भारतीय स्त्रीच्या नशिबी अंधाराचे जाळे पसरलेले असताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीला घराबाहेर काढून शिक्षण दिले. तसेच त्या स्वावलंबी बनाव्यात म्हणून प्रयत्न केले आणि त्यापुढची पायरी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले.
बाबासाहेबानी भारतीय संविधानाद्वारे पुरुषांबरोबरच स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. स्त्रीचं अस्तित्व नाकारणारे अनेक कायदे त्यांनी मोडीत काढले. बालविवाह, विधवाविवाह, केशवपन अशा अनेक गोष्टी दूर करून स्त्री मुक्तीसाठी लढा दिला.
14 एप्रिल 1891 रोजी रामजी व भिमाबाई यांच्या पोटी मध्यप्रदेशातील महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांना जन्म देणारे माता पिता हे तितकेच महान. वंचित समाजाचे तारणहार असलेल्या बाबांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ होताच पण त्याला आधुनिकतेची जोड होती. स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना आलेल्या अडचणी इतर देशातल्या शिक्षणाचा प्रसार पाहून त्यांना “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही” याची जाणीव झाली. त्यांनी तोच आदर्श समाजापुढे घालून दिला.
ज्ञानाअभावी व्यक्ती व समाज यांचे नुकसान होते हे ध्यानात घेऊन मागासवर्गीयांना ही शिक्षण मिळणे तितकेच गरजेचे आहे हे त्यांनी लक्षात घेतले त्यासाठी त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली. एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच मारून टाकले, असे त्यांना वाटे. त्यांनी उच्च शिक्षणा द्वारे समता स्वातंत्र्य बंधुता ही मूल्ये आत्मसात करणारा समाज निर्माण केला.
विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेला एक संदेश आजही तितकाच मार्गदर्शक ठरतो
“शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे आणि त्यावरून चालायचे असेल तर चिंतन मननातून केलेला अभ्यास हा महत्त्वाचा आहे” असे ते म्हणत. त्यांच्या या शिक्षणाच्या अभ्यासातूनच दलित समाजाचा ऱ्हास होता होता थांबला.
दलितांचे कैवारी असलेल्या बाबासाहेबांना दलितांच्या भविष्याची काळजी ठेवून कित्येक वेळा उपाशी झोपावे लागले होते.
माणसाने माणसाशी वागताना मनुष्य जन्म नश्वर आहे तसे विचारही नश्वर आहेत हे लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणत. एखाद्या झाडाला जसे पाणी दिली नाही तर ते मरते तसे विचारांना विवेकाचे, प्रचार प्रसाराचे माध्यम उपलब्ध झाले नाही तर ते नष्ट होतात असे ही ते सांगत.
सामाजिक राजकीय वैचारिक क्षेत्रात निपुण कामगिरी करणारे डॉ. बाबासाहेब आरोग्याचा मूलमंत्र देण्यास ही विसरलेले नाहीत. ते म्हणतात,व्यायामाने शरीर सुदृढ बनते तर वाचनाने मस्तक सुधारते तर मन खंबीर बनते
यावर त्यांचा गाढ विश्वास होता.
इतके अगाध कार्य करणाऱ्या या महामानवाविषयी बोलणे म्हणजे सिंधूत बिंदू !
लेखणी तर पुरी पडेलच परंतु कागदही अपुरे पडतील. माझ्या विचारशक्तीच्या पलीकडेही असलेलं त्यांचं कार्य मला शब्दात सांगता येणार नाही म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करून माझ्या वाणीला विराम देते.त्यांच्या विषयी फक्त एवढेच म्हणेन
“असा कोण हा
मानव थोर
ज्याने तोडला जातीपातीचा दोर
एकच नाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

– लेखन : सौ अनिता व्यवहारे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800