खेळ आणि सांस्कृतिक सहभाग, नृत्य,चित्रकला, बैठे खेळ या सगळ्या माध्यमातून बालक आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक अवस्था आणि भावनिक गरजा व्यक्त करत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे बालकांच्या सर्वांगीण विकास व वाढीसाठी अत्यंत महत्व आहे. यामुळे बालकांचे शरीर सदृढ होते व मन निरोगी राहते, याचीही योग्य ती जाणीव निर्माण झालेली आहे.
खेळांमुळे मुलांमध्ये आज्ञाधारकपणा, समता, शिस्त, खिलाडूवृत्ती, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव, सांघिक भावना, सावधानता, महत्त्वाकांक्षा हे गुण आत्मसात करतात. हे सर्व गुण बालकांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या गुण कौशल्यांना वाव मिळावा आणि बालकांना व्यक्त होण्यास उत्तम संधी मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व बालगृहातील काळजी व संरक्षण अंतर्गत येणाऱ्या बालकांसाठी महिला बाल विकास विभाग तर्फे नुकताच जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. प्रचंड उत्साहाने मोठ्या संख्येने बालकांनी यात भाग घेऊन आपल्या कला गुणांचे सुरेख प्रदर्शन केले.
तीन दिवसीय महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मेघराज भोसले अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र, तसेच श्रीमती सुहिता ओव्हाळ, विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग, श्री. सुरेश टेळे CDPO (नागरी), पुणे तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य श्री.चैतन्य पुरंदरे व ॲड. जयश्री पालवे त्याचप्रमाणे बाल कल्याण समिती 1 व 2 च्या अध्यक्ष डॉ राणी खेडीकर व श्रीमती नंदिता अंबिके, तसेच सर्व सदस्य, श्री. दानवडे, JJB सदस्य प्रसंगी उपस्थित होते.
सर्वांनी बालकांना शुभेच्छा दिल्या व मुलांचा उत्साह वाढवला.
चाचा नेहरू बाल महोत्सवात आठशे बालकांनी सहभाग घेतला. अनाथ, निराधार व संकटात सापडलेल्या बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतील बालकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकांना मोठया संख्येने महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले.
मैदानी खेळामध्ये कब्बडी व खोखो हे दोन सांघिक, लांब उडी व १०० मी धावणे हे दोन वैयक्तिक आणि इनडोअर खेळामध्ये बुद्धिबळ, कॅरम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक व सांघिक नृत्य स्पर्धा अशा सुमारे ११ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुले व मुलींच्या मोठा व लहान अशा दोन वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्या.
मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी बालकांना व संघांना मानचिन्हाने व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्था मुलींचे बालगृह, कर्वेनगर व मुलांचे ज्ञानदिप बालगृह दिघी यांनी सर्वात जास्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विजेतेपदाचा चषक (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात श्रीमती अश्विनी कांबळे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी महिला व बाल विकास विभागाचे उपआयुक्त श्री राहुल मोरे यांनी बालकांना भ्रमणध्वनीव्दारे शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच त्यांचा उत्साह वाढवला. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी चित्रफीत संदेशाद्वारे बालकांना शुभेच्छा दिल्या.
अतिशय उत्साहाने बालकांनी या महोत्सवात भाग घेतला. प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर निखळ आनंद दिसून आला.
निबंध लेखन स्पर्धेतून बालकांनी आपले विचार व्यक्त केले. आपले व्यक्तिगत अनुभव लिहून त्यांच्या नाजूक मनावरचे ओझे निश्चितच कमी झाले असणार.
वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बालकांनी आत्मविश्वासाने आपले विचार व्यक्त केले. त्यांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा नी त्यांच्या सुंदर चित्रातून मूर्त रूप घेतलं. मैदानी खेळ स्पर्धेतून बालकांचे कौशल्य तसेच बुद्धिबळ स्पर्धेद्वारे त्यांची एकाग्रता, बुध्दी प्राबल्य हे गुण बघायला मिळाले.
बालकांची काळजी, संरक्षण आणि त्यांचे पुनर्वसन ही सगळ्यांची सांघिक जबाबदारी आहे. महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती या बालकांच्या पुनर्वसनासाठी क्रियाशील आहे.बाल महोत्सव तसेच अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित करून बालकांना सहभगी करून घेण्यात येते.
बालमेळावा यशस्वी करणारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे कार्यालयाची टिम व पुणे जिल्ह्यातील सर्व संस्था (शासकीय व NGO) अधिकारी व कर्मचारी, दोन्ही बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य, MSW काॅलेजने दिलेले स्वयंसेवक विद्यार्थी व इतर सहकारी यांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800