किती आवरावे हळवे, मन बावरे झाले
सीमेवर लढण्या निघाला, नयनी अश्रू आले
रणांगणी गाजवलेली, अतुल शौर्यगाथा
स्मृती तव शूर पित्याची, ऊरी जपली आता,
परमवीरचक्र बघता, अभिमानाने डोले
सीमेवर लढण्या निघाला, नयनी अश्रू आले
इच्छापूर्ती करण्या त्यांची, सैनिक जाहलास
वचनबद्ध होऊनी निघशी, देश रक्षणास
मुखावरी ठेऊनी हासू, यशस्वी भव बोलले
सीमेवर लढण्या निघाला, नयनी अश्रू आले
जरी एकुलता पुत्र तू, नाही अडवणार
माझ्यापरी मायभूचे, पांग फेडणार
वीरपत्नी, वीरमाता, भाग्य मज लाभले
सीमेवर लढण्या निघाला, नयनी अश्रू आले

– रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800