सहत्रभोजनी साहेब
माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्री.श्रीपाद गजानन राव सहस्त्रभोजने यांचे वयाचे ९८ व्या वर्षी 13 मार्च 2023 रोजी संध्याकाळी दुःखद निधन झाले. काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी वसुधा, मुलगा हर्षल, माधवी मुलगी मंगला नाईक व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
श्री ग सहस्रभोजने यांची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दीनदयाळ नगर येथील गणेश मंदिर जवळ या निवासस्थान येथून निघाली. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंबाजरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अल्प परिचय
सहस्त्रभोजनी साहेब १९४३ ते१९५० या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आंध्र प्रदेश, बंगाल व आसाम प्रांत येथे प्रचारक होते.
प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी राष्ट्रधर्म, हिंदुस्थान समाचार, तरुण भारत व हितवाद येथे पत्रकारिता केली. त्यानंतर ते सरकारी नोकरीत गेले.
मुंबईला बदली झाल्यानंतर ते अल्पबचत खाते,
म.रा वि.म.यात प्रसिद्धी अधिकारी होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ.ए.आर.अंतुलेव बाबासाहेब भोसले या चार मुख्यमंत्र्यांचे ते प्रसिद्धी अधिकारी राहिले होते. चार मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केलेले ते एकमेव अधिकारी होते.
निवृत्त झाल्यावर त्यांना सरकार ने मुदतवाढ देऊ केली होती. पण ती नाकारून ते डॉ.दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवन येथे सेवा देऊ लागले.
निवृत्तीनंतर पेन्शन धारकांच्या संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून ते नागपूर येथे आले.
नागपूरच्या सामाजिक जीवनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या. देहदान, रक्तदान यासाठी त्यांनी प्रचार कार्य केले.
सहस्त्रभोजनी साहेबांच्या निधनानंतर व्यक्ती झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१) उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस :
माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद सहस्त्रभोजने यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दु:खद आहे. नागपुरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता, त्यानंतर माहिती💐7 व जनसंपर्क विभाग आणि नंतर अनेक शासकीय विभागात त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले आणि बाबासाहेब भोसले अशा 4 मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. 4 मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणारे ते कदाचित एकमेव असावे. देहदान, रक्तदानाच्या क्षेत्रात त्यांनी सामाजिक कार्य केले. ‘असे जपले स्वयंसेवकत्त्व’ हे त्यांच्यावरील पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले होते.
सरकारी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेश, बंगाल आणि आसामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारुन त्यांनी स्वत:ला पुन्हा संघकार्यात झोकून दिले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांति🙏🏽
२) गुरूवर्य सहस्त्र भोजनेसाहेबांच्या सहवासात अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली.त्यांचे सक्रीय मार्गदर्शन मला मिळाले.
गुरूवर्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…
– सु.ह.तोरणे. निवृत्त माहिती संचालक
३) श्री . ग. सहस्त्र भोजनी,एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व असुन मंत्रालय आता ते आमचे फ्रेंड, फुलासारखे आणि गाईड होते. विनम्र श्रद्धांजली…..
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ
४) अरे रे, एखादा वट वृक्ष कोसळावा, असे वाटत आहे. आपल्या सर्वांसाठी ते एक आदर्श, एक प्रेरणास्थान होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
– देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक
५) खरचं असे अनेक दुर्मिळ सद्गगुण
सहस्त्रभोजनीसाहेबांकडे होते. ते मुख्यमंत्र्यांकडे असताना मी नुकतीचं मावजमध्ये आले होते. कायम सफेद किंवा क्रिम रंगाच्या उभ्या पट्ट्यांचा। सैलसरं बुशशर्ट हा त्यांचा आवडता पोशाख० मला विशेष भावलेला त्यांचा स्वभावगुण म्हणजे सहस्त्रभोजनीसर मुख्यमंत्र्यांकडे असले तरी सीएम साहेबांची प्रत्येक बातमी, घेतलेला प्रत्येक निर्णय वृत्तपत्रांकडे पोहोचला कि नाही ते पाहाण्यासाठी ते स्वतः खाली वृत्तशाखेत येत. तेथील वृत्त उपसंचालकाशी, संचालकाशी जातीने जाऊन गोड गोड गप्पा करीत, माहिती घेत, लवकर पाठवण्याच्या सूचना देत. त्याकाळात चॅनेल्सचं पेब फुटलेलं नव्हतं, माहिती खातं हे एकमेव साधन होतं,/त्याकाळातली सहस्त्रभोजनी साहेबांची शासनाच्या प्रसिध्दीसाठीची धडपड, आकाशवाणी आणि नुकत्याचं सुरू झालेल्या दूरदर्शनला बातम्या वेळेत पोहोचण्यासाठीची धडपड अगदी मंत्रमुग्ध होऊन मी पाहिली होती आणि त्यांनाचं मनोमन गुरू मानून ती धडपड स्वतःत आणण्याचा प्रयत्न मी सेवानिवृत्त होईपर्यंत करीत राहिले. सरांचे स्मरण असेच सतत होत राहिलेचं. “तस्मै श्री गुरूवेः नमः.”
– वीणा गावडे. निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
६) चार मुख्यमंत्र्यांचे पीआरओ
महाराष्ट्राच्या राजकारणावर माझा लेख तरुण भारतात छापून आला की त्यादिवशी सायंकाळी एक फोन हमखास ठरलेला असे. “मी सहस्रभोजनी बोलतो. विनोदराव, भट्टी जमली. किंवा, त्यात आणखी हे हे हवे होते.” गेली अनेक वर्षे कौतुक करणारे आणि हक्काने दुरुस्ती-सूचना करणारे हे विलक्षण वाचक- श्रीपाद गजानन सहस्रभोजनी सोमवारी जगाचा निरोप घेते झाले. फक्त दोन वर्षांनी त्यांचे शतक हुकले, याचे दु:ख आम्हा सर्वांनाच आहे. ते आणि मा. गो. वैद्य एकाच वस्तीतील ज्येष्ठ मित्र. नागपुरातील टेलिकाॅमनगर प्रभात शाखेचे नियमित स्वयंसेवक. दोघांनाही शतकाचा आत्मविश्वास होता. पण, दोन-दोन वर्षे कमी पडली.
पंतप्रधान/मुख्यमंत्री या सर्वोच पदाधिकाऱ्यांचे जनसंपर्क अधिकारी (PRO) होण्याची संधी फारच थोड्यांना लाभत असते. सहस्रभोजनी यांनी तर चार मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा विक्रम केला. संपूर्ण कारकीर्द निर्विवाद. ते स्वत: सात वर्षे संघाचे प्रचारक राहिलेले आणि चारही मुख्यमंत्री काॅंग्रेसचे- वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ. अब्दुल रहमान अंतुले आणि बॅ. बाबासाहेब भोसले. पण वाद नाही, कामात कुचराई नाही किंवा निष्ठेचा मुद्दा नाही. चव्हाण आणि अंतुले यांच्या मधल्या काळात वसंतदादा पाटील आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी वेगळे पीआरओ नेमले. परंतु, अतुलेंनी मात्र सहस्रभोजनींनाच परत बोलावले. (हा निर्णय नागपूर हिवाळी अधिवेशन काळातच झाला.) शंकरराव चव्हाण तर ऐन आणिबाणीत मुख्यमंत्री होते. त्यांचे कान भरण्याचा प्रयत्न कोणातरी संघद्वेष्ट्या काॅंग्रेस नेत्याने केला होता. त्यावर शंकरराव शांतपणे उत्तरले- “संघाचा कार्यकर्ता आहे ना. मग आपले काम चोख करेल.” सहस्रभोजनींनी तक्रारीची एकही संधी चव्हाणांना दिली नाही.
शेवटच्या काळात ते अतिरिक्त महासंचालक या पदावर होते. पण काम मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचेच करायचे. (नोकरी पेशात असे खालच्या पदावर काम कोणी मान्य करत नाही.) कारण, कामाची आवड आणि त्या कामावर निष्ठा. या पदाचा उपयोग करून अनेक कनिष्ठ सहकाऱ्यांच्या अडचणीत धावून जाण्याचे काम मात्र त्यांनी आवर्जून केल्याचे अनेकजण आजही सांगतात. इतके सुस्वभावी आणि इतरांना मदत करण्यात तत्पर सहस्रभोजनी आप्त-मित्र परिवारात ‘बगड’ या आगळ्यावेगळ्या टोपणनावाने ख्यात होते. त्यांच्या कार्यनिष्ठ, प्रदीर्घ जीवनाला मानाचा मुजरा.
– विनोद देशमुख. ज्येष्ठ पत्रकार, नागपूर.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800