Tuesday, June 17, 2025
Homeलेखआयुर्वेद उवाच ( ९ )

आयुर्वेद उवाच ( ९ )

वात दोष
आजपर्यंत आपण आयुर्वेदाचे आहार, ऋतुचर्या अश्या गोष्टी पाहिल्या. आता आपण आयुर्वेदाच्या अंतरंगात जाऊया.

आयुर्वेदात शरीराचे मूळ हे तीन गोष्टींवर अवलंबून असते.
१) दोष ज्यात वात, पित्त, कफ हे तीन दोष येतात,
२) दुष्य म्हणजेच सात धातु रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र.
३) तीन मळ पुरीष (मल), मूत्र, स्वेद (घाम).
ह्यांवरच शरीराचा व्यापार चालतो. त्यांचा समतोल राखणं हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

आजच्या लेखातून आपण त्रिदोषांबद्दल माहिती घेण्यास सुरुवात करूया. आज आपण सर्वप्रथम वात दोषाची माहिती पाहूया. चल गुणामुळे शरीरात सर्वत्र संचार करणारा व इतर दोन दोषांना देखील स्वतः सोबत घेणारा असा हा वात.

वाताचे गुण :
कोरडेपणा, हलकेपणा, शोषण करणे, शितता, खरखरीत पणा, अत्यंत रुक्षता, चल व सूक्ष्मता हे वाताचे गुण आहेत.

व्यक्तीच्या स्वभावातही वात असल्यास हे गुण दिसतात, कारण दोष शरीर आणि मन ह्या दोन्हीवर कार्य करतात.

वात वाढण्याची कारणे :
सतत कडु, तुरट, तिखट रसाचे सेवन करणे, सतत उपवास, चुर्मुऱ्यांसारखे हलके पदार्थ सतत खाणे, अति अथवा अकाली व्यायाम, अति मैथुन, सतत रात्री जागरण, (वरील सर्व कारणे हि आवश्यक देखिल आहेत जसे की व्यायाम अथवा त्या तीन रसांच्या पदार्थांचे सेवन करणे, फक्त त्याचा अतिरेक होऊ नये) बाहेरून लागलेला आघात, स्त्रियांमध्ये होणारे गर्भपात, मासिक ऋतुकाळात आहार विहाराची काळजी न घेणे, बाळंतिणीची काळजी न घेणे ह्यामुळे वात रोग उदभवतात.

वात हा दोष दोन प्रकारे प्रकोपीत होतो. एकतर वाढला गेला की अन्यथा मेद (स्थूलता) आदी गोष्टींमुळे अडला गेला तर. वाताला अडवलं तरी तो त्रास देतो आणि वाढवल्यावर तर तो देणारच. म्हणूनच वैद्याच्या सल्ल्याने त्याची योग्य ती चिकित्सा करावी.

वृद्ध अवस्थेत स्वभाविकतः वात वाढतोच आणि तेव्हा त्यालाही सतत आटोक्यात ठेवावे लागते. तसेच निरोगी व्यक्तीनी सुद्धा वाताचे शोधन नित्य करून घेतल्यास त्यांना पुढे जाऊन ह्याचा त्रास होत नाही.

सामान्यतः पावसाळ्यात व हिवाळ्यात वाताचा त्रास उद्भवतो. अशा वेळी वैद्याच्या सल्ल्याने स्नेहन, स्वेदन, बस्ती हि पंचकर्मे त्याकाळात केली तर वाताचे त्रास होत नाही. परंतु ह्याचा नित्य नियम आवश्यक आहे. आणि वाताच्या रुग्णांसाठी बस्ती हे श्रेष्ठ पंचकर्म आहेच.

वाताचे शरीरातील कार्य :
* वात समस्थ देहाची व्यवस्था व त्यांच्या अवयवांना धारण करतो
* वायु आपले हे कार्य प्राण, उदान, सामान, व्यान, अपान ह्या पाच रूपांत करतो.
* शरीरातल्या घोट्या-मोठया सर्व हालचालींना वात प्रेरक म्हणून कार्य करतो.
* मनाला प्रेरित आणि नियंत्रित करण्याचं काम करतो.
* इंद्रियांना आपले विषय (कार्य) कळण्यासाठी व ते विषय मेंदू पर्यंत पोहचवण्यासाठी वाताचे योगदान असते. (Nervous system)
* वात सर्व शरीरातील धातूंना नियोजित करतो, शरीरातील सांध्यांना जोडून ठेवतो.
* शरीराला स्पर्श जाणवणे, आवाज ऐकू येणे, शब्द बोलण्याची क्रिया हि वाताचीच कार्ये आहेत.
* शरीरात उत्साह, आनंद निर्माण करणे, शरीराचा जाठराग्नी वाढवणे (भूक वाढवणे) हि वताचीच कार्ये आहेत.
* शरीरातील मल, मूत्र, स्वेद, शुक्र, गर्भ ह्यांना बाहेर टाकणे, गर्भाला आकार देणे, शरीरात सर्वत्र रक्त पोहचवणे हि कार्य वात करतो जेव्हा तो योग्य अवस्थेत असतो त्याचा प्रकोप हि सर्व कार्ये विस्कळीत करू शकतात.

ह्या वाताला समान अवस्थेत ठेवण्यासाठी कफ आणि पित्त ह्या दोषांची आवश्यकता असते ज्यांच्या विषयी आपण पुढील लेखात पाहूया.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

डॉ शार्दूल चव्हाण

– लेखन : वैद्य प्रा शार्दुल चव्हाण.
एम. डी. आयुर्वेद, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments