आज आपण सर्व मोबाईल वापरतो, इतर गॅजेट्स वापरतो. सर्वांना दर काही तासांनी चार्जिंग करावे लागते आणि ज्याबाबत आपण सतत जागृत असतो. तसेच आपल्या मनाच्या चार्जिंग बाबत जागृत असतो का ? मोबाईल साठी चार्जर, शरीरासाठी अन्न तसेच मनाला स्थिर ठेवून नित्य नामस्मरण घडण्यासाठी सत्संग, वाचन, चिंतन हे चार्जर आहेत जे मनाला जागृत ठेवतात.

थोडक्यात नामस्मरण करा असे हे सर्व संत पुरुष कळकळीने सांगत असूनही आपल्याकडून ते घडत नाही. याचे कारण कदाचित मोबाईल चार्जिंग नाही झाला तर काही तासात बंद पडतो. शरीराचे चार्जिंग अन्नाद्वारे काही दिवस किंवा महिने नाही झाले, तर ते बंद पडेल.परंतु मनाचे चार्जिंग केले अथवा न केल्याने वरकरणी दिसणारा असा फारसा मोठा फरक आपल्याला पडत नाही आणि त्यामुळेच संकल्प विकल्पाच्या चौकटीत मन गुंतून राहते.

खरे तर ८४ योनीतून कुठकुठली सत्कर्म दुष्कर्म करत आपण या मानव जन्मापर्यंत पोहोचलो आहोत हे आपल्याला माहीत नाही. मग या जन्मात केलेल्या कर्मांचे भेंडोळे किती दिवसात सुटेल हे ही आपल्याला माहित नाही. त्याकरता कदाचित अजून काही जन्म घ्यावे लागतील का याची देखील माहिती नाही.

अशा वेळेस आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे या देहाचे सार्थक करण्यासाठी मला नामस्मरण करायचे आहे असा संकल्प केला तर पुढील जन्मामध्ये काही साध्य होईलआणि नामदेव महाराज म्हणतात तसे
‘जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले।
तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली’
असे आपल्याही बाबतीत होईल.

शुभम भवतु !
संदर्भ
— नाम साधन पै सोपे – सद्गुरु वासुदेव वामन बापट गुरूजी
— आंतरजाल

— लेखन : ऋचा उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments