ज्या हृदयी आहे संवेदना,
तेथेच व्यक्त कराव्या आपल्या वेदना !
प्रत्येक मनुष्याच्या नशिबात सुखासोबत दुःख येतच असते. या जगात कोणालाही कोणतेही दुःख नाही असा मनुष्य सापडणे कठीणच. दुःखाचे प्रमाण कमीजास्त असू शकेल परंतु दुःख नाही असा मनुष्य सापडणार नाही.
मनुष्याच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी घडत असतात. सुखाच्या वेळी मनुष्याला अपरिमित आनंद होतो. तर दुःखाच्या वेळेला माणसाची मानसिक परिस्थिती डगमगायला लागते.आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ जेव्हा आपण दुःख व्यक्त करतो त्यावेळेला मनावरील ओझे कमी झाल्यासारखे वाटते. समोरची व्यक्ती जर आपली खरी हितचिंतक असेल तर त्या दुःखद प्रसंगात ती आपल्याला धीर देते, “की तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे !” त्यावेळेस आपले मन हलके होण्यास मदत होते. संतांचे एक मधुर वचन प्रसिद्ध आहे :-
सुखिया आगे दुःख कहे हस हस गाली देत !
दुखिया आगे दुःख कहे आधा वह लेत !!
या हिंदी दोह्याचा अर्थ असा आहे की, आपण समाजामधील सुखवस्तू किंवा धनिक माणसाजवळ आपले दुःख उघडत बसायचे नाही. आपल्या जीवनामध्ये आलेले दुःख हे अतिशय जिव्हाळ्याच्या आणि आपुलकीच्या माणसासोबतच व्यक्त केले पाहिजे. कोणासमोरही आपले दुःख व्यक्त केले तर ते कमी होण्यापेक्षा वाढतच जाण्याची शक्यता अधिक ! आपल्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी ही व्यक्ती कदाचित मीठ चोळायचे काम करेल !!
तेच आपले दुःख जर समदुःखी माणसाजवळ आपण व्यक्त केले तर ती व्यक्ती आपल्याला धीर देण्याचे काम करते.त्यामुळे आपले सुख आणि दुःख सांभाळून व्यक्त करावे. सुख कैसे दुःख नाही कायम! आळीपाळीने येतील जातील ठेवा मनाशी संयम !!
किती जरी कठीण प्रसंग असला तरी आपले दुःख योग्य व्यक्ती जवळच व्यक्त करणे चांगले आहे. आहे आपले हितचिंतक सगळे, असे काही मानू नका ! दुःख आपले सगळ्यांजवळ कधीच सांगू नका !!
तुम्ही जर अनुभव घेतला तर असे लक्षात येईल की, आपण आपले एक दुःख कोणाला सांगायला लागलो तर काही लोक त्यांची हजार दुःखे आपल्याजवळ व्यक्त करतात. घेईल जो आपल्या हृदयाचा ठाव ! तेथेच व्यक्त करा दुःख भाव !!
दुःखाचा ज्या वेळेला जीवनामध्ये कहर होतो त्या वेळेला मानसिक स्थिती बिघडू लागते. मानसिक स्थिती बिघडल्यामुळे आणि अतीव दुःखामुळे समाजात आत्महत्या सारख्या मार्गाचा दुःखी लोक अवलंब करतात. काळ हा सर्व दुःखावर इलाज आहे. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा काळावर विश्वास ठेवा. माणसाचा सगळा आटापिटा सुखासाठी आहे. मात्र सुखासाठी धावताधावता मनुष्य दुःखाच्या खाईत केव्हा पडतो हेच कळत नाही. अशा दुःखी माणसाच्या जीवनामध्ये प्रियजनांच्या विरहाचे दुःख आहे, आर्थिक अडचणीचे, बेकारीचे, व्यवसायात नुकसानीचे दुःख आहे. या दुःखाला अंत नाही. ते जर मनात साचून राहिले तर हृदय मंदिरात अंतर्गत कलह निर्माण होतो.
कोणाजवळ आपले दुःख व्यक्त झाले नाही आणि साचून राहिले तर मानसिक अस्वस्थता निर्माण होते. अशा वेळेला आपले दुःख कुठेतरी व्यक्त झालेच पाहिजे. मात्र ते व्यक्त करताना अश्या व्यक्तीजवळ सांगावे की जो आपल्या दुःखाचे ओझे केवळ त्याच्या बोलण्याने कमी करू शकेल. सुख दुःख का संगम..!!
यही है जीवन…!!

– लेखन : प्राची वैद्य
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर लेख 👌👌👌
🌹दुःख व्यक्त करा 🌹
अप्रतिम लेख.
जीवनाचा पूर्ण अर्थ सांगून जातो. खूप छान प्रकारे आपण हा मुद्दा मांडला आहे
दुःख सर्वाना आहे पण ते दुसऱ्याला दिसत नाही.
🌹धन्यवाद प्राची वैद्य मॅडम 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ, ठाणे