Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : ९८

ओठावरलं गाणं : ९८

नमस्कार.
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. “परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का”, “ए आई मला पावसात जाऊ दे”, अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके, दु:ख माझे हे मुके”, “ते स्वप्न भाववेडे”, “कुहूकुहू कुहू येई साद”, अशी विविध प्रकारची गाणी देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे
गा प्रकाश गीत

आयुष्यात एखादी घडी अशी येते कि त्याक्षणी संकटांशी सामना करत असताना खचून गेलेल्या मनाला काय करावं तेच समजत नाही. त्या क्षणी कुठूनही आशेचा किरण येण्याची शक्यता दिसत नाही एवढंच तीव्रतेने जाणवत रहातं. कवयित्री मात्र ठामपणे सांगते आहे कि कितीही संकटं कोसळली तरी आशेचा धागा पकडून ठेव. त्यावरची पकड ढिली होऊ देऊ नकोस. सकारात्मक विचारांंमधूनच तुला आशेचे किरण नक्की दिसतील ज्यांच्यामुळे तू संकटावर मात करशील. तेंव्हा नैराश्य काजळी झटकून तू नव्या जोमाने प्रकाश गीत गात रहा म्हणजे येणाऱ्या संकटांशी, अडचणींशी सामना करण्याची स्फूर्ती तुला या प्रकाश गीतातून मिळेल.

रोज नवी ही उषा उगवते
कवच भेदूनी अंधाराचे
कळीकळीच्या कोषामधूनी
निसर्ग गातो गीत उद्याचे
संजीवन हसते नाशामधूनी, हीच जगाची रीत

आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखांप्रमाणेच रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र हे सृष्टीचक्र अव्याहतपणे चालू आहे. अंधाराचं कवच भेदून येणारी पहाट ” चल उठ गड्या पद टाक पुढे” हाच संदेश मानवाला रोज रोज देत असते पण मानव प्राणी सकाळी फिरायला जरी गेला तरी निसर्गाच्या या संदेशाकडे मात्र तो दुर्लक्ष करतो. रात्रीच्या अंधारात कोषात बंदिस्त असणाऱ्या कळ्या देखील आशेचा किरण येण्याची वाट पहातात आणि मग रेशीम पावलांनी येणाऱ्या उषाराणीच्या नाजूक स्पर्शाने त्या कळ्यांचं फुलांमध्ये रूपांतर होतं. रोजच्या जीवनात आपल्या सभोवताली घडणाऱ्या या घटनांमधून निसर्ग देत असतो सकारात्मक संदेश. निसर्गाच्या या संदेशाला प्रतिसाद म्हणून तरी मानवा, तू आशेच्या किरणांच्या शोधात रहा म्हणजेच प्रकाशाचं गाणं गात रहा कारण नाशिवंत गोष्टींमध्ये देखील कल्पकतेची नवसंजीवनी लपलेली असते. यशाचा मार्ग शोधायचा असेल तर येणाऱ्या आपदांचा मुकाबला करण्यासाठी आशेच्या, सकारात्मकतेच्या प्रकाश गीताची नितांत आवश्यकता आहे.

दु:ख निराशा दूर सारूनी
सदा पडावे पाऊल पुढती
गतकाळाची कशास भीती
भविष्य अपुले अपुल्या हाती
फुलव निराळे तुझ्या हातूनी तूच तुझे संचित

आयुष्यात येणाऱ्या संकटांशी मुकाबला करताना, अडचणींचा सामना करत असताना होणारं दु:ख आणि त्यामुळे येणाऱ्या निराशेच्या गर्तेत अडकून न रहाता माझ्या यशाचा मार्ग मलाच शोधायचा आहे हा मंत्र विसरू नकोस. स्वप्नं जरूर पहा मात्र त्यांच्या पूर्ततेसाठी तुला भूतकाळ विसरून, वर्तमानकाळात सावध रहावे लागेल. त्या करता तुझा वर्तमान कुरतडणाऱ्या दु:ख आणि निराशा या दोन गोष्टींपासून तुझ्या मनाला शेकडो योजने दूर ठेवावं लागेल. भूतकाळ विसरून माझा यश मार्ग मलाच शोधायचा आहे असा विचार करशील तेंव्हाच तुझं पाऊल यशाच्या दिशेने पडेल आणि एक दिवस ते शिखर तू नक्कीच काबीज करशील. असं जर मनावर बिंबवलंस तर “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या वाक्याची प्रचीती तुला येईल. प्रकाश गीत गात सुरू झालेली तुझी मार्गक्रमणा ही इतरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल. आशेच्या किरणांमधून आणि सकारात्मकतेच्या प्रकाश गीतामधून मिळणारं हे संचित पाहून आपलं भविष्य आपणच घडवायचं असतं याची तुला खात्री पटेल.

संगीतदिग्दर्शक डी एस रूबेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जयवंत कुलकर्णी यांच्या संयत आवाजात ऐकताना निराश अवस्थेतील मनाला नव्याने उभारी मिळत जाते.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?