नागपूरला विदर्भ साहित्य संघात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रम सादर झाला त्याचवेळी मित्र प्रकाश एदलाबादकर, आणि अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर यांच्या आग्रहाखातर मी ‘विदर्भ साहित्य संघाचा’ आजन्म सभासद झालो होतो. त्या वि.सा. संघाचे वार्षिक साहित्य संमेलन वरोरा येथील ‘आनंद-वनात’ जाहीर झाले. थोर समाजसेवक श्री. बाबा आमटे यांच्या आनंद-वनात होणाऱ्या या साहित्य संमेलनाला आम्ही चंद्रपूरातील सर्व मित्रांनी जायचे ठरवले. त्यावेळी प्राचार्य सुरेश केळकर मला म्हणाले, “विसुभाऊ, मला ऐकवलेली
प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांची ‘धरती’ ही एकच कविता तू मा. बाबांना ऐकवलीस तरी बाबा तुझ्या वर खूष होतील.”
अगदी तस्सेच झाले, साहित्य संमेलनासाठी आम्ही आनंद-वनात गेल्यावर केळकर सरांनी माझा बाबां बरोबर परिचय करून दिला. मी त्यांना ‘धरती’ ऐकवली आणि बाबा माझ्या सादरीकरणावर बेहद्द खूष झाले. माझ्या विनंतीनुसार त्यांनी त्यांची ‘सीतेची पाऊले’ ही कविता माझ्या वहीत, त्यांच्या अक्षरात लिहून दिली. नंतरचे दोन दिवस आम्ही सर्वांनी ते साहित्य संमेलन मनसोक्त अनुभवले.
संमेलनातील कथाकथन सत्र श्री.बाजीराव पाटील (अकोला) व प्रा.मधुकर केचे (अमरावती) या कथाकारांनी (कवी असलेल्या) तूफान गाजवले.
“या विसुभाऊ, अरे ‘कवींचा भाट’ आला रे.!” असे म्हणणाऱ्या प्रा. विठ्ठल वाघ यांच्या पासून प्राचार्य सुरेश केळकरांपर्यंत विदर्भातील अनेक कवींनी कवी संमेलनात आपआपली कविता सादर करून कवी संमेलन तर रंगवलेच शिवाय त्यांच्या कविता मला लिहूनही दिल्या.
बाजीराव पाटीलांनी तर कहरच केला. मंचावर उभे राहताच ते म्हणाले, “जगातील विविध भाषांतील काव्य प्रकार आपल्या मातृभाषेत (मराठी पण जपत) लिहून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. ते ते काव्यप्रकार मराठीत रुजवले. पण आपल्या मराठीतला पोवाडा इतरांनी आपल्या भाषेत लिहून दाखवावा. शिवाजी महाराजांचा पोवाडा जर इंग्रजीत लिहिला तर वीर रसा ऐवजी विनोद रसाची निर्मिती होईल.” असे बोलून त्यांनी स्वरचित इंग्रजी पोवाडा सादर केला.
“And Then ‘SHIVAJI’ Went..
Agra Sent, Hundred Percent…
Momedian Became Upset… Ha
G G G G G”
साहित्य संमेलन संपल्यानंतर मा. बाबा आमटे आणि साधनाताईंना नमस्कार करून त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांचा निरोप घेऊन निघताना बाबा मला म्हणाले, “विसुभाऊ, फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या शनिवार-रविवारी आनंद वनात ‘मित्र -मेळावा’ होत असतो. यावर्षीच्या मेळाव्याला तुम्ही जरूर या.” या वर्षीच्या आपल्या मित्र मेळाव्याला न येता आम्ही सगळ्यांनी ‘लोक बिरादरी प्रकल्पाच्या आदिवासी मेळाव्याला’ येण्याचे ठरविले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या शनिवार रविवारी आम्ही सारे हेमलकसा येथे येणार आहोत, असे सांगून आम्ही बाबांचा निरोप घेतला आणि चंद्रपूरला परतलो.
एक दिवस मी मित्र सुरेश देशपांडे बरोबर दै.लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी, मित्र मोहन धनकर याच्या घरी गेलो. मोहनचे मोठे बंधू मदनराव सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करीत होते. त्यांच्या महाविद्यालयात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ मी माझा कार्यक्रम सादर केला. नंतर एक कार्यक्रम प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या जनता कॉलेजमध्ये आणि एक कार्यक्रम प्रा.राम तेलंग यांनी जनता बीएड कॉलेजमध्ये आयोजित केला.
कार्यक्रमानंतर कविता, सादरीकरण या विषयांवर तेलंग सरांबरोबर खूप गप्पा झाल्या. त्यावेळी मला सरांनी वामन पंडितांनी लिहिलेला ‘कूट-काव्य’ हा प्रकार ऐकवला आणि त्याचा अर्थ विचारला. तो अर्थ मी पुढील भागात सांगतोच पण तत्पूर्वी एक कूट कविता आज देतो आहे. तोपर्यंत रसिक वाचकांनी या कवितेचा अर्थ शोधून आम्हाला कळवला तर विशेष आनंद होईल.
“अलिकुल वहनाचे वहन आणीत होती,
शशिधर वहनाने लोटिली मार्गपंथी |
नदीपति रिपु ज्याचा, यात भंगून गेला,
रविसुत महिसंगे फार दुःखीत झाला.||’
क्रमशः

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800