इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढत असल्याचे बोलले जात असले तरी कोरोनानंतर मात्र मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले असून मराठी हि ज्ञान भाषा आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री तथा मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांनी केले. कल्याण पूर्वेतील छत्रपती शिक्षण मंडळाच्या ज्ञानमंदिर शाळेच्या स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
आपल्या संस्कृतीची जपणूक होण्यासाठी मराठी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उपक्रम राबवले जात असतात. त्यामुळे पालकांना नक्कीच कळेल कि मराठी शाळांचे सुरु असलेले ज्ञान देण्याचे काम हे उत्तम आणि दर्जेदार आहे. शिक्षक आणि पालक एकत्र येवून विद्यार्थ्यांचे हित साधत आहे. हे चित्र फक्त मराठी शाळांमध्येच दिसते. त्यामुळेच ‘मराठी शाळांकडे वळा’ असा संदेश देऊन त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले.
त्या म्हणाल्या, माझ्या आई वडीलांचे शिक्षण मराठीतूनच झाले. मीही मराठी शाळेत शिकले. माझ्या मुलांचे शिक्षणही मराठीतूनच झाले आहे. मराठी शाळांचा अनुभव गाठीशी असल्यानेच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले. मराठी शाळेतील शिक्षक जेव्हा शिकवतात, तेव्हा त्यातून आई वडिलांची आपुलकी जाणवते. मराठी माध्यमात घेतलेले शिक्षण हे तणावमुक्त असते. मराठी भाषा हि संस्कृती, स्वभाव घेऊन उभी राहते. मराठी शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुमचे भवितव्य उज्वल असेल. इंग्रजी हि जरी विश्वाची खिडकी असली तरी, ‘वाघिणीचे दुध तेव्हाच पिता येईल, जेव्हा आईचे दुध प्याले असाल.’ असे उदाहरण देत मातृभाषा येत असेल तर इतर भाषा शिकणे देखील कठीण जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या स्नेहसंमेलनात, बालनाट्य, पथनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, नवीन व जुन्या गाण्यांचा सुंदर मिलाप साधून फ्युजन नृत्य असे विविध बहारदार प्रकार सादर करण्यात आले.
विशेष म्हणजे काही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांसह पालक देखील विविध सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या पालकांना देखील बक्षीसे देण्यात आली.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्रमुख प्रा. मंदार भानुसे, छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी एकनाथ गागरे, शालेय समिती सदस्य फडके, उपमुख्याध्यापक बबन निकम, पर्यवेक्षक विजय भामरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक प्रमुख शिक्षिका ममता वसावे व अस्मिता सावंत यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेले हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय झाले.

– लेखन : आस. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800