काही वाटा काही वळणं
नेहमीच असं चालत रहाणं
वाटेवरल्या पाऊल खुणातून
काहीतरी मग शोधत बसणं !
वाटेवरती पिंपळ असतो
पानगळीतून सांगतो काही
शेजारच्या तलावातून
स्मृती तरंग असेच वाही !
काजव्यांचा थवा असे
आम्रतरुवर जमलेला
क्षणात चमकतो अन मुरझतो
जणुं मेळावा बहरलेला !
बहावा ही घोसाळलेला
पिवळा पितांबर ल्यालेला
फुलाफुलातून सांगत असतो
आनंद कसा वाटलेला !
मोहक सौंदर्य वाटेवरचं
किती साठवावं डोळ्यात म्हणून
पुढच्या जन्मी असंच मिळावं
सांगतो गुलमोहरास मी निक्षुन !
काही वाटा काही वळणं
विसरणे शक्यच नसते
ऋणानुबंधांच्या वाटेवरती
त्यांनाच तर जपायचे असते !

– रचना : सुनील चिटणीस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
या कवितेतून अनेक आठवणी आणि या निमित्ताने
मानवी भावना उत्तम पध्दतीने शब्दबद्ध केल्यात.