कोकणात मृगऋतू सुरू होण्याआधी वर्षभर पुरेल, अश्या खाद्यपदार्थांचा व उपयोगी वस्तूंचा साठा करून ठेवला जातो.
येसूकाकीची तीच तयारी चालू असताना, अचानक पाऊस कोसळला, तेव्हा तिच्या ह्या चिंता !
१. वरसाची बेगमी
एकटक बगित आकाशात,
बसली खळ्यातल्या मेरेर,
अवचित कोसळून पावसान,
घोळ घातल्यान कामात ॥
मासोकाटो मिटात घालून,
रताम्बो ओतल्यान खळ्यात,
श्यान थापल्यान भितीर,
लाकडा ऱ्हवली पडान ॥
नळे ऱ्हवले परतूचे,
गोटो तसोच शाकारुचो,
गळती लागून पावसाची,
हाल होतील गुराढोराचे ॥
उना दडली ढगात,
कामा ऱ्हवली थाम्बान,
वरीसभर खावची बेगमी,
व्हयत कशी कोकणात ॥
सगळाच चित्र पालाटला,
निसर्गाचो काय दोष ?
ईकास करुच्या नादात,
ऋतू चक्र ईसकाटला ॥

– रचना – सौ. वर्षा भाबल.
२. पाऊस
पाऊस जेंव्हा पडत नाही
चांगलं काही घडत नाही
आभाळातील म्हातारी
दळण काही दळत नाही
आभाळाच्या दारातली
ट्यूब काही पेटत नाही
खोट्या नोटा खूप झाल्या
खोटं नाणं मिळत नाही
पोरे किती नाचली तरी
पाऊस काही येत नाही
येईल म्हणे येईल पाऊस
धीर काही धरवत नाही
सारखा पुढचा वायदा
आशा काही सुटत नाही
किसानाचे डोळे कोरडे
त्याच्याकडे बघवत नाही

– रचना : सुनील देशपांडे. नाशिक
३. पावसाची हजेरी
ओल्या मातीचं झालं अत्तर
मृद्गंधाने दरवळलं अवघं मुंबई शहर
मान्सूनचा मुहूर्त पुढे गेला तरी
भरून काढली पहिल्या पावसाने कसर
दुपारपासून केला होता
उकाड्याने कहर
पावसाच्या दमदार सरींनी
आला आनंदाला बहर
उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना
लागली पावसाची मस्त लाॅटरी
सहर्ष स्वागत केलं चाकरमान्यांनी
जरी जवळ नव्हती छत्री
संध्याकाळच्या सुमारासच दिली होती
कृष्णमेघांनी अकस्मात पावसाची वर्दी
भरून आलेलं काळं आभाळ
डोळ्यात साठवत होते सारे रसिक दर्दी
घरी परतायच्या लगबगीत होती
सारी मुंबई नगरी
जोरदार बॅटिंग करत लावली
पावसाने मस्त हजेरी
अचानक झालेल्या बरसातीने
भलतीच तारांबळ उडाली
पण आलेल्या गारव्याने
मने मात्र प्रसन्न झाली
क्षणार्धात नाहिशी झाली
भाजून काढणारी काहिली
धरतीमाताही समाधान पावली
दोन तासांची मैफिल स्मरणात राहिली

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Thanks ! Pandey Sir.
You have natural talent. Keep on writing.
सगळया कविता सुंदर आहेत .👌👌👌