Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ४

दुर्मीळ पुस्तके : ४

आलोक

अलीकडेच मी साहित्य चिंतामणी वाचत होतो. त्यात मराठवाड्यातील प्रा. भगवंत देशमुख यांचा ‘मांजराच्या मिशा’ हा लघुनिबंध वाचण्यात आला आणि आठवले की त्यांचा ‘गोदाकाठ’ हा धडा आम्हाला इयत्ता पाचवीच्या बालभारती मध्ये होता. त्यावेळी तो लघुनिबंध होता एवढी जाण नव्हती पण तेव्हा तो बालवयात मनावर कोरला गेलेला होता.

त्या स्मृती जाग्या झाल्या तसे त्यांचा ‘आलोक‘ हा एकमेव १९५६ मध्ये ध्रुव प्रकाशन, हैदराबाद मार्फत प्रसिद्ध झालेला व नंतर १९६० मध्ये पुनर्मुद्रित झालेला लघुनिबंध संग्रह मिळवून वाचण्याची उत्कंठा वाढली. गुगलवर त्यांच्या नावाने शोध घेतला तेव्हा त्यांच्याविषयी कोणतीही माहिती आढळली नाही म्हणून मी मराठवाड्यातील परिचित अधिकारी, श्री राधाकृष्ण मुळी, सेवानिवृत्त संचालक (माहिती) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कळविले की ‘आलोक‘ आऊट ऑफ प्रिंट असेल.

प्रा. भगवंत देशमुख यांचा अर्वाचीन आणि आधुनिक साहित्याचे उत्तम अभ्यासक, चांगले वक्ते आणि प्रभावी प्राध्यापक असा लौकिक. मराठी भाषा (प्रमाण लेखन) अचूक लिहिली आणि बोलली जावी हा त्यांचा आग्रह असे. महात्मा गांधी यांची नात सुमित्रा कुलकर्णी यांनी अनमोल विरासत नावाचे पुस्तकं (३ खंड) लिहिले, त्याचा मराठी अनुवाद ‘अनमोल वारसा‘ या नावाने ३ खंडात भगवंतरावांनी केला आहे आणि तो साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. याखेरीज संत एकनाथांवर त्यांचे एक पुस्तक आहे. मोजके लिहिणारा लेखक.

प्रा. भगवंत देशमुख

इतक्या मिळालेल्या माहितीच्या आधारे फेसबुकवर पोस्ट करुन कोणाला आणखी काही माहिती आहे का ते विचारले. योगायोग असा की त्यांचा सर्वात धाकटा मुलगा श्री अजय भगवंत देशमुख यांनी अगदी तत्परतेने त्या पोस्टवर प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडील प्रा. भगवंत देशमुख यांची शिल्लक असलेली ‘भले भाई भले’ (२/१०/२००६ – लोकसाहित्याच्या विविध प्रकारांचे संकलन ), ‘आठवणीतल्या गोष्टी (जानेवारी, २००८-आठवणींचा संग्रह ),’ तिळा उघड’ (१५/११/२००९ – उर्दू व इंग्रजी भाषांतील अनुवादित कथा संग्रह) आणि ५ आॅगस्ट, २००३ रोजी त्यांनी ८२ व्या वयात पदार्पण केले त्या निमित्ताने त्यांच्याविषयी त्यांच्या निकटवर्तीयांच्या आठवणींचा संग्रह ‘ भगवंतायन’ ही ४ पुस्तके देखील पाठवली. ‘आलोक‘ ची त्यांच्याकडे एकच प्रत असल्याने तिची डिजिटल प्रतही त्यांनी पाठवली.

श्री अजय भगवंत देशमुख

प्रा. भगवंत देशमुख यांनी फारसे लेखन केले नाही पण त्यांचे लेखन लक्षणीय आहे. ‘पुन्हा नभाच्या लाल कडा’ हे बी.रघुनाथ यांच्या निवडक कवितांचे संकलन त्यांनी केले आहे. तसेच ‘मिटलेले आकाश’ हा बी. रघुनाथ यांचा निवडक कथांचा संग्रह त्यांनी संपादित केला आहे. याखेरीज ‘पंतांची सात आख्याने’, ‘गीतार्थ बोधचंद्रिका’ ही संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘महान बंडखोर ‘डेनिस किंकेडच्या ‘द ग्रँड रिबेल’ चे त्यांनी भाषांतर केले आहे. ‘अमीर खुस्रो या मूळ सय्यद गुलाम सम्नानी यांच्या उर्दू ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला आहे.’ दगडी जात्याचा रेशमी गळा’ यात मराठवाड्यातील असंकलित जात्यावरील ओव्यांचे त्यांनी संकलन व विवेचन केले आहे. ‘एकनाथ वाङमयदर्शन ‘हे संत एकनाथांच्या विविध रचनांचे निवडक संकलन आहे.

मराठीतील प्रदीर्घ कथात्मक काव्ये, चौथे पानिपत, मराठीची वृत्तपत्रीय विटंबना हे त्यांचे दीर्घलेखही गाजलेले आहेत. त्यांचे अमोघ वकृत्व आणि ओघवत्या भाषेत रसपूर्ण मोठ्या आवाजातील विवेचन अनेकांनी ‘भगवंतायन’ यात आपल्या आठवणीत नमूद केले आहे. त्यांचा जन्म ५ आॅगस्ट, १९२२ चा. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी झाली.२९ नोव्हेंबर, २००९ या दिवशी त्यांचे निधन झाले. मराठवाड्यातील परतूरजवळचं लहानसं रेल्वेस्टेशन असलेलं पारडगाव हे त्यांचे जन्मगाव. त्यांचं घराणं अंबडकर देशमुखांचं. त्यांचे वडील कळतेसवरते, तरुण होईपर्यंत कर्नाटकात होते त्यामुळे त्यांना कानडी उत्तम बोलता येत असे. निजामी राजवट होती. त्या वातावरणात प्रा. देशमुख यांचे शिक्षण झाले. १९३६ मध्ये ते सातवी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद (आजचे संभाजीनगर) येथे आले.गुरुवर्य डॉ. नांदापूरकर त्यावेळी औरंगाबादच्या शासकीय विद्यालयात शिक्षक होते. त्यांचा सहवास त्यांना लाभला. इंटरची परीक्षा देऊन झाल्यावर १९४२ मध्ये त्यांचा विवाह झाला. एम ए. ची परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी त्यांचं सारं आयुष्य मराठी भाषा आणि साहित्याच्या अध्ययन – अध्यापनात मनापासून जगले.

दुर्मीळ पुस्तकांच्या शोधाचा प्रवास असा विलक्षण व अवर्णनीय आनंदाचा असतो हे ‘आलोक’ या लघुनिबंध संग्रहाचा शोध घेतांना मला प्रचिती आली.

आलोक या प्रा. भगवंत देशमुख यांच्या एकमेव लघुनिबंध संग्रहात एकूण १५ लघुनिबंध आहेत. माझे निशा – भ्रमण, बिचारा शेखमहंमद, कुठे तरी चुकतंय, दारापुढे, उंटाच्या बाह्या, हा तर गोदाकाठ, उपेक्षित वक्ते, मध्यरात्रीचा सूर्य, थांबा आणि वाचा, कशावरही बोलावं, माझंच चुकलं, मांजराच्या मिशा, आंधळा तू नाहीस, जिंदाबाद! आणि तयार कपडे असे १५ लघुनिबंध आहेत.

‘माझे निशा – भ्रमण’ मध्ये त्यांनी रात्री भटकण्याच्या आवड व छंदाविषयी अतिशय सुंदर विवेचन केले आहे. कुसुमावती देशपांडे यांच्या चंद्रास्त, मध्यरात्र आणि माध्यान्ह या लघुनिबंधांची आठवण व्हावी इतकी प्रा. देशमुख यांची विलोभनीय शैली आहे. प्रत्येक लघुनिबंधात त्यांची सखोल चिंतनशीलता प्रकटते. प्रत्येक लघुनिबंधातून ते विषयाचे एक वेगळेच ‘दर्शन’ घडवतात आणि आपले दष्टेपण सिध्द करतात. ‘आलोक’ याचा अर्थही असाच आहे. एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकणे, त्याचे दर्शन घडवणे.

बिचारा शेख महंमद या लघुनिबंधात त्यांनी या गोष्टीत पितळाची भांडी का नाही वापरली या गोष्टी ऐकणार्‍या मुलांच्या शंखेचा उल्लेख केला आहे. माणसाने मनोराज्य का करु नये? कल्पनारंजन हे केवळ साहजिकच नव्हे तर आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे. स्वर्गाची कल्पना ही मानवाचे अत्यंत प्राचीन स्वप्न आहे. केवळ योजना कितीही तर्कशुद्ध असली तरी ती जोपर्यंत आपले मनोराज्य बनत नाही तोपर्यंत तिची तीव्रतेने ओढ लागणे शक्य नाही असा सुंदर विचार त्यांनी मांडला आहे. पसायदान हे ज्ञानेश्वराचे अत्युच्च कोटीचे मनोराज्य असा दाखला त्यांनी यात दिला आहे.

‘कुठे तरी चुकतंय’ या लघुनिबंधात अलौकिक जीवन जगणाऱ्या मानवाचा मृत्यूही अलौकिक असावा ही अपेक्षा चुकीची आहे असे सांगितले आहे. मृत्यूच्या अलौकिकतेवरुन जीवनाचे श्रेष्ठत्व मानणे त्यांना विचित्र वाटते.

दारापुढे या लघुनिबंधात दारापुढे उभे राहण्याची सवय, दारापुढे येण्याची हौस, घरातील वातावरणाचा उबग आल्यावर माणूस सहज दारापुढे निर्हेतूक उभा राहतो. वैयक्तिक एकलकोंड्या जीवनाचा कंटाळा आल्यावरही असे होते. यातून उंबरठ्यावर राहून बाह्य जीवनाचा अनुभव घेता येतो.

उंटाच्या बाह्या या लघुनिबंधात जंपर आणि उंटाच्या बाह्या यातील सौंदर्यविषयक विचित्र समीकरणाचा उहापोह केला आहे. उराशी बाळगलेल्या संकेतांना विरोध झालेला आपल्याला कधीच खपत नाही. संकेत सोयीसाठी निर्माण होतात पण त्यांच्या आहारी गेले की सत्याकडे डोळेझाक होते असे तात्विक विचारांकडे ते आपल्याला नकळत घेऊन जातात.
हा तर गोदाकाठ या लघुनिबंधात आयुष्यातील कितीतरी घटनांची स्मृति नदीकाठी जागृत होते हे कथन केले आहे. नदीकाठ म्हणजे तर गत आयुष्याचा चित्रपटच आहे असे त्यांना वाटते. नदीच्या पाण्याचा स्पर्श, काठावरील वाळूचा स्पर्श याचे छायाचित्र कोणताच छायाचित्रकार घेऊ शकत नाही पण नदीकाठानं ते चित्र आपल्या अंतरंगात कोरुन ठेवले आहे. तिथे जाताच त्यांना तो अनुभव, ते सुख पुन्हा जाणवते व क्षणभर ते पुन्हा लहान होतात.
उपेक्षित वक्ते या लघुनिबंधात त्यांनी केवळ जिभेच्या बळावर जगणारे आणि आपल्या वाणीवर उपजीविका करणार्‍या फिरत्या औषधविक्रेत्यांच्या वाणीतील सामर्थ्य वर्णिलेले आहे.

‘मध्यरात्रीचा सूर्य’ या लघुनिबंधात मध्यरात्रीच्या चंद्राला सूर्य समजणार्‍या मित्राच्या अनुषंगाने आपला दृष्टिकोन इतरांवर लादणे अथवा दुसर्‍याच्या दृष्टिकोनाचा उपहास नि तिरस्कार करण्याबाबत विचार मांडला आहे.
‘थांबा आणि वाचा’ या लघुनिबंधात विविध पाट्या वाचण्यापासून त्यांना कसा आनंद मिळाला. एका लाकडाच्या वखारीवर यहा लडकी मिलती है या पाटीची गंमत, अशुद्ध पाट्यांची भूमिका आणि गंमत सांगितली आहे. पाटीवरुन ती लावणार्‍याच्या मनाचा नि त्याच्या व्यक्तित्वाचा कसा सुगावा लागतो, ललना विभूषण अशी पाटी लावणार्‍याच्या काव्यात्म मनोवृत्तीचे कसे दर्शन घडते ते अगदी रंजक पद्धतीने सांगितले आहे.

‘कशावरहि बोलावं’ या लघुनिबंधात विषयाचं महत्त्व नसून बोलणार्‍याबद्दलची आपुलकी व जिव्हाळा असतो त्यावेळी कशावरहि बोलायला सांगितले जाते. वक्त्याला विषय कोणता जरी दिला तरी त्याला जे बोलायचे तेच तो बोलतो. बोलताना विषयांतरही होते. कसलाच विषय न घेता आपण कां बोलू नये असा यात विचार मांडला आहे.
‘माझंच चुकलं’ या लघुनिबंधात माझंच चुकलं, तुझं नाही असा हट्ट धरुन बसतात त्याबद्दल विवेचन केले आहे. माझं चुकलं असं म्हणून आत्मनिरीक्षण करताना आपल्या मनावरील ढोंगीपणाची सर्व आवरणे दूर होत असतात.
‘मांजराच्या मिशा’ या लघुनिबंधात मांजर आपल्या मिशांचा वापर पलिकडे जाता येईल किंवा नाही त्याचा अंदाज घेण्यासाठी करते. जीवन सुरळीतपणे जगण्याकरिता इतरांच्या गतीचा अंदाज घेणे आवश्यक असते.

आंधळा तू नाहीस ! आम्हाला दृष्टी आहे आहे पण जे बघायला हवं ते बघता येत नाही. आमच्या मनात दया, सहानुभूती, करुणा आहे पण ती डिवचल्याशिवाय जागी होत नाही. जाहिरातींच्या नवनवीन पध्दती आधुनिक जीवनातील या डोळस आंधळेपणाच्याच द्योतक आहेत इ. सुंदर विवेचन केले आहे.
जिंदाबाद या लघुनिबंधात बुध्दीस एखादी गोष्ट पटलेली असावी नि तीनुसार प्रत्यक्ष आचरण करताना मात्र मनाने दगा द्यावा इ विवेचन केले आहे.
‘तयार कपडे’ या लघुनिबंधात तयार कपड्याचे दुकान हे आजच्या जीवनातील साचेबंदीचे यथार्थपणे प्रत्यंतर आणून देणारे स्थान आहे. साचेबद्धतेबद्दल त्यांनी यात आपले विचार मांडले आहेत. माणसाचे मूल्यमापन करण्याच्या या विचित्र पध्दतीला त्यांचा विरोध आहे. गांधीवादी, मार्क्सवादी हे साचे त्यांना मान्य नाहीत.

येत्या ५ आॅगस्टला प्रा भगवंत देशमुख यांचा जन्म दिवस आहे. त्या निमित्ताने ही त्यांना आदरांजली.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. धन्यवाद सर, पुन्हा एकदा छान संग्रह आणि माहिती आपण आपल्या लेखणीतून दिली आहे. गम्मत म्हणजे दारापुढे या लघुनिबंधात काय आहे त्याची उत्सुकता लागलीय, नक्कीच वाचनात आणेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments