Wednesday, June 18, 2025
Homeसंस्कृतीअमोलची वटपौर्णिमा...

अमोलची वटपौर्णिमा…

वटपौर्णिमा म्हटले की, हाच पती सात जन्म मिळू दे, अशी देवाला प्रार्थना करणाऱ्या आणि वडाला फेऱ्या घालणाऱ्या महिला आपल्या डोळ्यांसमोर येतात.
पण पुणे येथील अमोल अनोखी वट पौर्णिमा साजरी करून छान पायंडा पाडत आहे.
अमोलचे मन:पूर्वक अभिनंदन.
– संपादक

आधुनिक म्हणजे नेमके काय ?
जुन्या चालीरीतिंना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध दर्शविणे ! काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे आधुनिकता का?

खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका, कारणं आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी वातावरणाशी, जीवनपद्धतीशी त्याची सांगड घालून प्रथेचं उचीत नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण हा अर्थ मला अधिक पटतो. आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला.
पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे, पत्नीने पतीला दीर्घायुष मिळावे आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत ! मग ऊपास, वडाची पूजा, वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या, त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा वगैरे वगैरे….

वास्तविक हिंदु संस्कृतीत कुठल्या ही सणाशी, व्रताशी
कुठली तरी कथा ही असतेच. मात्र या कथांच्या मागे
एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता. आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षीत आहे. विचारक्षम आहे. परंपरेतील अंधश्रद्धेचा, फोलपणाचा भाग ती डावलू शकते.

आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही, पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे.

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे, उपयुक्ततेचं या सणाशी, व्रताशी घनिष्ठ नातं आहे. पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे. वड सावली देतो, भरपूर प्राणवायु पुरवतो, पक्षी पाखरं पांथस्थ यांचा तो आधारवड आहे.
याची मुळं मातीची धूप होऊ देत नाही. आणि हे झाड दीर्घायुषी असतं. त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते. त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे.

आजची स्त्री हे जाणते. वृक्षसंवर्धन ही हिंदु संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं. मग बाकीच्या बाबी या केवळ मौज, हौस, गंमत, करमणुक साजरीकरण या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात.

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो, “खरंच सावित्री आहे ती. म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”
इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते. ती शक्ती असते.
सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला, “गेले दहा दिवस सीमा क्चारंटाईन आहे. मी घर सांभाळू शकलो. नसेल तिच्याइतकं. पण मनापासून केलं. आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णीमेचा उपास म्हणून बनवलीही.
आणि काकु आज मीही उपास केला..कां ? विचारा….
तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली.
स्त्री मधे नैसर्गिक त्याग, सहनशक्ती, संयम हे गुण असतात. म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी. पण आज मी तिच्यावतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचीत अनुभव घेतला….””

अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं, हे आधुनिकत्व. नव्या विचारधारेची अर्थपूर्ण रुजवण हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण…
एक सुसंस्कार.
तुम्हाला काय वाटतं ?

राधिका भांडारकर

– लेखन : सौ.राधिका भांडारकर. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. आजच्या स्थितीत कुटुंबाचे हित लक्षात घेऊन आगळी वेगळी वटपौर्णिमा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा