दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस हाती घेतले आहे. या अंतर्गत दरवर्षी नियमितपणे व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे आयोजित करण्यात येतात. मात्र गेल्या वर्षांपासूनच्या कोरोनाच्या आपत्तीमुळे मिशनच्या कार्याला प्रारंभी खीळ बसली होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून या आपत्तीवर मात करण्यात मिशन यशस्वी झाले.
मिशनने ५ जून २०२० पासून ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला. शिवजयंतीचे औचित्य साधून ही व्याख्यानमाला “शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला” या नावाने सुरु करण्यात आली. पुढे १५ जुलैपासून या व्याख्यानमालेचे नाव “जय जवान जय किसान” असे करण्यात आले. या व्याख्यानमालेमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील जवळपास १०० मान्यवर आयएएस, आयपीएस, आयएफएस, राजपत्रित अधिकारी तसेच नामवंत वक्ते येऊन गेलेत. कधी कधी एकेका दिवशी ४/५ सत्रे व्हायची. त्या प्रमाणे आतापर्यंत ११३१ व्याख्याने प्रसारित झाली.

श्री. शेखर गायकवाड(IAS).
या व्याख्यानमालेमध्ये काही व्याख्यानांना प्रत्येकी २५ हजार एवढा मोठा प्रेक्षक वर्ग लाभला. यातील काही व्याख्याने मिशन आयएएस अमरावती या यूट्यूब पेजवर टाकण्यात आली असून उर्वरित सर्व व्याख्याने मिशनचे प्रमुख प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत.
ही व्याख्याने आयोजित करीत असताना स्पर्धा परीक्षेवरील व्याख्यानाना अधिक महत्त्व देण्यात आले.
या व्याख्यानमालेचा लाभ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेश येथील मिशन आयएएसच्या हजारो विद्यार्थ्यांनी घेतला. या व्याख्यानमाले सोबतच मिशनने वेगवेगळ्या झूम सभा व गूगल सभा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण केले .
ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सहसंचालक प्रा.प्रवीण खांडवे, समन्वयक प्रवीण गुल्हाने, जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी श्री रवींद्र दांडगे, सदस्य श्री आदेश वानखेडे, राज्य समन्वयक निवृत्त माहिती संचालक श्री देवेन्द्र भुजबळ यांनी अथक परिश्रम घेतले .
– प्रभाकर वानखडे.