Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यवर्धा साहित्य संमेलन ( ३ )

वर्धा साहित्य संमेलन ( ३ )

संमेलन स्थळी आल्यानंतर मी सर्वप्रथम नोंदणी कक्षात जाऊन माझ्या नावाचे किट घेतले. सुंदर विणलेल्या कापडी बॅगेत, कार्यक्रम पत्रिका, लिहिण्याचे पॅड, पेन व चहानाश्ता, भोजन कुपने होती. “संमेलन सहभाग” हा बिल्ला होता.

बऱ्यापैकी लांब असलेल्या भोजनगृहात जाऊन नाश्ता करून मी मुख्य विनोबा भावे सभा मंडपात उद्घाटन कार्यक्रमासाठी आलो.
सुरवातीला वर्धा गौरव गीत श्री अजय हेडाऊ यांनी व त्यांच्या गायक व कलाकार वृंदांनी सादर केले. सभामंडपात लावलेल्या मोठ्या स्क्रीन वर छान पहाता आले व त्याचा आनंद घेता आला.

त्यानंतर अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा मा. उषाताई तांबे यांनी संमेलन ध्वजाचे ध्वजारोहण केले. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना थोडा उशीर झाल्यामुळे हा कार्यक्रम उशीरा सुरू झाला. सुरवातीला मा. रविंद्र शोभणे यांनी लिहिलेले संमेलन गीत झाले.

अ.भा.सा.महामंडळाच्या अध्यक्षा मा.प्रा. उषाताई तांबे यांचे व कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांचे प्रास्ताविक झाल्यावर स्वागताध्यक्ष मा. दत्ता मेघे यांनी सर्वांचे स्वागत केले.

त्यानंतर पूर्वाध्यक्ष मा. भारत सासणे यांनी संमेलनाची सूत्रे नूतन संमेलनाध्यक्ष मा. न्या. नरेंद्र चपळगावकर यांना प्रदान करतांना त्यांनी वर्षभर साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा, प्रवासाचा, कार्यक्रमांचा, अनुभवांचा अहवाल आपल्या भाषणातून सांगितला.

प्रमुख पाहुणे साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष, हिंदी साहित्यकार विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी आपल्या भाषेला महत्व देवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे कौतुक केले. मराठी भाषेला समृद्ध बनवणाऱ्या संतांचा, साहित्यिकांचा उल्लेख केला.
ते म्हणाले सर्व भारतीय भाषांची अंतर्वर्ती धारा एक आहे. रामायण व महाभारताने देशाला एकत्वाच्या धाग्याने जोडले आहे. भाषा ही जीवनातील सर्वात मौल्यवान असे प्रकटीकरण आहे असे विचार मांडून या संमेलनाला बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.

कवी कुमार विश्वास यांनी पाच मिनीटात काय विचार मांडू ? असे विचारून साहित्यिक पुढे व राजकारणी मागे ठेवून संमेलने साजरी व्हायला हवीत असा विचार मांडला. राष्ट्रीय कवी दिनकर व पंडीत नेहरू यांचे उदाहरण देवून राजकारण लडखडते तेंव्हा साहित्य त्याला दिशादर्शक होते असे सांगितले. महाराष्ट्रातील तरूण लेखकांना त्यांनी देशाचे दिशादर्शक होण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळक व छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला.

आपल्या भाषणात मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी मराठीसाठी मंत्रालय करीत असलेल्या कामांची माहिती दिली. शासन साहित्यिक क्षेत्रात ढवळाढवळ कधीही करणार नाही पण हिंसाचाराला प्रोत्साहन मिळणार नाही हे पाहील असे सांगितले.

मा. मुख्यमंत्र्यांनीही साहित्य क्षेत्रात शासनाचा कधीही दबाव नसेल उलट सहकार्यच असेल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वतंत्र विदर्भासाठी काहींनी घोषणा दिल्या. पोलीसांनी त्यांना बाहेर काढले.

आपल्या भाषणात बोलतांना अध्यक्ष मा.न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील महत्वाचे मुद्दे मांडले. त्यात संमेलने स्वायत्त असावीत, शासनाच्या मदतीवर अवलंबून नसावीत हा महत्वाचा मुद्दा होता. अशा तर्‍हेने खूप लांबलेला उद्घाटन समारंभ संपला.

मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यावर अर्धा मंडप हा रिकामा झाला होता तो आता पूर्ण रिकामा झाला.
क्रमशः

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?