कवयित्री इंदिरा संत यांचे अकाली दिवंगत झालेले पती, कवी व लघुनिबंधकार स्व. नारायण माधव सन्त यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली……
– संपादक
कितीतरी पुस्तके अशी आहेत की त्यांच्या पुढे आवृत्त्या न निघाल्याने ती मिळणे जवळ जवळ दुरापास्त झालेले आहे. अशा पुस्तकाची जुनी आवृत्ती अभावानेच कधी कधी अचानक समाज माध्यमांद्वारे विक्रीस येते आणि त्यावर जो प्रथम संधी घेतो त्याच्या पदरात ती प्रत पडते. ती काही वेळा अतिशय जीर्ण अवस्थेतही असू शकते. पण त्याला काही इलाज नसतो कारण तो एक दृष्टीआड झालेला खजिना असतो.
असेच एक पुस्तक समाज माध्यमात एकाकडे पोहोचल्याचे लक्षात आले. “उघडे लिफाफे” आदरणीय कवयित्री इंदिरा संत यांचे अकाली दिवंगत झालेले पती, सहृदय रसिक कवी व लघुनिबंधकार स्व. नारायण माधव सन्त यांचा हा एकमेव प्रसिद्ध लघुनिबंध संग्रह !
या संग्रहाला सुप्रसिद्ध मराठी समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी यांची सुंदर विवेचन करणारी प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहात वार्याची झुळूक, कात्री, पोस्टाची पेटी, दुसर्याचे कपडे, बोहारी, आजारपणाचं सुख, बँक – बुक, पानाचा षोक, साखरेची गोडी, लिफाफे, हिशेबाचें व्यसन, चक्रवर्ति आणि रस्ते, माझा प्रेमळ मित्र !, उधळेपणा, मुखवटे, खाजगी दानत, माझी पहिली लघुकथा प्रसिद्ध झाली तेव्हा -, व सुरुवात असे 18 लघुनिबंध संग्रहित आहेत. त्यांचे असंग्रहित असे शेवटचे लघुनिबंध शक्य तो लवकर संग्रहित व्हावयाला हवेत असे वा. ल. कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही.
‘उघडे लिफाफे‘ याची प्रथम आवृत्ती 1944 मध्ये केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली दिसते. नंतर त्याच प्रकाशनाने या पुस्तकाच्या 1945 व 1950 मध्ये आवृत्त्या काढलेल्या दिसतात. नंतर मात्र या पुस्तकाच्या आवृत्त्या निघाल्या नाही.
मंगल वाचन या वि. स. खांडेकर संपादित पाठ्यपुस्तकात स्व ना. मा. सन्त यांचा ‘पतंग‘ हा लघुनिबंध घेण्यात आलेला आहे. आजचे निबंध या म. वि. पाठक व ज. के. रानडे यांनी संपादित केलेल्या संग्रहात त्यांचा ‘चाळिसी‘ हा लघुनिबंध घेण्यात आला आहे. वासंतिका या वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेल्या संग्रहात त्यांचा ‘रिकाम्या बाटल्या‘ हा लघुनिबंध घेण्यात आला आहे. साहित्य अकादमीने 1972 मध्ये प्रसिद्ध केलेल्या व के. ज. पुरोहित यांनी संपादित केलेल्या ‘प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह’ यात त्यांचा ‘घराचे व्यक्तिमत्त्व‘ हा लघुनिबंध घेतला आहे.
पारिजात या वि. स. खांडेकर संपादित संग्रहात हाच लघुनिबंध तसेच एक खेदजनक विचार, ही खट्याळ पुस्तके, घराचे व्यक्तिमत्त्व व उधळेपणा हे लघुनिबंध घेण्यात आले आहेत. हे सर्व उल्लेख करण्याचा उद्देश एकच आहे की त्यांचे अनेक लघुनिबंध असे विखुरलेले व असंग्रहित आहेत.
उघडे लिफाफे या संग्रहात संकलित केलेल्या 18 पैकी 14 लघुनिबंध ज्योत्स्ना, समीक्षक, किर्लोस्कर, स्री, मनोहर इत्यादि मासिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. उधळेपणा, मुखवटे, खाजगी दानत व सुरुवात या लघुनिबंधाच्या मध्यवर्ति कल्पना इंग्रजीतून घेतल्या आहेत असे 29 नोव्हेंबर, 1943 रोजी मनोगतात स्व. ना. मा. सन्त यांनी नमूद केले आहे. या संग्रहाला शेवटी त्यांनी लघुनिबंध :स्वरुप व स्वभाव हा प्रबंध जोडला आहे.
स्व. ना. मा. संन्त यांचा परिचय आज गुगलवर देखील मिळत नाही. ‘भारत नेते’ हे एक अनुवादित पुस्तक त्यांच्या नावावर 1924 मध्ये पद्म प्रकाशन, मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेले दिसते. काही संदर्भ चाळले असता थोडाबहुत परिचय मिळतो तो असा :जन्म 15 मे, 1909. पुणे येथील फर्गसन काॅलेजमधून ते बी. ए झाले. फर्गसनच्या मराठी मंडळाचे ते चिटणीस होते आणि ह्याच मंडळाच्या विद्यमाने ‘ज्योत्स्ना’ या नावाचा जो कविता, लघुकथा व लेख यांचा सुप्रसिद्ध संग्रह प्रसिद्ध झाला त्याचे संपादनही त्यांनीच केले होते. याच संग्रहात त्यांचा पहिला ललितनिबंध ‘फुलपांखरुं’ हा प्रसिद्ध झाला.
सन 1939 मध्ये ते मुंबईच्या एस. टी. काॅलेजमधून बी टी परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक या दृष्टीने त्यांनी पुणे आणि मुंबई येथे काम केले. 1943 पासून ते बेळगाव येथील मराठी ट्रेनिंग काॅलेजात प्राध्यापक म्हणून काम करु लागले होते. 23 जून, 1946 रोजी ते आकस्मिकपणें निधन पावले. मृत्यूपूर्वीच काही दिवस त्यांची त्याच काॅलेजचे प्रिन्सिपल म्हणून नेमणूक झाली होती. प्रस्तावनेत वा. ल. कुलकर्णी यांनी या अनुषंगाने नमूद केले आहे की स्व. ना. मा. सन्तांच्या शेवटच्या ललितनिबंधांतून – विशेषत: त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 7-8 ललितनिबंधांतून त्यांची प्रतिभा ललित निबंधाला कसे स्वत:चे असे स्वतंत्र आकर्षक रुप प्राप्त करुन देत होती ह्याचा चांगलाच प्रत्यय येतो. संतांची लेखनप्रकृति ही ललित – निबंध लेखनाला साजेशीच होती.
ह्या प्रकृतीचा ऐन विकास होत असतांनाच त्यांना मृत्यु आला हे दुर्दैव :ते जगते वाचते तर ललित – निबंध लेखनातील काही अत्युच्च शिखरे त्यांच्या प्रतिभेने पुढे मागे गाठली असती.
प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी संग्रहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे की संतांचे निबंध म्हणजे खरोखरच ‘उघडे लिफाफे’ आहेत :या उघड्या लिफाफ्यांतून त्यांचे व्यक्तित्त्व कसे स्पष्टपणे उमटून बाहेर पडत आहे! संतांच्या ललित निबंधांत पोस्टाची पेटी, पत्रे, लिफाफे हे विषय उगीच नाही वरचेवर येत ! ते त्यांचे आवडीचे चिंतनविषय आहेत. पत्रांच्या द्वारा होणारा आत्माविष्कार संतांना मोठा ह्रद्य वाटतो. ललित निबंधाशी पत्राचे फार जवळचे नाते आहे आणि हे नाते त्यांनी आपल्या शेवटच्या निबंधात व्यक्त केलेच आहे.
परंतु या ‘उघड्या लिफाफ्यां’ तून आपल्याला संतांच्या मनाचे कितीतरी कानेकोपरे स्पष्ट दिसत आहेत :त्यांची नीटनेटकेपणाची आवड, त्यांची हळुवार मनोवृत्ति, त्यांची प्रबल जीवनासक्ति, त्यांची अभिजात रसिकवृत्ति, त्यांचे कविह्रदय, मानवी मनाचे विविध खेळ कुतूहलाने अवलोकण्याची त्यांच्या ठिकाणची आवड, एक ना दोन, अशा अनेक गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत आणि हे संतांचे व्यक्तित्व मोठे आकर्षक वाटत आहे. अशा व्यक्तीच्या सहवासात कोणालाहि चार घटका घालवाव्याशाच वाटतील.
या सहवासानंतर आणि त्यात झालेल्या गुजगोष्टीनंतर आपला जीवनोत्साह खात्रीने दुणावल्याखेरीज राहणार नाही.
त्यांच्या ‘चाळिशी’ तून आपण जगाकडे पाहू लागलो की ‘त्याच डोळ्यांतून दिसणारं तेच जग पाहून जे आपण आपल्या अन्तर्मनात अगदी कंटाळून गेलेलो असतो, तेच आकाश आणि तेच ढग, तोच रस्ता आणि तीच वर्दळ, त्याच इमारती आणि तीच माणसं, जशीच्या तशीच पाहून आपल्या डोळ्यांना जो एक प्रकारचा वीट आलेला असतो, प्रत्यही दिसणारी सौंदर्ये सुध्दा फिकी वाटू लागलेली असतात व रंगांचा रसरशीतपणाही कमी झाल्यासारखा वाटत असतो ‘ते सारे एकदम बदलते,’ जगातील सारा रखरखीतपणा लोप पावून सगळीकडे आल्हाद पसरल्यासारखं वाटू लागतं. जिकडे तिकडे सुखाशेचा रंग भरल्याचा प्रत्यय येऊन पूर्वी नजरेस न आलेली सौंदर्ये डोळ्यात भरु लागतात. अंगात यौवन संचारलं, म्हणजे जगात वसंत बहरल्यासारखं वाटावं तसंच काहीसं’ संतांच्या ललितनिबंधांची’ चाळिशी ‘चढविली की आपणास वाटू लागतं असे प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. ते पुढे म्हणतात की हेच खरे ललित – निबंधाचे कार्य व ते संतांचे निबंध खचित साधतात.
सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आलेले जे जीवन असते त्यातील अनंतविध सौंदर्यस्थानें ललित – निबंधकार प्रकाशित करीत असतो व जीवन समरसून व समंजसपणे जगण्याची जी कला आहे तिची जणू प्रात्यक्षिकेच देत असतो. संतांचे निबंध हेच कार्य साधतात. संतांच्या या ललित निबंधांपैकी काहींचा आत्मा तर कारुण्य हाच आहे :त्यात ग्रंथित केलेले अनुभव खात्रीने निर्भेळ सुखाचे नाहीत ;परंतु दु:ख किंवा शोक यांच्या छटा असलेल्या या अनुभवांचे दर्शनहि संतांनी एवढ्या प्रसन्न चित्ताने घडविलेले आहे की त्यातील दु:खात्मक भागापेक्षा त्यात साठवलेले काव्यच आपणास अधिक जाणवून जाते आणि एकीकडे आपले डोळे पाणावले तरी आपले हदय त्यातील विशुद्ध भावसत्याच्या दर्शनाने आनंदून गेलेले असते असे प्रा वा ल कुलकर्णी नमूद करतात.
ते पुढे असेही नमूद करतात की जीवनाकडे प्रसन्नपणे पाहण्याची शक्ति ना. मा. संतांच्या ठिकाणी विशेषत्वाने दिसते. म्हणूनच ‘आजारीपणाचे सुख’ ते अनुभवू शकतात;आपल्या छोट्या संसारात येणाऱ्या अडीअडचणीतील काव्य ते कलात्म मनाने आस्वादू शकतात ; आपल्या जीवनातील सुखद स्मृतींची कितीतरी काळजीपूर्वक ते जपवणूक करतांना दिसतात, ‘डाळिंबाहून मधुर आणि द्राक्षाहून गोड अशा आपल्या पत्नीने’ बोहार्याकडून घेतलेल्या डब्याबरण्यांनी सजविलेल्या स्वयंपाकगृहाचे सौंदर्य देखील ते आपल्यासमोर चित्रित करु शकतात. ‘पानांचा षोक’ किंवा ‘उधळेपणा’ यात भरलेल्या काव्याचा अर्थ लावू शकतात.
जीवनाकडे प्रसन्नपणे पाहणाऱ्यालाच जीवनाचे कोडे थोडेफार उलगडता येत असते व जीवनाकडे समंजसपणे बघण्याची शक्ति अंगी बाणतां येत असते. संतांनी ही साधना थोडीफार केलेली आहे असे दिसून येते. त्यांनी आपल्या निबंधांतून केलेले जीवनचिंतन सखोल नसले तरी त्यात एक प्रकारचा सुजाण समंजसपणा सर्वत्र व्यक्त होतो. ‘अर्जुनाप्रमाणे विराटपुरुषाचे दर्शन घेण्याचे धैर्य अंगी असण्यापेक्षा, आपल्या मनोविश्वाचे नग्न दर्शन घेण्याचे धैर्य असणे अत्यावश्यक असते’ असले एखाद्या जीवनसत्याचे सहज दर्शन घडविणारे वाक्य जेव्हा संत झटकन लिहून जातात तेव्हा जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या शांत, विवेकशील तत्वग्राही वृत्तीचा प्रत्यय वाचकाला आल्याखेरीज राहत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
प्रसन्न मनोवृत्ति हा खर्याखुर्या विनोदबुद्धीचाच परिपाक असतो. संतांच्या सूक्ष्मकोमल विनोदबुद्धीचा प्रत्यय ‘उघडे लिफाफ्यां’ तील पानापानांतून येतो. त्यांच्या सबंध ललित – निबंधलेखनाला त्यांच्या विनोदबुद्धीने विलक्षण उजाळा आणला आहे. ‘हिशेबाचे व्यसन’, ‘चक्रवर्ति आणि रस्ते’, ‘माझा प्रेमळ मित्र’ यासारख्या ललित – निबंधांचे चिंतन – विषय विनोदबुद्धीला चालना देणारे आहेत. तेव्हा या निबंधांतून तिचा ढंगदार विलास आपणास सर्वत्र पाहावयास मिळाला तर त्यात काहीच नवल नाही.परंतु ‘आजारीपणाचं सुख’, ‘मुखवटे’,’ दुसर्याचे कपडे’,’ साखरेची गोडी ‘, ‘कात्री’ यासारखे त्यांचे दुसरे कोणतेहि निबंध घ्या :किंवा अगदी
‘ब्यँक – बुक’ यासारख्या थोडीशी कारुण्याची झांक असलेला त्यांचा एखादा निबंध घ्या, त्यातहि ‘संसाराच्या अडचणींतून शिलकेचं लिंबू बँकेपर्यंत सांभाळीत नेण्याचं काम’ करणार्या चमचा – लिंबू शर्यतीचे जे मधूनच सुखद वर्णन येते त्यात प्रगट झालेल्या विनोदबुद्धीने एकंदर निबंधाचे वातावरण कसे एकदम प्रसन्न बनते. आपल्या सर्वच जीवनचिंतनाला सूक्ष्म विनोदबुद्धीचे तलम अस्तर जोडण्याची कला संतांना अगदी सहजपणे अवगत झाली होती असेच हे ललित निबंध वाचताना वाटते असे प्रा कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे.
स्व. ना. मा. संत यांनी काव्य, कथा व लघुनिबंध या तीन क्षेत्रात संचार केला. पण त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वात हानी झाली ती लघुनिबंधाची. उघडे लिफाफे मध्ये प्रसिद्ध झालेल्या लघुनिबंधांखेरीज अद्यापि पुस्तक रुपाने प्रकाशित न झालेले त्यांचे 10 – 15 लघुनिबंध आहेत. रिकाम्या बाटल्या, पतंग, तुटलेली वहाण, ही खट्याळ पुस्तके, एक खेदजनक विचार, त्यांचा पहिला लघुनिबंध फुलपाखरु, टायपिस्ट पाहिजे यांचा उल्लेख मिळतो.
या निमित्ताने एका विचाराने मन अस्वस्थ होते की स्व ना. मा. संत यांचा उघडे लिफाफे हा संग्रह 1944 व 1950 मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या पुन्हा आवृत्त्या काढण्याचा वा त्यांचे समग्र वाङमय प्रसिद्ध करण्याचा कोणीच विचार का केला गेला नसावा ? किंबहुना सहवास हा संत दांपत्यांचा कविता संग्रह देखील आज कोठे आढळत नाही. हे सर्व पुन्हा वाचकांना उपलब्ध व्हायला हवे. संबंधित प्रकाशकांनी याबाबत पुढाकार घ्यायला हरकत नाही.

– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
इंदिरा संत या खूप गाजल्या आणि लोकप्रिय ठरल्या. त्यांचं आपल्या पतीवर खूप प्रेम होतं याची साक्ष त्यांच्या प्रेम कविता देतात. दुर्दैवाने संत हे अल्पायुषी ठरले आणि लेखक म्हणूनही उपेक्षितच राहिले. त्यांचे आपण जे स्मरण केलेत आणि जी काही माहिती उपलब्ध झाली ती सर्व वाचकांसमोर ठेवलीत हे काम नक्कीच कौतुकास पात्र आहे.
उघडे लिफाफे खुपच सुंदर वभावूक 👌👌👌👌