Tuesday, June 17, 2025
Homeलेखनर्मदा परिक्रमा : 3

नर्मदा परिक्रमा : 3

दोन वर्षांपूर्वी मी नर्मदा परिक्रमे विषयी अगदीच अपरिचित होते. आणि आज दोन महिन्यांपूर्वी मी परिक्रमा करुन आले आणि ज्याला आंतरिक समाधान म्हणतात ते मला मिळालं.

मैय्या ची ईच्छा होती म्हणून केतकीताई कडुन मला बुलावा आला. केतकीताईने मैया चे विडिओ बघुन बरेच जणांना विचारुन माहिती मिळवली. मी मात्र केतकी ताईचं ऐकुन ह्या परिक्रमेत सामिल झाले.

29 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत 16 दिवसांची परिक्रमा सुरु झाली. कैवल्य धाम आश्रम चे संस्थापक, संचालक 28 तारखेपासून हॉटेल पलाश मध्ये आले होते. आम्ही माधांता परिक्रमे साठी 27 तारखेला हॉटेल मध्ये आलो होतो. परिक्रमावासी एक एक करुन हॉटेल मध्ये यायला सुरुवात झाली होती. इंदुर, सुरत, मुंबई, पुणे, माझी मैत्रीण जम्मू काश्मीर ची होती. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील लोक आली होती. आम्ही सगळे मिळून 53 परिक्रमा वासी होतो.

29 ला सकाळी कैवल्य धाम आश्रम कडुन एक बॅग देण्यात आली. त्यामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य होते. हळदी कुंकू, अबीर, गुलाल, अक्षता एक सुपारी जान्हवं, अत्तर नर्मदा मैय्या चा एक फोटो, एक प्लास्टिक ची बाटली एका डब्यात हे साहित्य नीटसं रचुन ठेवले होते. ज्यांना खाली बसण्यास त्रास होतो त्यांच्या साठी छोट्या टेबलची व्यवस्था केली होती.

पंडीत अनयजी रेवाशिष यांनी परिक्रमेची माहिती देताना सांगितले की ही आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड या चार राष्ट्रांतील एकंदर 21 जिल्हे यात येतात. परिक्रमेचे नियम समजावून सांगितले. आज पासून कांदा, लसूण, वांगी, गाजर, बीट खाणं वर्ज्य आहे. कांदा लसूण तर माहित होते आणि वांगं तर त्यांच्या नावातच वैगुण्य म्हणजे कोणताही गुण नाही. मग गाजर आणि बीट वर्ज्य कशाला ? गाजर आणि बीट जन्मतः लाल रंगाचे असतात. जेव्हा त्यांची वाढ होत असते तेव्हा जमिनीत रहाणाऱ्या जीवजंतूंचे रक्त शोषून घेतात आणि जमिनीत रहाणारे जीवजंतू पण मैय्याचीच मुलं आहेत, म्हणून परिक्रमा करताना हे सगळं वर्ज्य आहे. ही नुसती परिक्रमा नसुन जीवन परिवर्तन करणारे अनुष्ठान आहे. नर्मदे चे दुसरें प्रचलित नाव आहे “रेवा” अशी मैय्याची पंधरा नावे आहेत. 93% मार्ग हा शास्त्रोक्त मार्ग आहे. रेवा नर्मदा फक्त अनुभव करु शकतो. इथे येताना श्रध्दा विश्वास समर्पणाच्या भावनेने या सगळ्या बंधनातून मैय्या मुक्त करेल. थोडेही विचलित झालो तर परिक्रमा करता येणार नाही.

“मैय्या चे प्रकटीकरण”
स्वर्गातील देवदेवता भगवान श्रीविष्णुं कडे गेले आणि विचारले आम्ही पापक्षालना साठी काय करु शकतो ? श्री विष्णूंनी सांगितले की ह्या समस्येचे निराकरण देवाधिदेव महादेव करु शकतील ते मैकल पर्वतावर विराजमान आहेत. सर्व देवी देवता पापमार्जना साठी शिव शंकराकडे गेले. शिवजी म्हणाले मला तपश्चर्या केली पाहिजे. शिव शंकरांची तपश्चर्या दहा हजार वर्षे चालली. शांत स्वभावाचे भोलेनाथ माता पार्वती सोबत अदृश्य स्वरूपात ह्या पर्वतावर बसले. शिवजींच्या शरिरातून घाम गळू लागला ज्याने पर्वत ओला झाला.  ह्याचे सतरा थेंब मैकल पर्वतावर पडले त्यातून दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक बालिका प्रकट झाली. “हे परमपूज्य पिता मी तुमच्या शरिरातील घामाने प्रकट झाले आहे माझ्या प्रकटीकरणाचा उद्देश काय ?” असं त्या बालिकेने शंकराकडे प्रश्न केला. तेव्हा शिव शंकर म्हणाले “मुली तु पण तपश्चर्या कर आणि मी पण करीन. मग पिता पुत्री ने तपश्चर्या सुरू केली. ती दहा हजार वर्षे चालली. कन्येचे सुंदर स्वरुप पाहता सर्व देवांना वाटलं आपण हिच्याशी विवाह करुया. परंतु शिवजी क्रोधित होऊन बोलले “शांत व्हा, मला विचारले ? ही सामान्य कन्या नाही. ही तांडव संहार करणारी रुद्रा ची लेक आहे. जो हिला स्पर्श करेल तो हिच्याशी विवाह करु शकतो. मग एक एक करुन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागले. तसतशी ती गुप्त होऊन दुसरीकडे गेली. नंतर एक योजन ती गुप्त राहिली आणि नंतर प्रकट झाली. हि क्रिया मैकल पर्वतावर बसुन शिव पार्वती पहात होते.

संपूर्ण ब्रम्हांड भ्रमण करुन कन्या शिवा समोर उभी राहिली “यतो ददासी दे नर्मम (नर्मम म्हणजे आनंद सुख) हे मुली आज पासून तुझं नाव “नर्मम ददाती एवं नर्मदा”. तुझं कार्य तुला जल स्वरूपात वाहायचं आहे. हे देवी देवता तुझ्या काठी तपश्चर्या करुन तुझ्या पवित्र जलाने त्यांचे पापं क्षालन होईल” पण ती शिवाची कन्या होती ना ? म्हणाली, “पिताश्री तुम्ही मला तुमच्या घरा पासून दूर करत आहात तर दिव्य आशिर्वाद घेऊन जाईन” पिताश्री म्हणाले, “माग मुली” तेव्हा नर्मदा मैय्या म्हणाली, “मी फक्त देवीदेवतां साठी प्रवाहीत होणार नाही तर मी किडे मुंग्या किटक वाळवी कसर यांना जरी माझा स्पर्श झाला तरीही ते पाप मुक्त होतील. “तथास्तु” असं शिवजी बोलले.

स्वर्गातुन येणारी नदी गंगा. सात महा नद्या आहेत. नर्मदा मैय्या ने मागितले मला सतत प्रवाहित रहायचे आहे. एक वेळ गंगा नदी मध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात. या तीन वेळा सरस्वती नदी मध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात. सात वेळा यमुना नदी मध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात. दर्शना देव नर्मदा- जो मात्र माझं दर्शन करेल तो पापं मुक्त होईल. “अक्षया हम् भवे प्रभो” मी अक्षय राहिन. नर्मदा नदी च्या किनारी करोडो वर्षे जुने अवशेष प्राप्त आहेत. मैय्या आपल्या पिताश्रींना बोलली, “तुम्ही सदा सर्वदा माझ्या सोबत रहा, “कसे ? मैय्या बोलली, “माहिती नाही” पिताश्री बोलले, “तथास्तु” जो दगड तुझ्या प्रवाहात असेल तो शिव स्वरुप असेल, मनुष्य, पशू, पक्षी कोणाच्याही अस्थी तुझ्या पाण्यात विसर्जित होतील ते शिव स्वरूप होतील.म्हणुन नर्मदेच्या पाण्यातून जे दगड मिळतात त्यांना नर्मदेश्वर म्हणतात. मैय्याच्या पाण्यात असामान्य ऊर्जा आहे. ज्या घरात नर्मदेश्वर असेल त्या घरात सकारात्मक ऊर्जा, ऐश्वर्य येणारच. नर्मदेश्वर स्वतः प्रतिष्ठित असतात. हे शिवलिंग सर्वात प्रख्यात शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाला बाणलिंग म्हणूनही संबोधले जाते. ह्याची पूजा अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे. साक्षात शिव स्वरुप सिध्द स्वयंभू असे हे नर्मदेश्वर नर्मदा नदी घ्या किनारी सापडतात. जिथे नर्मदेश्वर असतात तिथे काळ आणि यम अवेळी प्रवेश करत नाहीत अशी वैदीक काळापासून मान्यता आहे.

रथ सप्तमी माघ महिन्यात नर्मदा पृथ्वी वर प्रकट झाली. सुर्याच्या सप्तकिरणांच्या रथात बसून नर्मदा मैय्या मैकल पर्वतावर आली तो दिवस नर्मदा जयंती. मैकल पर्वतावर आली म्हणून तिला मैकल कन्या म्हणतात. मैकल पर्वत अमरकंटक (तहसील पुष्प राज गड) इथे 90 अरब वर्षांपूर्वी प्रथम आली आणि तेव्हापासून सतत प्रवाहित होत आहे. 1320 किमी दूर अमरकंटक इथुन मैय्या निघाली तिच्या किनारी ऋषी मुनी देवी देवता विराजमान आहेत. मैय्याच्या किनाऱ्यावर 60 करोड 67 लाख तिर्थक्षेत्र निर्माण झाली होती. आजतागायत त्या मधील 489 तिर्थक्षेत्र आहेत.

मार्कंडेय ऋषी ने वर्णन केले ते नर्मदा पुराण त्यामध्ये एकंदर 27000 श्लोक एकाच नदी वर केंद्रीत आहेत. सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा पाच पांडवांनी आणि द्रोपदीने केली त्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागले.
परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा ब्रम्हांडाचा पहिला नियम आहे. वसिष्ठ संहितेत परिक्रमेचे नियम दिले आहेत. यामधील पाच तिर्थांचे दर्शन केले तरी जिवन संपन्न होते. वृध्द, रोगी, राजकिय कार्यात व्यस्त लोकांनी परिक्रमा करताना साधनांचा वापर करावा.
आज मी इथेच विराम घेते. नंतर भेटूया पुढील लेखात.
काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर…..
क्रमशः

सुलभा दिवाकर

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments