Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

उमेद

जीवन म्हणजे स्नेहाचे नाते आहे. आपल्या जीवन प्रवासात सोबत म्हणून जी माणसं असतात तितके व्यक्तीचे जीवन समृध्द होत असते. माणसं प्रेमाच्या नात्याने जोडली जातील तर आपल्यातील माणसांमाणसातील भेद नष्ट होतील. समाजातील भेद नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माणसांत स्नेहांचे संबंध दृढ करणे. आज आपण जाती, पाती, धर्मात अडकलेलो आहोत, पण माणूस म्हणून आपल्यातील भावभावना समान आहेत. जगातील माणसं इथून तेथून समान आहेत. अशा परीस्थितीत माणसं विभाजीत झाले आहेत, त्यावर प्रेमाचे नाते तयार करणे हाच उपाय आहे.

अशा प्रेममय समाजाच्या निर्मितीच्या मागे असलेल्या भावभावनाचे दर्शन मलेका शेख सैय्यद यांनी आपल्या ‘उमेद’ या चारोळी संग्रहात वाचकांना घडविले आहे. हा संग्रह म्हणजे अत्यंत तरल आणि उत्कट भावनांचे दर्शन आहे.

अन्न, वस्त्र, निवारा ही माणसांची गरज आहे, पण त्या पलिकडे प्रेम ही माणसांच्या मनाची सर्वात महत्वाची गरज आहे प्रेम ही भावना. माणसाच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग आहे.त्यात समर्पणाचा भाव आहे. त्यात ‘मी’ ला विसरणे आहे. जगातील सर्वात प्रेरक प्रेमाचा विचार राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातील आहे. ते नाते म्हणजे समर्पणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यात स्वतःला विसरणे आहे.

जेव्हा माणसं स्वतःला विसरतात तेव्हा ते खरे प्रेम आहे. अगदी शरीर दोन असली तरी मन एकच हा भाव कितीतरी महत्वाचा आहे. त्यात प्रियकर म्हणजे कृष्ण आणि प्रेयसी म्हणजे राधा. राधा ही भक्ती आहे. राधा म्हणजे समर्पणाचा अतिउत्कट भाव आहे. कृष्णावरील प्रेम म्हणजे उध्दाराचा मार्ग आहे. प्रेम म्हणजे भक्ती आहे. त्यात स्वतःला विसरणे आहे आणि मी चा लोप आहे. हा भाव व्यक्त करताना कवयित्री लिहितात,
“शरीर दोन असले
तरी मन एक आहे
तू माझा कृष्ण
मी तुझी राधा आहे

आपण कितीही प्रगत झालो.. गगनात भरारी घेतली आणि सागराच्या तळाशी गेलो तरी आपल्या मनाची गरज ही भौतिक सुविधा नाही तर माणसांच्या मनाची गरज प्रेम हिच आहे. आपल्याला स्वतःच्या समृध्दते बरोबर आनंदाच्या डोही आनंद तरंग भाव निर्माण करायचा असेल, तर निसर्गाची सोबत हवी असते. मनाचा मोरपिसारा फुलण्यासाठी आकाशात मेघांनी गर्दी करावी.

आपल्या भोवतलाच्या नदी, नाले, डोंगर रांगा यांनी नटून यावे.. हा मनमोहक हिरवा मोरपिसारा फुलवणे आणि त्यात स्वतः ओलेचिंब होणे हा निसर्ग अनुभव जीवनाला आनंदाच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यास मदत करेल. तो भाव व्यक्त करताना त्या लिहितात..
“मेघांनी यावे भरून
सृष्टीने यावे नटून
मनी फुलावा पिसारा
चिंब चिंब भिजून”

प्रेमाचे नाते जेथे घट्ट असते तेथे त्या नात्यात होणारी भेट म्हणजे तृप्तता नाही. त्या उलट भेटीनंतर आणखी ओढ निर्माण होत जाते. जवळ आल्यानंतरही ती ओढ कमी होत नाही. त्या उलट जवळ येणे आणि सोबतीने काही क्षण घालवणे म्हणजे आनंदाची वाट चालणे आहे. त्यासाठी ती एक लडिवाळपणे एक अट घालत त्या लिहितात, तू माझा हो आणि मग माझ्या सोबत वेळ घालव.. खरेतर परमेश्वर आणि भक्त यांच्या नात्यातही हाच भाव असतो. आपण कोठेही असलो तरी एकमेकाचे होऊन जाण्यातच नात्याचा ओलावा आहे. हे होणे म्हणजे स्वतःला विसरणे आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्या संदर्भाने आपल्या मनातील भाव नोंदविताना त्या लिहितात,
“दूरावा तू वाढवतोस
बघ जवळ येऊन
काही क्षण घालव
तू माझा होऊन”
प्रत्येकाच्या मनावर कोणाचे तरी गारूड असतेच.. आणि त्यात मनावर गारूड करणारा तो भेटला, की त्याची प्रत्येक गोष्ट अधिराज्य करत जाते. तो मनातील भाव म्हणजे जगण्याची प्रचंड उर्जा असते. त्याची प्रत्येक गोष्ट रूबाबदार वाटते. त्याच्या अस्तित्वाने मन मोहून जाते. त्याचा हदयस्पर्श होताच मनाची अवस्था एक बेधुंद होऊन जाते. खरंतर मनाला फुलविण्यासाठीच स्पर्शाची गरज असते.

तो स्पर्श मायेचा, वात्सल्याचा, प्रेमाचा, स्नेहाचा आणि जगण्यासाठी शक्ती देणा-या उर्जेचा असतो त्या संदर्भाने त्या लिहितात…
“किती रूबाब तुझा
मनी होई हर्ष
धुंद होते मन
होता तुझा स्पर्श”

प्रेममय सहवास जीवनाला ताकद देत जातो.त्याची सोबत म्हणजे स्वतःला विसरणे आहे. विसरणे हा भाव जगातील सर्वोत्तम आहे. या नात्यात एकमेकाला समजून घेणे आहे. त्यातील नात्यामुळे दुःख विसरणे आहे आणि त्याचवेळी अश्रूची फुले निर्मितीची शक्ती त्यात सामावलेली आहे. प्रेम करणा-याची सोबत असण्याची शक्ती देखील किती आहे हे सहजतेने लक्षात येईल. त्याभावना व्यक्त करताना त्या लिहितात..
विसरले भान सारे
सोबत तू असताना
अश्रूची ही झाली फुले
सावरून तू घेताना
माणसांमाणसातील नात्यात ओलावा हवा..बंध प्रेमाचे हवे.

ते प्रेम वरवरचे असता कामा नये.जीवनात अधिकाधिक जवळचे नाते म्हणजे मित्रत्वाचे. मित्र ही भूक आहे. त्याशिवाय जीवनातील दुःखाचे निराकरण होत नाही आणि आनंदही व्दिगुणीत होत नाही.
त्या मित्र म्हणजे कोण तर ज्याला मनातील न सांगता कळते. आपल्या मित्राचे दुःख जाणता येते असा अंतरिक नात्याचा भाव जेथे जुळतो ते नाते म्हणजे मित्रत्वाचे आहे. ते नाते अधिक महत्वाचे आहे.. पण असा अंतरिक भाव जपणारी मंडळी आपल्या भोवती किती आहे ? माणसं आहेत पण ती मित्र आहे का ? की केवळ गर्दी आहे. असा प्रश्न पडतोच, पण मित्रत्वाच्या संदर्भाने आपला भाव व्यक्त करताना त्या लिहितात..
“न बोलताही ज्याला
ज्याला कळते मन
जाणी दुःख मित्र
मित्रच खरे धन”

लेखणीची शक्ती प्रचंड मोठी आहे.लेखणीतून केवळ शब्द नाही तर त्यातून भाव व्यक्त होत असतात. लेखणीतून जे शब्द व्यक्त होतात त्यातून येणारा हा भाव काळजाचा ठाव घेणारा आहे. अनेकदा लोक म्हणतात, की माझे लेखण आणि मी या दोन गोष्टी भिन्न आहेत. मात्र तो विचार तसा खरा नाही. जसे पोटात जे असते तेच ओठावर असते हे जसे खरे आहे.. त्याप्रमाणे लेखक, कवी जे काही लिहितो ते त्याचे अंतरिक भाव आणि मस्तकातील विचार असतो. कवयित्री अगदी प्रामाणिकपणे हे नमूद करते, की मी जे काही लिहिले आहे आणि जे व्यक्त होते आहे ते सारेच माझ्या मनातील भाव आहे.. हा प्रामाणिक भाव अधिक महत्वाचा आहे. हे नमूद करताना त्या लिहितात..
लेखणी माझी घेते
काळजाचा ठाव
व्यक्त होई तिच्यातून
माझ्या मनातील भाव

या संग्रहात प्रेमाचा भाव ओतप्रोत भरलेला दिसतो आहे. प्रेम हा मानवी मनाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे ईश्वराशी अतूट नाते असलेल्या आणि त्या संदर्भाने अनेक चारोळ्या त्यात समाविष्ट आहे.. ईश्वराचे दर्शन हा भावच मुळात माणसांला तृप्तता देतो. प्रदर्शन म्हणजे अतृप्तता आणि दर्शन म्हणजे तृप्तता. त्यामुळे त्या ईश्वराशी संवाद साधताना त्याला सांगू पाहता आहेत.. देवा जेव्हा तुझे दर्शन होते तेव्हा मनाला शांतता मिळते.. तुझ्या दर्शनात किती तरी मोठी शक्ती सामावलेली आहे.. तुझ्या केवळ दर्शनाने देखील दुःख संकटे बाजूला होतात आणि मन आनंदाने भरून जाते. हा भाव व्यक्त करताना त्या लिहितात…
“देवा तूझ्या दर्शनाने
किती शांतता मिळते
दुःख, संकटे बाजूला सरता
मन आनंदी होते”

चपराक प्रकाशन ने प्रकाशित केलेला हा चारोळी संग्रह म्हणजे केवळ कविता नाही,
तर त्यात जगण्याच्या तत्वज्ञानाचे दर्शन होते आहे. समाजात आनंद नांदावा म्हणून माणसं एकमेकाशी प्रेमाने बांधले जाता आहेत. त्या प्रेमाची शक्ती, ताकद त्या अनेक चारोळ्यांमधून त्या व्यक्त करतात. त्या चार ओळी असल्या तरी वास्तवाचे दर्शन अनेक ठिकाणी वांरवार होत राहते. विचाराची पेरणी करणारा हा अत्यंत सशक्त प्रेममय विचाराची पेरणी करणारा संग्रह आहे.

संदीप वाकचौरे

— परीक्षण : संदीप वाकचौरे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो. याचा सुरेख आढावा या चारोळी संग्रहात आहे.पुस्तक परिचय सुरेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments